बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८

House on the hill



आम्ही गावी राहायला गेलो मुंबई सोडून त्यावेळी.लग्नाचा सिझन सुरू झाला होता.एका मित्राच्या नात्यातील एक लग्न होत कुठंतरी चौल रेवदंडा भागात. नक्की कुठं आठवत नाही.त्या लोकांनी गाड्या ठरवून पाहुणे मंडळी नेली होती तिथे. सल्या तू चल हं,अस मला म्हणला.म्हटलं मी बोअर होईन रे तिथं.तरी त्यानं आग्रहाने नेलन.मग गेलो.अर्थात बोअर झालो आणि बाहेर एकटा एक रिकामी बैल गाडी खाली जू करून होती तिच्यात घोंगडीवर आडवा पडलो होतो.चाहूल लागली कुणी आल्याची म्हणून बघितलं तर एक मुलगी येत होती.स्मार्ट वाटली.हाय,मला होत ते.मी चाट पडलो.बघत राह्यलो.अरे तुला काहीतरी म्हणले न मी म्हणत हसली परत.हा,हल्लो.मग सरळ जवळ येऊन शेक हॅन्ड केलन.नाईस टू मीट यू सलील.चैला भारी तेज नजर आणि बिनधास्त निघाली.तेंव्हा a to z अक्षर असलेलं स्टिकर्स च पान मिळू लागल होत.त्यातली अक्षर काढून माझं नाव मी शर्ट च्या खिशावर लावली होती ते ध्यानात आलं.
सारखा हरवतोस आणि नाव विसरतोस का रे तू? परत खळखळून हसली.गेली न विकेट बावा.अरे लाजू नको रे गंम्मत केली.लाजत नाही पण याचा अर्थ असाही निघू शकतो हे लक्ष्यात आणून दिलेस .
ये बात. जमतील आपल्या गप्पा.
नाव काय तुझं?कुठली तू?म्हणजे पोयनाडला कधी बघितलस वाटत नाही.
ए ss फ्लर्ट नको सुरू करू हं मी एंगेज आहे.
अरे,मी एक बावळट सारख शर्टवर नाव चिकटवून फिरतोय म्हणून तुला आयत माझं नाव समजलं पण तुझं नाव कळलं नाही मग विचारलं तर काय हरकतय?
असू दे डोक्याला त्रास तसाच तुझ्या.नाव समजून काय करणारेस?मी लगेच संध्याकाळी गुल होणारे.आपण पुन्हा भेटणार हि नाही मग फायदा काय?
जशी तुझी मर्जी.
मग आता काय बैलगाडी तच बसून गप्पा टाकणारेस का?
म कुठं जातेस लग्न सोडून?
चैला बोअर झालेय मी आणि कसलं उकडतय मंडपात. चल कुठंतरी जाऊन भटकून येऊ.
कुठं?
अरे तू इथला आहेस तू बोल.तुझ्या घरी जाऊन येऊ चल.
अरे मी पोयनाडला रहातो ते दूर आहे इथून.
किती वेळ लागेल?
अर्धा तास st मिळाल्यावर लागेल आणि इथून st स्टॅण्ड ला जायला वेळ लागेल तो माहीत नाही किती लागेल.
त्याच नको टेन्शन घेऊ गाडी घेऊन आलोत आम्ही.चला निघा परत यायला उशीर होईल.वाटेत गप्पा मारू.
अरे पण इथं कुणाला तरी सांगून येतो नाहीतर शोधत बसतील सल्या कुठं गेला.
सगळे बिझी असतात रे अश्यावेळी तू चल जाऊ आपण.
चैला ओळख न पाळख पण निघालो तिच्या गाडीतून.तीच ड्राईव्ह करत होती.नशीब आई न भाऊ पेणच्या आत्याकडे जाणार होते ते घरी नव्हते फक्त आजी होती न नोकर लोक.
घरी आलो.तिला आवाड दाखवलं.मस्त ठिकाणी रहातोस रे.किती मोकळी जागा आहे.मागे टेकडी दिसतेय.
हो जांभळी ची टेकडी म्हणतात तिला, तिच्या मागही दोन अजून आहेत.
मग चला बघूया जाऊन.
मग गेलो.तिन्ही टेकड्या बघितल्या.इतर गावातील जी माहिती होती ती दिली.आजूबाजूला कोणती गाव आहेत.तुला गर्लफ्रेंड आहे का?इकडं घेऊन येत असशील यावर नकारात्मक उत्तर गेल्यावर,हौ ट्रॅजिक म्हणत फिदी फिदी हसली.
मग इकडं येऊन एकटा काय करतोस?
त्या टेकडीवर उगाच बसतो या टेकडीवर लोक लोटा परेड ला येतात.
ई ss न तू मला इकडं आणलस?
नको काळजी निसर्ग साफ करतो सगळं.
शी घाणेरडा कुठला.
आता आहे ते आहे न.
मग परत घरी आलो.तुझ्या घरी कुणीच नाही?
आहेत संध्याकाळी येतील बाहेर गेलेत.
हं,चल निघू परत.वाटेत काही पोटापाण्याचा स्टॉप येईल का?
चल पोटाचा नाही पाण्याचा म्हणजे सोड्याचा येईल.आणि तो मस्त आहे.
चला तर मग.
जाताना पळी ला थांबलो. सोडा प्यायला.तुझं आवडत ड्रिंक च घेऊ म्हणली म्हणून आईस्क्रीम सोडा घेतला.ती बाटली,बूच पोटात ठेवते याच कोण कौतुक वाटलं तिला.ती भडभड बोलत होती.कॉलेज झालं होतं न लगेच कुठंतरी नोकरी ही करत होती म्हणली.सॉरी हं पण एकाने आधीच गटवलय मला.लवकर लग्न ही होईल.घरून कुरबुर आहेच म्हण कारण जाती चा नाहीये तो.पण मला आवडलाय मग प्रश्न संपला.
म चांगलं आहे.आणि मला सॉरी म्हणायची गरज नाही .
ए हो ss.खरं सांग कुठंतरी बरं वाटलं असेल न मुलगी आपणहून बोलतेय म्हणल्यावर.
हं,खोट बोलता येत नाही मला.बर वाटल म्हणण्या पेक्ष्या विकेट काढलीस माझी.अस कुणी येऊन बोलेल स्वप्नात ही वाटलं नव्हतं.
का नाही होऊ शकत?पुढं ही होईल.आणि तस तुझा ही विचार केला असता बर मी.पण मी तुझ्याहून वयाने मोठी आहे जरा ते चाललं असत का तुला?
हो ते चाललं असत पण तुझं शिक्षण हि जास्तच आहे माझ्याहून.
हट रे,त्यानं काही होत नाही.
मंडप दिसू लागला.गाडी वळणावर थांबून पर्स मधून पॅड काढत म्हणली,पत्ता सांग रे तुझा.
कशाला?घर तर बघून आलीस न?
चमू पत्र लिहायच झालं तर लागतो हं पत्ता.मुकाट दे.
पत्रिका वग्रे टाकायची तसदी घेऊ नकात मला बोअर होतात लग्न गे बघतेच आहेस.
जळल्या चा वास आला का रे?
अजिबात नाही हो.
म दे पत्ता .फक्त एक पत्र तुझी आठवण तीव्रतेने येईल तेंव्हा टाकेन.
तुझं नाव गाव सांगत का नाहीस मग?मला भेटावं किंवा लिहावे वाटलं तर?
नको.का म्हणून विचारू नकोस. पण ओळख नसताना आपल्या ला जुना परिचय असल्या सारख वाटलं न? हेच नात मस्त वाटलं मला.ओळख वाढली कि अपेक्ष्या वाढतात मग सगळं गुंता च होतो.
हे बरंय आमच्याकडे पत्ता घ्या आणि,,
बोलायच काम नाही.वयाने जरातरी मोठी आहे मी तुझ्याहून मोठ्यांचा मान ठेवावा.
घ्या आपलंच खर करून.घे लिहून,,,,
मग पत्ता दिला.लिहून घेतला न गाडी पार्क झाली.चल बाय.परत हात मिळवत म्हणली,फिर नही मिलेंगे पण एक पत्र नक्की तुला.कधी माहीत नाही पण नक्की लिहीन.
आम्ही दोघे गायब झालो होतो हे वऱ्हाडी लोकांना कळलंच नाही.आजही कुणाला माहीत नाही अगदी त्या मित्राला हि ज्याने मला तिथं नेलं होत.
मग एक दिवस एक लिफाफा आला माझ्या नावावर.उत्सुकतेने उघडला.आत एक इंग्रजी कविता होती.


The House on the Hill
BY EDWIN ARLINGTON ROBINSON
They are all gone away,
The House is shut and still,
There is nothing more to say.

Through broken walls and gray
The winds blow bleak and shrill:
They are all gone away.

Nor is there one to-day
To speak them good or ill:
There is nothing more to say.

Why is it then we stray
Around the sunken sill?
They are all gone away,

And our poor fancy-play
For them is wasted skill:
There is nothing more to say.

There is ruin and decay
In the House on the Hill:
They are all gone away,
There is nothing more to say

पाकिटाच्या मागे कुणी पाठवलं त्याचा पत्ता असतो
तिथं बघितलं तर त्या जागीही पत्त्या ऐवजी कविता च होती

        Fly fly letter fly
        Bring back a good reply
         No poem to say to poet to be
           Just two words of love
             And remember me,,,,,

Yes I still remember you विसरणं शक्य आहे का?
पण शोधू कुठं तुला !!!

