बुधवार, ८ जुलै, २०२०

अदृश्य राक्षस.

सगळीकडे कोलाहल माजलेला. नगरजन त्रस्त झालेले. एकेकाळी नव्हे ,तर अगदी काल परवा पर्यंत सुरळीत सुरू असलेलं जन जीवन आज पूर्ण विस्कळीत झालं होत.
नगरीचे रस्ते सुनसान पडलेले.जे अहोरात्र चैतन्य राखून होते ते मार्ग,महामार्ग आज ओस पडलेले दिसत होते.शहर वाढल्याने संकुचित झालेल्या वनश्री मधली वन्य श्वापदे आता आपल्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाचा बदला घेण्यास बाहेर पडून निश्चिन्त मनाने शहर भर फिरत होती.आधीच भेदरून घरात लपून बसलेले नगरजन, त्या प्राण्यांना तस फिरताना आपापल्या गवाक्ष्यातून चिंतीत नजरेने बघत बंद असलेली दारे अजून घट्ट बंद करायचा प्रयत्न करत होती.सर्वत्र त्राहीमाम माजलेत होत.घरात बसून साठवलेली अन्न धान्य रसद आता तळ गाठू लागली होती. अन्न आणायला धन उरले नाही.ते मिळवायचे तर उद्योग करायला बाहेर पडायला हवं.पण या समयी सर्व ठप्प झालेलं.आता घरी राहू तर उपाशी मरू.बाहेर पडू तर ती श्वापदे खातील.त्यातून वाचलो तर तो अदृश्य राक्षस आपला घास घेईल हे नक्कीच झालं होतं.
होय.या संपन्न भारत देशावर आलेलं ते अदृश्य संकट होत.एक अचानक प्रगटलेला पण न दिसणारा दैत्य या देशावर यम होऊन घाला घालायला आला होता.
राजसत्तेचे सर्व सेनाधिकारी,निष्णात वैद्य राज या अदृश्य राक्षसाच्या नायनाट करायला अनेक उपाय योजित होते. पण यशवंती प्रसन्न होतंच नव्हती.आठवडे गेले.महिने गेले तरी तो राक्षस मागे हटत नव्हता कि दिसत नव्हता.पण बळी मात्र नित्यनेमाने घेत होता.
तिकडं या शहरी भागातून दूर एकांतवासी असा एक औघड दुरून हे सगळं न्याहाळत होता.
कुणीतरी लायक नरश्रेष्ठ पुढं येऊन या विपदेतून सर्वांस बाहेर काढील अशी त्याला आशा होती.तो आपल्या साधनेत मग्न होत होता.
परंतु आज एका गिद्धा च्या समूहास त्याने नगरच्या दिशेने उडताना बघितले.नदीत उभा राहून तो सूर्यास अर्घ्य अर्पण करत होता. ते झाल्यावर तो काही काळ सूर्य बिंबाकडे एकटक बघत नेत्र त्राटक करत असे.पण आज ते करणं राहील बाजूला.कारण जसे त्याचे नेत्र सूर्याकडे रोखले गेले नेमका तेंव्हाच तो गिद्ध समूह नगराच्या दिशेने आकाश कापत जाताना त्याच्या दृष्टीस पडला.
त्याला ते ठिक वाटलं नाही.काही अघटित घडतंय याची जाणिव त्याला झाली.दिनमान मोजून बघितले तर लक्षात आलं त्याच्या कि काही मास गुजरलेत मध्ये.आपण साधनेत मग्न होतो त्या मूळ इकडं लक्ष गेलं नाही.
मग तो त्याच त्राटक तसच सोडून नदीच्या पात्रातून बाहेर निघाला.