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

निर्लेप तवा

*निर्लेप तवा*
आज ट्युशन करत असताना भावाचा फोन आला.अरे काही खाऊन येऊ नकोस मी डोसे करतोय.म्हटलं ठिकय.
पण जाताना नेहमीच्या गाडीवर हदडून गेलो.
घरी आलो तर बंधू आत डोसे घालायची सुरुवात करत होते.हात पाय धुवून जरा टेकलो नाही ,तर बंधू हातात कालथा घेऊन आले.
अरे तो तवा जुना झालाय मला वाटत.डोसे सुटतच नाहीयेत.बघ जरा.
जाऊन बघितलं तर निर्लेप तव्याला डोश्याचा लेप घट्ट बसलेला.म्हटलं,तू जरा बाजूला हो मी प्रयत्न करून बघतो.
मग तवा लख्ख धुवून घेतला.डोसे घातले.सगळे व्यवस्थित सुटले.आठ ते दहा घालत होतो डोसे.मग भांडी घासली.कट्टा आवरला.बाहेर आलो तर निजा नीज झालेली.
सांगायचा मुद्दा असा,
       स्वयंपाक हि एक उच्च दर्जाची कला आहे.तीच तंत्र नीट आत्मसात करावं लागतं.घरातील आई,बहीण अश्या कुणी तरी नात्यातील बायका आणि बाहेर हादडताना ते लोक गाडीवर जे करतात त्यांना गुरू करावं.आई वग्रे प्रत्यक्ष शिकवतील.गाडीवाले हि विचारलं तर सांगतील.किंवा नुसतं निरीक्षण करावं बारकाईने.फुकाचा गर्व बाजूस ठेऊन लीन होऊन कुठलीही कला शिकावी लागते.उसमे क्या है? मी ही करेन!अस म्हणता येईल पण त्या करता हि साधना आवश्यक आहे.उगाच तो करतो किंवा ती करते न? म मला न जमायला काय झालं?तर जमेल कि ,पण मान तुकवून आधी मर्म तरी जाणा.
आता बंधूंच काय चुकलं?
तर निर्लेप तवा आहे म्हणजे त्यावर पदार्थ न चिकटता व्यवस्थित सुटतोच,हि एका अर्थी चुकीची समजूत आणि जे करतोय त्यात अहंकार बाजूस ठेऊन शिकण्याची वृत्ती आणि मग सरावाचा अभाव.
कसं? तर निर्लेप तवा कसा वापराल? त्याची निगा कशी ठेवावी हे त्याच्या खोक्यात लिहून दिलेलं असत.निदान ते तरी वाचून ते तंत्र सांभाळावे .
निर्लेप झाला म्हणून तो जास्त गरम करून डोसा फक्त जळणार च.बर वापरून झाला कि त्यावर गरम पाणी आणि साबण घालून हलक्या हाताने धुवून ठेवायचा असतो.त्याला जर तारेचा ब्रश लागला तर चरे पडतात.तिथं खाच तयार होऊन तो निकामी होतो.हे आमचे बंधू जाणत नाहीत.पोळ्या वग्रे करायला ही वापरतील आणि जिथं पदार्थ जळून चिकटला तो भाग नीट साफ करत नाहीत.नेमका तिथं डोसा चिकटून बसतो जळू सारखा.दुसरं गॅस मध्यम आचेवर ठेवावा लागतो.3/4माणस खाणारी असली तर नक्की 2 ते अडीच तास लागतात डोश्याना.
एकीकडे खाली टॉवर फॅन जोरात सुरू.गॅस मोठा ठेऊन डोसे होणारच नाहीत हे सांगून पटत नाही.कृती करून हि पटत अस नव्हे.तिचं गोष्ट पापड तळताना तेल चांगलं ताव आलेलं असलं तर पापड मस्त हसतो आणि फुलतो.कमी ताव ठेवला तर तेलकट होतो,कचवट लागतो.तिथं गॅस जरा जास्त आणि डोश्याना मध्यम ठेवायची गरज आहे.टॉवर फॅन मूळ गॅस ची फ्लेम सतत हलती राहून नीट सारखा ताव मिळत रहात नाही.
 तर जे पुरुष किंवा स्वयंपाक नव्याने करणारे असतील त्यांनी हि कला नम्रतेने शिकावी.आणि वाढताना ही अहंकार बाजूस ठेऊन प्रेमानं वाढावे म्हणजे त्या त्या पदार्थाची गोडी किंवा चव न्यारी च होते.यज्ञ कर्म असत महाराजा मग त्याच होम कुंड आणि यज्ञ सामग्री,हवन नियम नीट पाळावेच लागतात नाहीतर फल श्रुती निष्फळ च होईल.

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

घरातील कारखाना

गणपती जवळ आल्याची चाहूल सर्वत्र उघडलेल्या कारखान्यांना बघून जाणवलं.आमचा ,म्हणजे बाबांचा कारखाना आठवतो या दिवसात. आज विशेष लक्ष्यात आली एक गोष्ट ती शेअर करावीशी वाटली.
गणपतीचा कारखाना म्हटलं तर जागा असेल तितकी कमी च वाटते.आमचं पोयनाड च घर जवळपास एक एकर वर वसलेलं होत.तिथं आमच्या तात्यांनी म्हणचे बाबांच्या काकांनी कारखाना सुरू केला.500 गणपती त्या काळी करीत असत. दोन्ही अंगणी होती वापरायला,आणखी ही मुबलक जागा होती.काही वर्षांनी बाबा 9वर्षाचे होते तेंव्हा तात्यांच्या हाताला चोळ झाली आणि बोट कामातून गेल्या सारख झालं.तेच गणपती करत ,मग आता कसं करायचं?या विचारात सगळे होते.एक रात्री बाबांच्या स्वप्नात गणपती आला आणि म्हणला,तू का करत नाहीस?
हे बाबांनी तात्यांना सांगितलं.तात्या हसून म्हणले,बरं, पडलंय स्वप्न म्हणतोस तर बघ करून. आणि बाबांनी माती हातात घेतली ती वयाच्या 80 व्या वर्षा पर्यंत अव्याहत कारखाना सुरू होता जिथं गेलो तिथं.आज विशेष आठवण झाली ती एक गोष्ट म्हणजे जागा!
पोयनाडला मुबलक जागा होती.मग दादरला आलो तर वरचे दोन्ही मजले बाबा शिकवत त्या कॉलेज चे होते.बाबांनी नोकरी स्वीकारताना रहायला आणि कारखान्याला जागा हवी अशी अट घातली ती संस्थेने मान्य केली.कारण बाबा चित्रकला,हस्तकला,लेथ वर्क,फ्रेट वर्क,पपेट, संपूर्ण नाट्य शास्त्र आणि मातीकाम असे विषय एकटे शिकवत.त्या मुळे ते पूरक होत अभ्यासक्रमास.प्रश्न तिथं नाही आला.आला तो आम्ही नाला सोपऱ्यात आलो तेंव्हा.
बाबांचे हात मे महिना आला कि चुळबुळ करू लागत.बेचैन असत जर गणपती केले नाहीत तर.हे बघून आमच्या बिल्डिंग चे मालक म्हणले,जोशी तुम्ही इतकी वर्षे केलात कारखाना तर खंड पाडू नका.इथं तुमच्या घरातच सुरू करा.आजूबाजू ची काही माणसे नक्की घेतील मूर्ती मग काही नवी ही येतील.वाढली तर पुढे मोठी जागा घ्या भाड्याने.बाबांनी ते मान्य केलं आणि आमचा कारखाना इथं ही सुरू झाला.
आता ती रूम आठवते.दोन खोल्या दहा बाय दहा च्या.बाहेर एक छोटा व्हरांडा किंवा गॅलरी म्हणा.त्या ठिकाणी बाबांनी प्लायवूड बसवून तक्ता राम केला एरवी वापरायला .आणि गणपती च्या वेळी खाली साचे वर मूर्ती रहात.म्हणजे ती जागा बाहेरच व्यापली गेली होती.तिथं वर भिंतीवर ही फळ्या मारून गणपती असत त्या वर.आतली पहिली खोली.त्यात एक खाट, तिला लागून एक रॅक ज्यात माझी पुस्तक वग्रे आणि वर छोटा tv. पुढं दुसर रॅक ज्यावर आरसा आणि तेल,पावडर आणि इतर सामान. या खोलीच्या चारही भिंतीवर फळ्यांच्या 3 लाईन.नाही एक भिंत जी स्वयंपाक घरात पर्यंत लांब होती तिला बाहेर 3 आणि आत दोन अश्या फळ्यांचा भार ज्यावर मग गणपती बसत येऊन.मग आतल्या खोलीत ओटा,भांड्याचे कपात,डायनिंग टेबल आणि एक फळी गणपतीची अस होत. त्याच खोलीत संडास बाथरूम ही होत आणि खाली जी जागा मोकळी होती त्यात पाण्याच्या हंड्या कळश्या भरलेल्या असत.
गणपती सुरू झाले कि बाहेर मातीच्या पोत्यांची रास लागे तक्ता राम वर.हळूहळू सर्व फळ्या गणपतींनी भरून जात.लोक आले म्हणायचे,हे रंगलेले गणपती असे फळ्यावर रांगेत बघून अस वाटत गणपतींची पंगत बसलीय जेवायला.
या इतक्या अडचणीत आम्ही रोजचे व्यवहार करून गणपती ची माती मळण्या पासून ते लोक येऊन गणपती नेत तिथं पर्यंत करायचो.तयार होत आले कि बघायला येत लोक आपला गणपती कसा होतोय ते.घर असल्याने मग त्यांना चहा पाणी वग्रे करी आई.सर्वात जास्त कौतुक आईच वाटत.जमिनीवर ते भिंतीवर सर्वत्र मूर्ती असून एकदाही एकही मूर्ती खराब होणं वा तुटणे घडलं नाही तिच्या हातून.फोडणी वग्रे ही सावधान राहून करावी लागे कारण त्या वाफेने रंगलेले गणपती खराब व्हायची शक्यता होती.या पसार्यातून ती बाहेर आमचा बिल्डिंगचा च पण सार्वजनिक नळ होता तिथून पाणी भरत असे दुपारी 1 ते चार रांगेत नंबर येईल तसा. हो,बाहेर मोठं पिंप ही होत पाण्याच.
आम्ही चालताना ही घरात हात जास्त न हलवता चालायचे .रात्री झोपताना सगळे सावधान पोझिशन मध्ये च हात अंगा जवळ ठेऊन झोपायचो.हातरुण घालणं काढणं ही काळजीने करावं लागे. रंगाच्या वेळी रंगाची भांडी,फिरकीवर गणपती,ब्रश,फडकी आणि कॉम्प्रेसर अशी जंत्री असायची त्याच जागेत.गणपती घेऊन लोक गेले कि, करकचून बांधलेला देह कुणीतरी दोऱ्या कापून मोकळा केल्या सारख वाटे.मग रात्री मुद्दाम तंगड्या पसरून ,अहा काय मजा आहे न?किती जागा होतेय आता,अस म्हणायचो.
एकदा याच जागेत बाबांचे 20 विद्यार्थी विद्यार्थिनी काही कार्यक्रमानिमित्त गावात आल्या ते सर्वजण सरांकडे रात्री मुक्काम करून पहिली गाडी पकडून जाऊ म्हणून हक्काने आले.मग याच दोन खोल्यात आईन सर्वांना वाढलं.त्यातील मुलींनी मदत केली आईला. आणि रात्री 20 जण त्या खोल्यात आणि बाहेरच्या तक्ता राम वर झोपलो ही होतो.पोर आणि पोरी आईच्या पाया पडताना म्हणल्याही,बाई तुम्हाला खूप त्रास दिला न आम्ही ?पण जोशी सरांकडे राहून गप्पा मारून जाऊ ही इच्छा होती.आई म्हणली,आपलेपणा न आलात न? मग त्रास कसला.आमची जागा छोटी आहे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलेत म्हणून जमलं कि ग,माझं काय त्यात.आता परत या पुन्हा केंव्हाही.
मग याच जागेत पाणी भरलं कंबरभर 26 जुलै ला.तेंव्हा कारखाना नव्हता घरात.भाड्याने जागा घेतली होती तिथं होता.आम्ही रंगवत बसलो होतो नी पाणी चढू लागलं.गावातले लोक घरची बाकडी पाण्यातून ढकलत घेऊन आले आपणहून गणपती बुडतील जोश्यांचे म्हणून.तिकडं घरी मात्र संडास बाथरूम मधून जे पाणी चढलं ते काही मिनिटात कमरेला टेकल.शेजारच्या पोर पोरीच्या साथीने आईने फ्रीज उंच जागी बाहेर नेऊन ठेवला पण पावसाने तो निकामी केलाच.मग पुढील आठवडा आम्ही तळ मजल्यावरचे लोक पहिल्या मजल्यावर राहिलो.सर्वांनी एकत्र जेवण केलं.बिल्डिंग एक कुटुंब झाली.
आज आठवलं तर हे सर्व प्रत्यक्ष  अनुभवून हि विश्वास बसत नाही कि त्या 220 चौ फु जागेत इतकं करत होतो आम्ही आणि ते ही आनंदाने.
गणपती बाप्पा मोरया🙏🏻

गुरुवार, २४ मे, २०१८

*पाऊलाची ओळख*

*पाऊलाची ओळख*
आमच्याकडे कायम असणारे आबा आणि गणपत-सरस्वती ची जोडी म्हातारपणा मूळ घरी बसली.घरच सर्व करणं एकट्या आईच काम नव्हतं.चार पैकी तीन अंगणी झाडली तरी दीड तास सकाळचा जायचा. कुणीतरी कामवाली बघायला सांगितलं गेलं ओळखीच्यात.एक दिवस बदक आजी दारात उभी राह्यली.विधवा होती. बुटकी,पाय वाकडे होते तिचे त्या मूळ चालताना वर खाली होत असे.म्हणून गावातली कार्टी तिला बदक आजी चिडवत हे माहीत होतं. आमच्या घरापासून वरच्या अंगाला तिची खोली होती त्या मूळ जाता येताना पाह्यलं होत.मुलांनी चिडवलं कि हातात धोंडा घेऊन माग जायची,पण कधी मारलन नाही कुणाला फक्त तोंडाने बोलायची.आई बाहेर आली.का हो आलात ?म्हणून विचारलन तर म्हणली,कामाला हवं होतं न तुमच्याकडे म्हणून आलो.आई म्हणली,आजी हवंय खरं पण तुम्ही नको.तुमच्याकडून काम करून घ्यायला कसं तरी वाटेल मला.आजी म्हणली,मी करती न काम दुसऱ्यांची हि, तुमच हि करेन.
अहो आजी भांडी धुणी आणि आता मे महिन्यात विहीर खाली गेलीय तेंव्हा प्यायला 4 खेपा शंकराच्या विहिरीवरून पाणी हि आणायचं आहे तुम्हाला कसं जमेल.
यावर जरा विचार करून म्हणली,थांबा जरा आलोच मी काय.म्हणून गेली आणि पाच मिनिटात आपल्या मुलीला घेऊन आली.मी नाय हि करील मंग तर तर झालं.लीला उभी होती.रंग काळा.दात जरा विरळ.पण काटक अंगलट.ती पटकन पण हळूच म्हणली,ताई तुम्ही नका काळजी करू मी करेन सर्व.
बदक आजी म्हणली,बघा ताई आजवर कुठं कामाला जायच म्हणल तर नाय म्हणायची आज तुमचं काम मिळतंय म्हणलो तर आली लगेच.मग आई न तिला जवळ बोलवलन आणि काम समजवलन.तुम्ही बिनघोर रहा ताई मी हाय.
मग लीला कामाला येऊ लागली.सगळं काम चोख.धुणे भांडी कुणी केलेलं आईला पसंत पडणं कठीण असे पण लीला च काम आईला पसंत पडलं.पहाटे लवकर उठून लीला पाण्याला जायची.दूरवरून आणावे लागे म्हणून आई मला म्हणली, सलील आपला रस्ता खडकाळ आहे तू निदान बिवलकराच्या घरापासून तिच्या कडून हंडे घेऊन ये बघू ती पोर किती करील.मग मी गेलो.ती पाणी दोन हंडे एकावर एक आणि त्या वर एक अजून कळशी.एक हंडा डाव्या बगलेत आणि उजव्या हाती पोऱ्या अस घेऊन घामाघूम होत येत होती.मी पुढं झालो म्हटलं दे मी नेतो.त्या अवस्थेत जॅम हसली अन म्हणली,सलीन दादा हे तुला जमणारे का ? मी काय बोलणार.नुसता तिच्या सोबत आलो.आईने सर्व ऐकलन न म्हणली,ठिकय मग तू विहिरीवर रहा पाणी ओढून भांडी भरून दे.म्हटलं ,चालेल जातो.परत लीला म्हणली,दादाला कुठं पाठवलाय ताई?तिथं सर्व बायका असतात तो बिचारा कुठं जाईल मधच. एकूण तिनं काही ऐकल नाही.अशी कामसू होती.परत कधी काही मागत नसे.सणासुदीला आई नेहमीच गडी माणसं घरी जेवायला बोलावीत असे तस लीला ला म्हटलन तर लीला लाजत असे.नको ताई तुम्ही बांधून द्या मी घरी जाऊन खातो बेबी सोबत.
अग तुझ्या घरी ही डबा देत्येय न मी तू इथं च जेव.पण ती थांबत नसे.तिच्या घरी तिची धाकटी बहीण ही होती. या दोनच पोरी म्हातारीला.धाकटी बेबी.जन्मजात आंधळी आणि पायाने लुळी. ती खोली बाहेर बसून असे.या दोघी नसल्या तरी एकटी शांत बसायची.लीला ला निरोप द्यायला गेलो तर हसून म्हणत असे,हा सांगतो रे दादा तिला. तू कसा हायस. अशी माझी चवकशी करी.आईने पाठवलेला अमुक जिन्नस खूप छान झाला होता मी भरपूर खाल्ला हं एकटीनं म्हणायची.पोयनाड सोडे पर्यंत लीला येत होती घरी.
मग बरेच वर्षांनी पोयनाडला गेलो.मित्रा सोबत भटकायला बाहेर पडलो.लीला राहायची ती खोली बंद होती.तीच लग्न झालं आणि बेबी न आजी दुसरी कडे रहातात अस तो म्हणला.परत येताना एक ठिकाणी विक्या म्हणला,तुला बदक आजी न बेबी ची आठवण झाली होती न त्या हल्ली या घरात रहातात बघ.जातो का हाक मारायला?म्हटलं नक्की चल जाऊयाच. विक्याने हाक दिली,ए बाय बघ कोण पाहुणा आलाय तुझ्याकडे.लांबून दिसलं बेबी जरा मोठी झालेली दिसली तरी तशीच बसली होती दाराकडे नजर लावून दिसत नसलं तरी.मी पायऱ्या चढून दारासमोर उभा राह्यलो.मी  म्हटलं,काय गो ओळखलं का मला?
क्षणभर पावलं वाजल्यापासून ती डोळ्यांची पापणी बारीक करून विचार करत होती ती अचानक म्हणली,त ! न ओळखायला काय झालं ?सलीन दादा न तू ?कसा आहेस रे आणि ताई ,बाबा ,शैलू सर्व कसे आहेत.
मी चाट पडलो.मनात आलं हिला दिसू लागलं की काय?
बेबे कसं गो अचूक ओळखलस तू इतक्या वर्ष्यानी?दिसत का तुला आता?
तोंडाने चक अस मोठा आवाज करत हसली न म्हणली,नाय रे.
म ओळखू कसा आलो मी तुला?
तुझी पावलं वाजली न ,म मी ओळखलं.मी अवाक!मग माझ्या सोबत कोण आहे सांग बघू?
तो विक्या दादा आहे कि.
या पोरीने माझ्या पावलांच्या आवाजावरून ओळखलं हे पटतच नव्हतं पण ते खरं होत.मग तिच्या शी जरा गप्पा मारून निघालो सुन्न होऊन.
देव तरी असा कसा?एकटी विधवा बदक आजी.पदरी दोन पोरीतली एक आंधळी न पांगळी. दुसरी धडधाकट पण लग्न होऊन गेलेली.आता या राह्यलेल्या मायलेकी कसं आयुष्य काढतील?
इतका वनवास देऊ नये देवानं कुणालाही.काही वर्षे खडतर काढली ठिकय पण नंतर तरी किमान सुख द्यावं सर्वांना.विशेषतः कष्टकरी लोकांना तरी अस बेभरवशाचे जीणे नको रे देऊ.त्या माय लेकरांना सुखी ठेव रे अस शंकराच्या देवळा समोरून जाताना त्याला म्हटलं.अशी माणसं विसरता येत नाहीत आणि आपल्याला त्यांच्या करता काही करता आलं नाही याची खंत वाटते नेहमी.

रविवार, ६ मे, २०१८

बाईक हणताना रस्त्या ची वेगवेगळी रूप दिसतात.काही लाल मातीची,कधी खडकाळ,पावसात तर त्यात पाण्याची धार बिलगलेली.महामार्ग नागराजा सारखा पहुडलेला असतो.कधी अगदी नाकासमोर जाणारा तर कधी नागमोडी वळण घेत.कधी आजूबाजूस प्रचंड मानव वसाहत तर कधी निसर्ग कुशीत घेऊन.शहर जवळ येईल तसा गोंगाट वाढत जाणारा आणि कधी निरव शांतता.दिवसा तर समोर तापलेली हवा मृगजळ ही दाखवते नमुना म्हणून.रात्री हाच रस्ता सुस्तवलेल्या अजगरा सारखा शांत पडून असतो.शरीरभर गार लहर जवळीक करू पहाते. हे कुणाला गूढ वाटेल कुणाला रोमँटिक मला एकांतवास जो शांती देणारा असतो तसा वाटतो.बाईकही या वरून चालताना एक मस्त पण हलका सूर लावून चालत असते आश्वासक पण.आश्वासक अश्या करता कि,हा आवाज इंजिन उत्तम काम करतय काळजी नसावी असा विश्वास देणारा म्हणून.मग आपण आपल्या विश्वात रमतो.गाडीवर कंट्रोल एक मेंदू अगदी व्यवस्थित करत असतो.दुसरा मात्र स्वतःच्या मुशाफिरीत मग्न होतो.अशी दुहेरी मुशाफिरी सुरू असते.कधी गंतव्य स्थानाची ओढ असते पण मला असा रस्ता संपू च नये असं वाटत.बरेचदा कुणी त्या रस्त्यावरील सह प्रवासी दोन पाच मिनिटं इतकं मोकळं बोलतात,वागतात कि अजून दुनियेत माणुसकी शिल्लक आहे याचं आश्चर्य मिश्रित समाधान मिळत.
हेल्मेट वर समोर च्या गाड्यांचा प्रकाश आभासी प्रकाशाचा खेळ करून दाखवत असतो.त्याला न फसता मार्ग नीट काढायचा असतो.मग त्याला साथ द्यायला हँडल वरचा आरसा मागच्या वाहनांचा प्रकाश खेळ सुरू करतो.हळू हळू याची सवय होते आणि हे ही थ्रिल आपण मास्टर करतो.
अस सुरू असताना एखादी पाय वाट अचानक खाली उतरून तिच्या सोबत यायला भूल घालते.वेळ असेल तर पडावं बळी त्या भुली ला.कारण बाईक म्हणचे स्वातंत्र्य आहे.अशी अनोळखी वाट चाका खाली घ्यावी आणि मन सांगेल तिथं जावं.
हे अनुभवत असताना परत गुलजार साहेब आठवतात.त्यांनी हा रस्ता प्रपंच  इतका मस्त विशद करून सांगितलाय. त्याला तोड च नाही.ते ऐकल असलं तर त्याच प्रत्यंतर मिळत असत आपल्याला. शेवट कविता पुस्तकातून बाहेर पडून अशी अनुभवली कि जास्त कळते.
इस मोड से जाते है
कुछ सुस्त कदम रस्ते
कुछ तेज कदम राहे
पत्थर कि हवेली को
शिशे के घरोदे मे
तिनको के नशेमन तक
इस मोड से जाते है
खरच तसे असतात रस्ते.घाईत असणारे हायवे.सुशेगात जाणाऱ्या पाय वाटा
मग राजे हो रविवारी चिंता सोडून बाहेर पडा. गूळ पोहे भरून घ्या एक पाण्याची बाटली सोबत असू दे.रोजची टेन्शन राहू देत बाजूला आणि मारा किक बाईक ला.आणि मस्त वाचत जा बोर्ड,
अमुक तमुक ग्राम पंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे मग येताना त्याच बोर्ड ची मागची बाजू सांगेल
या परत,आमची हद्द संपली आपला प्रवास सुखाचा होवो
🙏🏻🌹

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

पेणचे पोहे

आपण नेहेमी खातो ते पोहे कसे तयार होतात ते पहा . पेण एसटी स्थानकाच्या [ गावातल ] मागे हि गिरण आहे . गिरणीचे मालक कै . ल . के . जोशी . यांनी हि गिरण सुरु केली . पेण मधील बायका यांच्या कडून पोह्याच्या कण्या नेउन पापड करून मुंबईत विकत असत . पेणचे पापड इथून सुरु झाले . आता या गिरणीत सर्व प्रकारची पीठे,पापड,मिरगुंड,तांदूळ . कुरडया . तांदूळ असे अनेक जिन्नस मिळतात . वडीलांचा व्यापार मुलांनी अविरत कष्टाने वाढवून भरभराटीस आणला आहे .




*आणि बदनाम कुत्रा झाला*


माझा आवडता प्राणी.इमानदार शब्दाची मूर्तिमंत आणि जिवन्त व्याख्या. आवड आहे म्हणून त्या विषयी माहिती घेत असतो.नेटवर अचानक एक स्टिंग ऑपरेशन समोर आलं एका चॅनल च.पाकिस्तानी आहे अँकर पण समाजातील अनेक भ्रष्टाचार उघड करत असतो.ARY नाव चॅनल च.त्यांनी शोधलेला हा नवा फ्रॉड बघून चाट पडलो.
पाकिस्तानी सिंध ,पंजाब प्रांतात एक धंदा खूप जोरात आहे.माग काढणारे कुत्रे पैसे घेऊन मागविण्यात येतात. अश्या एजन्सीज खूप आहेत.कार्ड वर सैन्य दल किंवा पोलीस दलाचा लोगो असतो आणि एखादा मेजर हि उच्च पदावर आहे असं लिहिलेलं असत.
तिकडं गावात समजा म्हैस,बकरी किंवा अन्य वस्तूंची चोरी झाली तर या कुत्रे वाल्याना बोलावलं जात.ते 25 ते 50 हजार घेतात. मग आले कि पोलिसां सारखी चवकशी करतात.मग कुत्रा सोडला जातो.कुत्रा गावभर हुंगत एखादया घरात घुसतो आणि खाटेवर जाऊन बसतो.याचा अर्थ चोर त्या घरातून आला होता.मग त्या घरच्यांना गावाबाहेर हाकलून देतात.घर जाळून टाकलं जात.मग दोन्ही कुटुंबात पिढ्यान पिढ्यांच वैर सुरू होत शेकडो खून पडलेत.कारण काय ?तर कुत्रा जाऊन बसला म्हणजे खर आहे.
हे अस कैक वर्ष सुरू होत.अचानक एक माणूस चॅनल वाल्यांकड आला.तो म्हणला हे सगळं खोटं असत.निव्वळ फसवणूक होते आहे.मी ट्रेनर होतो. पण एक निष्पाप कुटुंब बळी पडल आणि मला पश्चाताप होतोय.तुम्ही हे दाखवा म्हणजे थांबेल सगळं थोतांड.
मग त्यांना त्या ट्रेनर न हे कसं केलं जातं ते सांगितलं.त्या चॅनलच्या माणसांनी एका गावातील लोकांना विश्वासात घेतले आणि सापळा रचला.कुत्रेवाले आले.पैसे घेतले.कुणावर संशय आहे विचारलं.नेमका त्या घरात कुत्रा जाऊन बसला.मग तो ट्रेनर पुढं आला आणि त्यानं तो कुत्रा परत हवा तसा चालवून दाखवला.तेंव्हा सगळं पितळ उघडे पडले.त्या लोकांनी गुन्हा कबूल केला.
आता होत काय होत नेमकं?तर,
कुत्रा सोडला कि ट्रेनर ओरडे, चल चल कि कुत्रा पळतो समोर.मग डावी कडे वळायला हवा असेल तर ट्रेनर म्हणतो शाबास शाबास,उजवी कडे ही असाच शब्द ठरलेला असतो.हवा त्या घरात घुसला कि कमांड असते,चल काम कर ,मग कुत्रा जागी च किंवा खाटेवर बसतो.म्हणजे ते घर चोराच ठरत आणि उध्वस्त होत.
अशी कैक घर उध्वस्त झालीत नि शेकडो खून पडून पिढीजात वैर निर्माण झालीत.
यात आणखी वाईट म्हणजे
कुत्रा बिचारा उगाच बदनाम झाला.🐶

युट्युबर

*यू ट्युबर*
जर तुमच्या पाल्यांनी म्हटलं कि, मॉम,डॅड मी यू ट्युबर होणार.
  तर दचकू नका.हे नवीन रोजगाराचे साधन निर्माण झालेल आहे.जर त्याच्याकडं कम्युनिकेशन स्किल आहे,ज्या विषयाचा vlog तो तयार करणार म्हणतोय त्या विषयात त्याला नुसता इंटरेस्ट नसून बऱ्यापैकी ज्ञान आणि अनुभव असेल तर प्रयत्न करून बघ म्हणायला हरकत नाही.
आधी blog होते जिथं तुम्ही लिहू शकत होता. ते आहेत अजूनही ,पण आता हे दृक्श्राव्य माध्यम आलं आहे.काय असत हे ?ज्यांना माहीत नसेल त्यांच्याकरता माहिती देतो.तू नळीवर तुम्ही आपलं चॅनल फुकट उघडू शकता.तिथं तुम्ही तुमचे व्हिडीओ अपलोड करू शकता. यात ते अपलोड होताना कुठल्या सर्च लोकांनी मागितला तर चॅनल च नाव यावं हा पर्याय असतो तो फीलअप करावा.म्हणजे समजा मी तबला अपलोड करतोय तर मला,तबला,तबला लेसन, इंडियन क्लासिकल म्युजिक वग्रे शब्द तिथं भरेन. म्हणजे या शब्दाचा शोध कुणी घेतला कि माझा व्हिडीओ दिसेल सर्च मध्ये.दुसरा मुद्दा असा कायदेशीर आहे कि, तुमचा व्हिडीओ हा तुम्हीच तयार केलेला असावा.म्हणजे रेकॉर्डिंग झालेली गाणी,सिनेमे किंवा त्याची क्लिपिंग त्यात नसावी जेणे करून संमधीत लोक त्यावर आक्षेप घेणार नाहीत.युट्युब हे इतकं कसोशीने पाळत कि समजा तुम्ही ट्रिप ला गेलात तो व्हिडीओ टाकलाय पण त्यात कुठंतरी फिल्म च गाणं वाजतंय कुणीतरी लावलेल्या स्पीकरवर तर तुम्हाला नोटीस मेसेज येतो कॉपी राईट भंग होतोय या मूळ.एकतर ते काढून टाका,अख्खा व्हिडीओ डिलीट करा.किंवा कंपन्या लक्ष ठेऊन असाव्यात.कारण मी नाट्य संगीताचा व्हिडीओ टाकला तेंव्हा मेसेज आला होता पण त्यात हे ही आलं कि कम्पनीला काही ऑब्जेक्शन नाही ठेऊ शकता.
चॅनल च नाव तुम्ही ठेऊ शकता.असे व्हिडीओ काही दिवस निरीक्षण केले जातात.युट्युब मग जर कुणी ऑब्जेक्शन घेत नाही तुमच्यावर याची खात्री झाली कि तुम्हाला जास्त लेंथ चे व्हिडीओ टाकण्यास परवानगी देत.मग तुमचे व्हिडीओ लोक जास्त संख्येने पाहू लागले तर तुम्हाला एक पर्याय उपलब्ध होतो.त्यात जाहिराती टाकल्या तर चालेल का ? हो म्हणालेत तर त्या येऊ लागतात व्हिडीओ च्या मध्ये.मग त्या व्हिडीओ ला अमुक एक हिट्स मिळाल्या तर त्याचे पैसे तुमच्याकडे जमा होतात कालांतराने.पण यात ही प्रकार आहेत.त्या जाहिराती संपूर्ण बघितल्या का स्कीप केल्या गेल्या त्या नुसार पेमेंट होत.अर्थात हे इतकं सोपं नसत.परत त्यात गुगुल चा ही हिस्सा असतो.उरलेलं काही टक्के तुम्हाला मिळतात.आणि एक महत्वाचा घटक म्हणजे तुमचे सबस्क्रायबर किती आहेत ?म्हणजे नुसते बघून जाणारे वेगळे.ते तुमच्या हिट्स वाढवतात.आणि काही जण चॅनल आवडला तर तुम्ही पुढं कधी काही पोस्ट केलंत तर लगेच कळावे म्हणून ते सबस्क्रायबर बटन दाबतात आणि तुमचे ग्राहक होतात म्हणा पैसे न देता😊
मग जास्त सबस्क्रायबर तर जास्त उत्पन्न तुमचं.
आता हे सगळं वाढीस लागायला तुमच स्किल,नॉलेज आणि सादरीकरण महत्वाचं ठरत.या करता यातील यशस्वी लोक स्वतः चा प्रोफेशनल सेटप ठेऊन असतात.व्हिडीओ करता नवा विषय घेणं,तो प्रोफेशनली रेकॉर्ड आणि एडिट करून प्रेझेंट करणं या करता हे गरजेचे आहे.म्हणजेच हा फुल टाईम बिझनेस आहे बऱ्याच लोकांचा.मग लोक कमेंट मध्ये आपली मतं मांडतात जी बरी वाईट दोन्ही असतात.इतर युट्युबर तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करायची शक्यता असते.हे सर्व सहन करून मार्ग काढत राहावं लागतं.
समजा तुम्ही ग्याजेट विषयी चॅनल चालवताय तर काही कम्पन्या तुम्हाला त्यांची प्रोडक्ट पाठवून रिव्ह्यू द्यायला सांगतात.यात प्रलोभन ही दिली जातात.काही मोबाईल कम्पन्या चॅनल वाल्याना गिफ्ट देतात किंवा चक्क परदेशवारी घडवून आणून मोबाईल विषयी रिव्ह्यू अनुकूल करून घेतात.पण लोक चाणाक्ष असतात हल्ली बरेचदा.असे पेड रिव्ह्यू त्यांच्या लक्षात येऊन तुमचे फॉलोअर्स कमी होऊ शकतात.
काहीजण आपलं दैनंदिन जीवनच टाकत असतात.मी उठल्यावर काय केलं,घरात कशी मस्ती चालते,माझा कुत्रा कसा आहे,माझी मॉम नवी गाडी घेउम आलीय अस दाखवत असतात आणि प्रचंड चाहता वर्ग असतो त्यांचा.अशा लोकांना मग युट्युब बक्षीस म्हणून लोगो असलेल्या बटणाची प्रतिकृती भेट करत.त्यात ही सोन्याचं,प्लॅटिनम च अस असत.
हे युट्युबर ग्राहक वाढवायला गिव्ह अवे करतात.म्हणजे चाहत्यांना बक्षीस देतात.
आपल्या चॅनल च गेट टू गेदर ठेवतात.तिथं त्यांचे चाहते त्यांना भेटायला येतात.गिफ्ट ही आणतात.आणि काय असाव चॅनल वर याची चर्चा होते.
सो एकदम सिरीयस बिझनेस न भौ.
काही कलाकार वेब सिरीज करतात.आपलं टॅलेंट आपण दाखवतात.
काही महिला पाकसिद्धी, रांगोळी,हस्तकला चे चॅनल चालवतात.त्यांच उत्पन्न भरघोस आहे.
काही निगेटिव्ह पब्लिसिटी करतात.धिंच्याक पूजा हे उत्तम उदाहरण. गाणं तिचं बेकार असलं तरी प्रसिद्धी,पैसे आणि काही चॅनल वर उपस्थिती मिळाली न तिला.
नवीन पर्याय आहे.करून बघायला हरकत नाही.

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

*कौन्सिलर, सेमिनार*

*कौन्सिलर, सेमिनार*
एका मित्राच्या मुलाचा मेसेज आला लिंक सकट. काका याला ऐक. मस्त आणि सोपं करून समजावतो सगळं.म्हटलं ओकेज, बघतो. मग त्या माणसाचा व्हिडीओ बघितला.खरोखरीच उत्तम वक्ता होता.आणि तो स्वतः आयुष्यात सफल होता.म्हणजे आपल्या पायावर मेहनतीने उभा राहिलेला माणूस.
    मग विचार आला आमच्या त्या पुतण्या न हे ऐकल उत्तम च झालं.पण त्याला हे का आवडलं?
तर विचार केल्यावर अस वाटलं कि ते त्याच्या बाजूच वाटलं असावं त्याला.तो वक्ता सांगत होता,तुम्ही तुमच्या मनाचा आवाज ऐका. कुठल्याही फिल्ड मध्ये यशस्वी होऊ शकता. तुम्ही वेगळी वाट निवडलीत तर तुम्हाला ते करू नको म्हणणारे मिळतील.ते का नको म्हणतात,हे त्यांना विचारा. मग तुम्हाला अस आढळेल कि ते नको म्हणतात कारण तुम्ही जे करू पाहत आहात ते त्यांना जमणं शक्य नाही.आणि ते करू शकत नाहीत तर तू काय करणार?त्या लोकांना त्या क्षेत्रातील काहीच माहिती नसते.तुम्ही विचलित न होता पुढं जात रहा.
अस एकूण सगळं होत.पण त्या माणसाने सांगितलेल्या इतर गोष्टी कडे त्या मुलाचं ध्यान गेलं नसणार .जेंव्हा तो माणूस सांगत होता कि, मलाही मी वेगळं क्षेत्र निवडलं तेंव्हा विरोध झाला पण मी यशस्वी झालो.हे इतकंच लक्ष्यात येत या पोरांच्या पण त्याने नंतर त्या करता जे डोकं लढवल,जे श्रम घेतले आणि भांडवल आपलं आपण उभारल त्या कड हि पोर लक्षच देत नाहीत.
त्या पोराला हे पटण्याचं कारण,बघ काका आमच्या कडे हे असंच असत.मी काही करायचं म्हटलं तर घरचे लगेच विरोध करतात.म्हणजे त्याच्या म्हणण्याला दुजोरा देणार फक्त त्यानं घेतलंय.
  आता त्याच्या घरच्यांना त्याची लायकी माहीत असते म्हणून विरोध होत असतो.त्या माणसाच्या आड लपू पाहत होता तो पोर.स्वतः ला ओळखणं त्याला अजूनही जमत नाही हे माझं निरीक्षण.
हे कौन्सिलर, व्यक्तीमत्व विकास शिबिर वग्रे अलीकडची उपज आहे.ते वाईट नव्हे.जर समाजाला त्याची गरज असेल तर ते हवंच.सुधारणा नकोत अस अजिबात नाही.पण काही दशकांपूर्वी हे असलं काही नव्हतं.जरी तेंव्हा इतक्या सुधारणा,नवी क्षेत्र नव्हती तरी त्या काळी जे अपडेट होत ते होतच ना!
तेंव्हा शेतकरी आत्महत्या जवळ जवळ नव्हत्याच.अपवाद म्हणून कुठं घडलं असलं तर.
प्रेम भंग आणि त्यातून घडणारे गुन्हे ही इतके नव्हतेच.मग आज हे का घडत?
तर हल्ली कमी वेळात जास्तीत जास्त फायदा आणि तो हि लायकी नसताना हवा असतो.खूप कमी वयात मोठी पॅकेज घेतात तरुण.मुबलक पैसा असणं मग सांभाळणे जमत नाही.ती  किंवा कुठलीही ताकद सांभाळून रहाणं हे जास्त कठीण आहे.उदाहरणार्थ,समजा तुम्ही एखाद पिस्तुल खरेदी केलंत.ते बरेच दिवस पडून आहे पण ते वापरता येत नाही.अश्या वेळी ते वापरून बघायची इच्छा प्रबळ होते.ती कंट्रोल मध्ये ठेवण हे ते शस्त्र विकत घेण्याहून कठीण आहे.किंवा जर कुणी मनाविरुद्ध वागल तर ते शस्त्र बिनदिक्कत वापरलं गेलंय प्रगत राष्ट्रात.शाळेत गोळीबार का केला?तर काही नाही होत पिस्तुल बघितलं वापरून,हे उत्तर मिळाले मुलाकडून अस वाचनात आलं होतं. तसच,लंडनच हिथ्रो विमानतळ कुणा शाळकरी पोरानं हॅक करून सरकार ला जेरीस आणलं.त्याला पकडल्यावर तो ही हेच म्हणल्याच आठवतंय.म्हणजे इथं शस्त्र बदललं पण ते सांभाळून ठेवण आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरणं हि ताकद कमी पडली.पुराणकालीन योद्धे हि त्यांची अस्त्रे उठसूट वापरत नव्हते.
जर आपण जबाबदारीने वागलो,स्वतः ची कुवत ओळखून वागलो,श्रम घेण्याची तयारी असली आणि पेशन्स असले तर कुणाच्या ही कौन्सिलिंग ची गरज नाही.गरज असते ती फक्त डोळसपणे जगण्याची.आयुष्य जे अनुभव देत असत ते दिलखुलास अंगावर घेऊन,त्यातून शिकून पुढं जाण्याची.हल्ली बरेचदा आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने मुलांना नाही ऐकायची,वाट बघायची सवय राहिली नाही.मग मालकी हक्काची जाणीव मात्र तीव्र झाली .मी मोठा झाला.यातून ती किंवा तो मला नाही म्हणतो/म्हणते,मला डीच करते म्हणजे काय?मग ज्या व्यक्ती वर प्रेम केलं म्हणतात तिच्यावर हल्ला होतो.
त्या माणसाने हे ही विशद करून सांगितलंय त्याच्या लेक्चर मध्ये.तुम्ही ब्रेकप झाल्यावर उदास का होता?
तुम्ही प्रेमात पडायच्या आधी सुखी होतात?तर होतात. पडून दुःखी झालात?झालात.मग आनंद साजरा करा न!अरे मी दुःखातून बाहेर आलो.हवं तर दुसर प्रेम करा.नाही जमलं म्हणून निराश व्हायची काय गरज आहे?तुम्ही असे वागता कारण इतर सर्व तसेच वागत असतात.इतरांकडे गर्ल फ्रेंड आहे,इतरांकडे गाडी आहे माझ्याकडं नाही.या रॅट रेस मधून बाहेत या.कारण ती न संपणारी यादी आहे.मला गाडीची आत्ता खरच गरज आहे का?का मित्रांना किंवा समाजाला स्वतःची लायकी किंवा स्टेटस दाखवून द्यायला गाडी घ्यायचीय?तस केलंत तर तुम्ही कधीही सुखी होणार नाही.मग तुम्ही घेतलेली होंडा सिटी जी मिळवणं मध्यमवर्गीय लोकांना सहज शक्य नाही ती ही तुम्हाला सुख देणार नाही कारण तो वर तुम्हाला अस वाटेल अरे,bmw हवी.
एकूण पूर्वी हे सगळं घरचे किंवा इतर मोठी माणसं सांगत असत.आपल्या धर्मात हीच शिकवण आहे.कीर्तन आणि सो कॉलड बाबा लोक हेच सांगत असतात.खरंतर स्वतः ला वेळीच ओळखता आलं तर या लोकांची गरज च नसते.एकूण समाज मानसिक खचत चाललाय म्हणून बाबा लोकांची चलती सुरू आहे.कौन्सिलर बिझी होतायत.
मग अश्या समाजाला योग्य कौन्सिलर हवाच. फक्त त्याच म्हणणं नीट विचारपूर्वक ऐकून तस वागा हि.
हे सर्व त्या आमच्या पुतण्याला हि प्रत्यक्ष भेटलो तर सांगीनच.मग कदाचित तो म्हणेल,काका तू सुद्धा घरच्यासारखं च बोललास😀

सोमवार, ९ एप्रिल, २०१८

गिर अभयारण्य

टायगर च्या निमित्ताने वाचन केल तर गिर च अभयारण्य वाचनात आलं. त्याच तसही कुतूहल होतंच. तिथं फॉरेस्ट गार्ड म्हणून महिलांची टीम कार्यरत आहे. त्या रात्री ही बाईकवर पेट्रोलिंग करतात.सोबत टॉर्च,असलं तर पिस्तूल आणि वॉकी टॉकी. एकूण हे सर्व गार्ड सिंहांच्या अंगवळणी पडलेत.सिंहाचा कळप विसावलेला असतो आणि त्याच्या समोर हे गार्ड शेकोटी पेटवून डबे खायला बसतात.त्यांची मोजणी करतात.
    तर फार पूर्वी वाघ सिंह खूप होते.त्यांची शिकार इतकी झाली कि अशी अभयारण्य उभारावी लागली.हळूहळू हा प्रयत्न यशस्वी झाला.आज मला वाटत 500 वाघ सिंह आहेत तिथं.गावकरी हि या सिंहाना सरावलेत.त्यांच्या झोपडी बाहेर गावकुसाबाहेर सिंह एखादी म्हैस मारून खात बसलाय आणि थोड्या अंतरावर त्या झोपडीचा मालक आणि अन्य गावकरी हे दृश्य बघतायत.आणि त्यांच्या वर सिंह हल्ला करत नाहीत.गावात जाताना छोटा ओहोळ बाईक वर बसून दोन गावकरी पार करतायत आणि त्यांच्या बाईकला अगदी जवळून सिंहिण आपल्या पिल्लांना घेऊन निघून जातेय.हे दोघे ही बाईक उभी करून तिला जाऊ देतायत.जस पाळीव कुत्रा बाजूनं जावा.
झालं काय कि, अभय मिळाल्याने हरीण,माकड आणि सिंह यांची संख्या वाढली.आता सिंहाना खायला पंचाईत पडणार नाही असं वाटत आपल्याला पण झालं उलट.
माकडं हरिणांच्या कळपा सोबत फिरतात.त्यांची दोस्तीच झाली म्हणाना. मग सिंहाची चाहूल लागली कि माकड आरडा ओरडा करून हरिणांना सावध करतात आणि हरण पळून जातात.सिंहाची शिकार निसटते.
    इकडं गावकऱ्यांची शेत आहेत त्यातील पीक तयार झालं कि हि हरण रात्री येऊन पिकावर तुटून पडतात.त्यांना मारता येत नाही.मग गावकऱ्यांनी अनुभवांती एक इंटरेस्टिंग युक्ती सुरू केलीय.रात्री शेतात जातात आणि हरणांचा आवाज काढतात.त्या हाकेला फसून हरण शेतात येतात.
तिकडं सिंहाचा कळप गावा बाहेर जमलेला असतो रात्र अजून व्हायची वाट बघत.कारण जो वर गावकरी झोपत नाहीत आणि शेवटचा दिवा जात नाही तोवर वाट बघावी लागते.त्यात कुत्रे वेशीवर असतात ते लगेच भुंकू लागतात.तर हा दबा धरून बसलेला कळप गावकऱ्यांनी काढलेल्या हरिणांच्या आवाजात ओळखतो.हळूच खाली येऊन पोझीशन घेतात.हरणांचा कळप टप्प्यात आला कि चारी कडून योजनाबद्ध हल्ला करून शिकार साधली जाते.त्यांच्या कुटुंबाचं पोट भरत आणि गावकऱ्यांच पीक वाचत.कधी मधी एखाद गावातील जनावर किंवा कुत्र सिंहानी मारलं तर लोक समजून घेतात.अशी परस्पर सामंजस्य साधत सिंह आणि माणूस एक ठिकाणी राहायला शिकलेत.
वर म्हणलो तसे फॉरेस्ट गार्ड आणि गावकरी यांचे सिंहाचा कळपा जवळचे व्हिडीओ तू नळीवर बघायला मिळतील.
नुकताच मागील आठवड्यात आजोबा सिनेमा बघितला त्यात ही हे जाणवत आपण त्यांच्या घरात घुसलोयत लोकसंख्या वाढी मूळ.अर्थात हे समजून गिर च्या लोकांसारखं जिओ और जीने दो केलं तर हि वन्य संपत्ती आणि दुर्मिळ होत जाणारे प्राणी पुढील पिढीला प्रत्यक्ष जिवन्त बघायला मिळतील अन्यथा फक्त पुस्तकात किंवा ज्या फ्लिम्स केल्या आहेत त्यात बघावे लागतील.

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

राहुल भाई

*राहुल*
आज दुपारी झोपायला जाणार इतक्यात फोन वाजला.व्हिडीओ कॉल होता.म्हटलं बालम क काय?पण राहुल चा फोन होता.उचलला तर म्हणला,
अरे साहब कहा हो आप ? कितने दिन हुए पता भी है यहा आये हुए?

हा यार बहोत दिन हुए, पर आजकाल मेरा आना उस तरफ होता हि नही इसलीये नही आ सका. बाकी आपकी याद तो रोज आती है भाई.
अच्छा तो आज आ हि जाइये आपसे मिलने को दिल कर रहा है.फिर अगले महिने तो मै गाव जा रहा हूं पेहली तारीख को.
  हा और जून के एन्ड मे आओगे.और मिलने पर आख मे पानी लाते हुए कहोगे के ,घर पर तो सब ठीक ठाक है पर याद आती है परिवार कि.
मी अस म्हणल्यावर हसत म्हणला,हा क्या करे याद तो आती हि है घर कि. पर आज आपकी आ रही है आजाइये .
हा भाई पक्का आता हूं.
म्हणत फोन ठेवला.
हा राहुल माझा पाणी पुरी वाला.गेली कैक वर्ष रात्री त्याच्याकडं खाऊन येतोय घरी.त्याच्याशी इतकं नात जमलंय कि घरचा वाटतो.आत्ता येताना त्याच्या कडे गेलो.मला बघितल्यावर मिठी मारलीन.खूप दिवसांनी हवासा वाटणारा जवळचा नातेवाईक,त्याहून दुसर म्हणायच तर मित्र भेटल्यावर वाटत तस वाटलं.लगेच एकाला थंड पाण्याची बाटली माझ्या करता आणायला पाठवलन.
साहब आप पिछले बरस आये थे 7 महिने हो गये तबसे आज आये हो. वो भी बुलाने पर.लेकिन आये तो अच्छा लगा मुझे.एकूण त्याच सर्व ठीक चाललं होतं.आम्ही दोघांनी एकमेकांची सुख दुःख एकमेकांना सांगितलीयत. म्हटलं राहुल घरी सगळं ठीक.तर सर्व ठीक आहे म्हणला.मुलाला या खेपी इकडेच शिकायला आणतोय माझ्या बरोबर. घर बांधून झालं.तिथं एक बाईक हि घेऊन ठेवलीय.आता गेल्या सात महिन्यात दीड लाख फायदा कमावला. त्यातले 50 हजार पोरांच्या आजारपण वग्रे करता घरात देणारेय.50 इथं ठेवलेत.आणि 50 पोरींच्या लग्ना करता पुंजी जमवतोय त्यात टाकणार.3 मुली 1 मुलगा आहेत त्याला. आणि सासुरवाडीला एक बोअर मारायचीय त्याला पस्तीस हजार खरच येईल. वसईत आला तेंव्हा पासून मी त्याच्याकडे जातोय.अतिशय अदबीने,प्रेमानं आणि आपुलकीनं खाऊ घालतो.जे दुर्मिळ होत चाललंय हल्ली.पण रस्त्यावर भेटलेली अशी काही माणसं मात्र खूप जवळची झालीत माझ्या.आणि ही दोघे तिघे आहेत.याची पाणी पुरीची गाडी नाहीये.बांबू चा ठेला घेऊन असतो.सर्वांशी हसून खेळून बोलतो.गिर्हाईक नेहमीच बांधलेलं आहे.खूप बायका यांच्याच कडे विश्वासानं येत असतात.काही कुटुंब ही.आज भरपूर गप्पा मारल्या.तोवर मला बसायला स्टूल दिल होतन.मी नेहमी एक पाणीपुरी आणि एक रगडा पुरी खायचो त्याच्या कडे ते लक्षात असतच त्याच्या. ते खाऊन मी निघतो म्हणलो तर अजून थांबा म्हणला म्हणून परत बसलो.मग काही गिर्हाईक गेल्यावर परत एक भेळीची पुडी समोर धरलन.नको नको म्हणलो तरी नाही खा च म्हणला.निघताना शंभर रु काढून दिले तर डोळे ओले करत म्हणला,पैसे के लिये थोडे ही बुलाया आपको. पैसे दे के तो खाते हि आ रहे हो आप, आज ये प्यारसे खिलाया है उसके पैसे दे के दिल मत तोडो.
काय बोलणार यावर ? मग माग पार्क केलेल्या बाईक च्या माग लोकांनी त्यांच्या गाड्या लावलेल्या.माझ्या कडून चावी घेऊन त्यानं गाडी त्या गर्दीतून काढून दिलीन आणि परत मिठी मारून म्हणला,साहब हो सके तो मेरे गाव जाने से पेहले एक बार फिर आना.बच्चा भी याद करता है आपको घर पर.वो अंकल आते है या नही .म्हटलं नक्की भेटून जाईन.
अशी जीव लावणारी माणसं रस्त्यावर मिळलीत.

बुधवार, १४ मार्च, २०१८

लिमये काका

माझे मेहुणे होते ,अवलिया माणूस. ssc पास .पण कार्गो शिपवर कप्तान होते.दुनियाभर फिरून आलेला स्मार्टनेस आणि इंग्रजीवर प्रभुत्व.सहा फूट उंच न भारदस्त शरीर.
मी कॉमिक्स, चांदोबा,किशोर वग्रे वाचत असे.एकदा त्यांच्याकडे रहायला गेलो होतो.त्यांना दोन मुली.ज्या माझ्या भाच्या लागतात पण आमच्यात दोस्ती खूप होती.मोठीला माझ्या सारख वाचायला आवडायचं.ती हँडर्सन च्या परीकथा वाचायची.मेहुण्यांनी हे हेरलं होत.अचानक संध्याकाळी आम्हा दोघांना बोलावली त्यांनी.आम्ही येऊन त्यांच्या पुढं उभं राहिल्यावर खिशातून नोटांचा छोटं बंडल काढून माझ्या हाती दिल.म्हणले,सलील तू न उज्वल पुस्तक वाचता अस बघतोय मी.आज आता जाऊन गिरगावतल्या पुस्तकाच्या दुकानातून तुम्हाला हवी ती न हवी तेव्हढी पुस्तक आणा आणि वाचा सुट्टीत. आम्हाला आनंद झाला.निघताना परत त्यांनी हाक मारून सांगितलं,जर पैसे हरवले तर चौपाटीवर जाऊन रडत बसू नका.मला फोन करा किंवा घरी या मी परत पैसे देईन.पण हे न होईल असं बघा.
आम्ही उड्या मारत दुकानात गेलो.आवडतील ती पुस्तक घेतली.उज्वलन मात्र मला सांगितलं,आपण थोडे पैसे ठेवूनच खरेदी करू.सर्व पैसे सम्पवून आले अस नको.( आता कळत तिला व्यवहार त्या वेळीच समजला होता😊)
मग घरी आलो न पुस्तकाचा ढीग बघत बसलो.बहीण आली न म्हणली,अहो पुस्तक आणायला पैसे दिलेत ते ठीक पण त्या दोघांनाच काय पाठवलेत? मी गेले असते न सोबत.काही वेडंवाकडं झालं असत म्हणजे ?
मेहुणे म्हणले,त्यांना आता बऱ्यापैकी समज आली आहे.सलील एकटा दादरहून गिरगावात येतो न? त्यांना सवय आता पासूनच करायला हवी स्वावलंबी व्हायची.आणि मी त्यांना तस काही झालं तर घरी फोन करा मी इथं बसून आहे म्हणलो होतो.
तुमच बाई एकेक भलतंच असत. बहीण म्हणली.
मग मेहुणे उठले आणि आमची खरेदी नीट बघितली.आणि दोघांकडे बघत म्हणाले,
तुमच्या खरेदीत परीकथा आणि तत्सम स्वप्नरंजन करणाऱ्या गोष्टींची पुस्तकं दिसतायत.विज्ञान विषयावर ची पुस्तक नाहीत.सलील तू शेरलॉक होम्स च आणलं स पण या पुस्तकात श्रीमान योगी सारखी किंवा ज्ञानेश्वरी,दासबोध का नाही आणावे वाटलं पुस्तक ? बहीण म्हणली,अहो त्यांच वय काय आणि तुम्ही दासबोध काय वाच म्हणताय?
तुला ही समजलं नाही.इतर त्यांच्या वयानुसार पुस्तक आणली ती ठीकच आहे.पण त्या पुढच वाचन हि त्यांनी करायला हवं ते ही याच वयात.त्यांनी जर आज ज्ञानेश्वरी ,दासबोध वाचला आणि त्यातील अगदी थोडं जरी त्यांना समजलं तरी त्यांचा आयुष्य आता कुठं सुरू होईल ,तेंव्हा पुढील आयुष्यात ते वाचलेलं प्रत्यक्ष्यात वापरता येईल त्यांना.जेंव्हा म्हातारे होतील तेंव्हा दासबोध कळून उपयोग नसणारेय कारण जे कर्तृत्व दाखवायचं किंवा लढायचं वय असत ते निघून गेलेलं असत.तेंव्हा दासबोध समजून काय फायदा होणार?म्हणून वाचन आता पासून च चौफेर हवं.
हे बहिणीला पटलं नाही म्हणा पण ती गप्प बसली.
मला ही त्या वेळी काही नीटस समजलं नाही.उज्वला ला म्हटलं,काका अस म्हणले ते आपण जास्त खरेदी केली म्हणून का ?
अरे नाही तस वाटत.आणि तसही मी म्हटलं होतं न तुला कि थोडे तरी पैसे परत देऊ त्यांना.ते दिले न आपण.
मग मला काही कळेना अस का म्हणले ते!
पण आता इतक्या वर्ष्यानी समजतंय त्यांना काय म्हणायच होत.
आणि मग रात्री ते हे हि म्हणले जेवताना, हि पोर टिपिकल मध्यम वर्गीय विचार करू लागलीयत आतापासून.
का म्हणता अस ?या बहिणीच्या प्रश्नावर ते हसून म्हणले होते,चैला याना भरपूर पैसे दिले होते मनमुराद खरेदी करायला त्यातले हि वाचवून मला आणून दिली.
😃

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

नवी ओळख गावाची

घर विकून दशक उलटून गेली.तेंव्हा मुंबई हवीशी वाटली.परिस्थिती अशी नव्हती कि ती प्रॉपर्टी तशीच ठेऊन दुसरीकडे जागा घेऊन रहाता येईल.नाईलाजाने विकावे लागले.पण नंतर ते घर मनातली जागा मात्र सोडत नाही.एक एकर च्या आसपास जागेत घर होत.त्या विस्तीर्ण आवारा मूळ ओढ लागतेय का ? हा प्रश्न मनात आला.पण तेच एक कारण नाही असं जाणवलं.तिथं असताना जी माणसं आजूबाजूस होती त्यांनी जे प्रेम दिल घेतलं ते अजूनही खेच दाखवत असत.आजही गेलो तर माझ्या जागेत मी पाऊल हि ठेवत नाही.तिथं आता लोकांचे बंगले झालेत.पण काही मित्रांच्या घरी जातो.काहींची घर नवीन रूप घेऊन उभी राहिलीयत काहींची मात्र होती तशीच आहेत.काल तर इथं येऊन गेलो होतो इतकी तशीच.पण दोन्ही बाजूची माणस मात्र बरीचशी तशीच आहेत.आजही गेलो कि तिच जुनी सलगी मिळते.नात काही नाही शेजारी होते,पण नातलगांकड जात नाही तिथं मात्र जातो.फक्त गावातली पिढी बदलली त्या मुळे बाकी कुणी ओळखत नाही.
या खेपी मात्र खूप बदललेली परिस्थिती जाणवली.जमलं तर परत तिथं जागा घेऊ ,हे मत राह्यलं नाही.
पूर्वी गावात इतकी सुबत्ता नव्हती.शेती किंवा मुंबई पुण्यात नोकरी करणारे लोक होते.कातकरी संध्याकाळी मजुरी करून जाताना अड्ड्यावर घसा ओला करून घरी जाताना पिऊन धिंगाणा करत असत कधी तरी.गावात हि पिणारे होते पण ते कळत नसे बाहेर.सोमवार च्या बाजारात काही दिवस चक्री फिरत असे तितकंच.ते ही पोलीस बंद पाडत असत.आपसात काही भांडण ही होत .मग पोलीस स्टेशन गाजत असे.पण ते ही क्वचित च.बाकी गावं तस शांत होत.
काल मात्र वेगळं चित्र बघितलं.लोकांनी जमिनी विकून पैसे केलेत.त्या मूळ पैसा असेल तिथं येणाऱ्या अन्य विलासी किंवा तो पैसा काढून घेणाऱ्या गोष्टी आल्यात.जुगाराचे अड्डे,दारूची दुकान झालीत.एक ओळखीचा भेटला. त्याच गणितं माझ्याहून कच्च होत.पुढं शिक्षण डोकं चालत नाही सबब होणं नव्हतं हे तेंव्हाच नक्की झालं होतं.आजही घरच्या सपोर्ट वर आयुष्य सुरू आहे.तर त्याला मी विचारलं,या पोरांकड पैसे कुठून येतात आकडा लावायला?दारू प्यायला? तो शांतपण म्हणला, आकड्यातूनच. म्हटलं किती मिळतील?दारू न चखना चा खर्च निघतो?घरात देणं राहू दे.तो म्हणला, मग.
पण ते खेळतात कसं?किती इन्व्हेस्ट केले कि किती रिटर्न मिळतात?
तो मंद हसत म्हणला,ये सांगतो.मग एक पट्टी खिशातून काढलीन छापील.त्यावर वरची ओळ 1 ते 0 असे दहा आकडे होते. खाली तीन तीन आकड्याचे समूह.त्यांच्या एकाखाली एक रांगा होत्या.
आता हा सिक्वेन्स धरल्यास ही फिगर अपेक्षित आहे.मग त्याचा हिशेब असा होतो.असा आला तर ब्रॅकेट होत.अस आलं ,त्याला संगम म्हणायच.अस त्यानं 15 मिनिट माझं बौद्धिक घेतलं पण शेवटी ते ही गणित माझ्या डोक्यावरून गेलं.म्हटलं हे काही समजत नाहीये.तो हसून म्हणला,लावायला लागलं कि समजेल हळूहळू.मग किती लावू शकतो?
5रु पासून कितीही.
समज 10 किंवा 20 रु लावले तर किती मिळतात?
500रु ही.अरे त्या रूपक न परवा लावले बरेच तर त्याला 3लाख मिळाले.
मी उडालो.म्हटलं मग ते मिळतात कधी आणि रोख देतात का?
म!सकाळी लावले कि संध्याकाळी घेऊन जायचे मिळाले तर.त्याला आम्ही म्हटलं,आता मिळालेत तर कर्ज फेडून घे न मोकळा हो.पण ते कुठलं ऐकायला.परत सगळे घालवले.
हा कारभार सुरू झालाय गावात.तरणी पोर दारू च्या गुत्त्या वर,पानाच्या टपरीवर आकडे लावत किंवा टोळक्याने टिंगल टवाळी करत उभी असतात.शेती विकून किंवा बापाच्या जीवावर घेतलीय ती बाईक,केसांचा नवा भांग, तोंडात सिगरेट.अस नव्हतं पूर्वी.
हे गावातल्या लोकांचं असताना परदेशी लोक म्हणजे भय्ये,बंगाली वग्रे येऊन गावाभोवती असणाऱ्या कंपन्यात नोकरी करून गावात घर घेऊन राहिलेत.किंवा त्या कंपन्यांनी आवारात त्यांच्या करता घर बांधलीत.पाणीपुरी,चायनीज,फळ अस गाड्यावर विकतात आणि पैसे कमवतात.गावातली पोर मात्र  निरुद्योगी होऊन राह्यलेत.किंवा गुंडगिरी बरीच वाढलीय.गॅंग ही तयार झाल्यात.हल्ली काहीजण आत गेल्याने जरा शांत आहे म्हणे.हे कमी म्हणून का काय आता गांजा,ड्रग च्या गोळ्या ही आल्यात गावात.
एकूण निराशाजनक स्थिती बघून वाईट वाटलं.परत तिथं जाऊन राहू हे मत आता बदललं आहे.
आता फक्त जुनी पिढी आहे तो वर कधी तरी त्यांना भेटायला जायचे मग मात्र मनातल्या जुन्या आठवणी ची उजळणी स्वतः शी करण्यात च सुख आहे हे खरं.
काळ बदलला .
तरी साली पावलं तिकडं जाऊ पाहतील च पण पहिली ओढ नक्की नाही रहायची.

रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

*पर्वचा*

*पर्वचा*
तिन्ही सांजे च्या सुमारास बाहेरून खेळून दमून आलो कि हातपाय धुवून आधी पर्वचा म्हणायला बसायचाय. ज्याची पाठ नसेल त्याला पापड वाढणार नाही.अशी काकू ची तंबी कानावर यायची.मग निमूट हातपाय धुवून झोपाळ्यावर कडी च्या बाजूची जागा पकडायची धावत जाऊन.मग जे जे सुट्टीत आलेले असत ते सगळे ही बसायचे येऊन.एक रांग पुढं एक माग. ताई कधी आमच्या सोबत झोपाळ्यावर किंवा गर्दी जास्त असेल तर बाजूला सतरंजी वर बसायची.मग एकेक स्तोत्र सुरू व्हायची ज्यात भीमरूपी, रामरक्षा,अथर्वशीर्ष ते सदा सर्वदा अशी यादी असे.स्वयंपाक घरातून खमंग सुवास अस्वस्थ करत असतानाच आतून दम दिला जाई,सलील चा आवाज ऐकू येत नाही.मघा घसा फोडत होता आता बसला का काय? ज्योत्स्ना बारीक लक्ष ठेऊन अस.जो कुणी म्हणत नसेल त्याच नाव मला सांग,आणि कुणाला मदत केलीस तर तुझी ही खैर नाही.तू ही त्याच्या सोबत उपाशी झोप.
ही धमकी त्या वेळी खरी वाटत असे.
मुंबईत हे रोज नसे पण खाली व्यायाम शाळेत शनिवारी कुस्ती न मल्ल खांब खेळत असू.शनिवारी आखाडा उकरून त्यात दही,तूप. लोणी वग्रे घालून सर्व माती फावड्याने एकजीव करायला उतरत असू आम्ही.वस्ताद आणि बाकी पैलवान वर बसून काम करून घेत.मग बाळ मास्तर(आपल्या निशा चे वडील)येत हातात तबक घेऊन.त्यात निरांजन, नारळ आणि प्रसाद म्हणून खडी साखर वग्रे असे.मग तो नारळ फोडून त्याचे तुकडे करायचे.मग आरती ला उभं रहायच.सत्राणे उड्डाणे ते सदा सर्वदा होई.मग तो प्रसाद खायला खूप आवडायचं.
पुढं मोठं झाल्यावर म्हणजे वयाने,हे सर्व माग पडलं.ती ती ठिकाण ही सुटली.मग राम रक्षे चा डावीकडचा अर्थ वाचून अस वाटू लागलं कि, हे रामा माझ्या डोक्या पासून पाया पर्यंत सर्वांच तू रक्षण कर याला काय अर्थ आहे? मग मी काय करायचं? अहंकार नव्हे पण सर्व भार त्याच्यावर का टाकावा आपण ? असे प्रश्न पडू लागले.
आता मात्र वय वाढल्याने किंवा त्या सोबत परिस्थिती चे फटके अनुभवल्याने वेगळं वाटू लागलाय.
कधी तरी अस जाणवत कि, आपलं काम,प्रयत्न सुरूच ठेवायचे पण त्याला मिळणार फळ या वर मात्र हक्क ठेवायचा नाही.जे कृष्ण ही म्हणतो कि, ते माझ्यावर सोड.काहीतरी शक्ती वेगळी आहे जीच आपल्याला आकलन होत नाहीये.आणि त्याच्या वर सर्व भार टाकणे अस नसून माझ्या हातून काही घडलंच चांगलं तर मी फक्त माध्यम आहे कर्ता करविता तोच आहे.त्याची इच्छा म्हणून मला शक्य झालं.हे वाटायच कारण, साधी लचक भरली तर कूस बदलणंच नव्हे तर पाय ही उचलवत नाही.मी मी म्हणणारा माणूस अर्धांग वाताचा झटका आला तर बोट ही हलवू शकत नाही.
आता जाणवत जे म्हणतो त्याचा अर्थ समजला नव्हता तरी तेंव्हा ही आणि आता खूप समजत अस नव्हे पण वय वाढल्यावर ही काहीतरी शांत शांत वाटत.रामरक्षे ची बदलत जाणारी चाल,त्वं अग्नीत्वं वायूसत्वं या ओळी म्हणताना काही तरी वेगळी मजा येते.
ते माजघर,ती माणसं, ते वातावरण याचा पुनः प्रत्यय आतून खूप सुखावून शांत करतो.फक्त आता पर्वचा म्हणायला झोपाळा नसतो,सोबत कुणी नसत,हा sss कोण रे तो तोंडातल्या तोंडात बोलतोय कळू दे मला अशी स्वयंपाक घरातून येणारी हाक नाही.
आमचे तात्या रात्री अंगणात शतपावली करताना तासभर काही तरी म्हणत असत.पुटपुटल्या सारख.हे काय आणि का म्हणत असतात याच कुतूहल होत.एकदा धाडस करून त्यांना विचारलं,तात्या काय हो म्हणता इतकं ?
त्यांनी दीर्घ श्वास घेतला.सौम्य आणि त्यांच्या कडून दुर्लभ स्मित हास्य करत माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणले,अरे आजवर काय काय शिकलोय.ते ते आठवत असतो.घर्षण हवं न,नाहीतर विस्मरण होईल.
तरी त्यांच ते पुटपुटण डोक्यात राह्यलं च होत.पुढं ग्रेस ची ओळ कानी पडली आणि तात्या आठवले.
स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दुःख कुणाचे
मग माझा मी अर्थ लावला.कदाचित मोठं झालं कि जबाबदारी मूळ माणूस कुठं कुणापाशी मोकळा होत नाही.कारण तितकं समर्थ कुणी असावं लागतं. मग ग्रेस म्हणला ते खरं असावं.
एवंच परत एकदा पर्वचा म्हणली तर खूप शांत शांत मात्र नक्की वाटत.