पर्णकुटी जवळ असलेल्या कुंडात त्यानं पुन्हा एकदा हातपाय धुतले.आत जाऊन त्याच्या व्याघ्र चर्मा वर बसला.समोरच्या धुनीत बाजूस ठेवलेल्या हवन द्रव्यातून धूप दाणा उचलून धुनीत अर्पण केला.सर्वत्र धुम्र वलय पसरत गेलं आणि त्याची पर्णकुटी व्यापून राहील.आता त्यानं कमंडलू तून पाणी घेऊन हाती घेतल.या अरिष्टया मागे कारण काय?ते जाणून घ्यायचा संकल्प सोडला.क्षणात त्याची समाधी लागली.शरीर हलकं भासू लागलं आणि एक तेजाकृती त्याच्या अंतर्मनास दिसू लागली.त्यांन त्या तेजास प्रथम नमन केलं.खूप आतून ,खोल पोकळीतून आल्या सारखा तो परिचित आवाज त्याला ऐकू आला,बोल साधका!काय पृच्छा आहे तुझी?
हे नियंत्या हे नगरात सध्या काय सुरू आहे?का सुरू आहे?या वर उपाय नाही का?
परत तो गूढ पण आश्वासक आवाज आणखी धीर गंभीर होत म्हणाला,
साधका,तू हे निस्वार्थपण आणि लोक कल्याणा करता विचारत आहेस म्हणून तुला सांगतो ते नीट ऐक. यात काही पाप पुण्याचे हिशोब होत आहेत,काही निसर्ग देव समतोल साधत आहे.योग्य वेळ येताच सर्व काही ठिक होईलच.पण या बाबत एक गोष्ट तुला सांगतो.ती श्रवण कर म्हणजे तुझं शंका निरसन पूर्ण होईल. एक गोष्ट अजून जाणून घे.जर तू माझ्याकडून ती गोष्ट ऐकलीस तर तुझ्या साधनेच फळ जे तुला  मिळायला आलं होतं ते नष्ट होईल.बोल,चालेल?
प्रभू, मला कसला पाश उरला नाही.तेंव्हा संचय करावं असं कधी मनी येत नाही.तेंव्हा आपण ती गोष्ट कथन करावी.निदान माझ्या देश बांधवास हा त्रास का होत आहे हे तरी मला कळेल.
साधका, तुझी हि साधू वृत्ती बघून मी प्रसन्न झालो आहे.तुला ती गोष्ट तर सांगतोच पण तुझी साधना वाया जाणार नाही असा वर हि देतो.परंतु त्या वराचा वापर तू त्या राक्षसी ताकदीशी लढायला वापरू शकणार नाहीस.कारण ते विधीलिखित आहे.
आता ऐक ती गोष्ट,
हे तुमच कलियुग सुरू होताना कली महाराज देवास म्हणाले, एकूण माझ्या सत्ता काळी दुराचार माजणार अस आहे.मग तो बकासुर ,हिडीम्ब या सारखे राक्षस माझ्या युगी का नसावेत?
तेंव्हा प्रभू त्यास म्हणलेत,तथास्तु.
असे राक्षस तुझ्या काळात भरपूर असतील.कलियुगी शके 1942 मध्ये एक अदृश्य राक्षस हाहाकार माजविल. त्यास रोखणे कुणास शक्य होणार नाही. काही लहान मोठी पिशाचे त्यास साहाय्य करत राहतील. काही बलवन्त मंडळी गोरगरीब जनतेच्या हक्काचे अन्न धान्य गिळंकृत करतील.
तुझ्या काळच्या महिमे मूळ अस काही ठराविक कालावधीत होतच राहील.पण पापाचे घडे उशीरा का होईना भरतीलच.त्या राक्षसांचा देखील उचित वेळी प्रायश्चित्त समय येईलच.मग कली महाराज समाधान पावले.
तेंव्हा हे साधका अस असल्याने हि सगळी उलथापालथ तुझ्याच देशात नव्हे तर सर्व विश्वात सुरू आहे.त्यानं तू आता अधिक कष्टी होऊ नकोस.
मग साधक म्हणला,हे प्रभू एक मागणे अजून आहे.
बोल.
माझ्या साधनेच फळ मला नको आहे.पण ते जर का जमा झाल असेल आपल्या चरणी,तर या संकटात असलेल्या निष्पाप जीवांस काहीतरी प्रमाणात विभागून आपणच देऊ करा.म्हणजे जनसामान्य टिकून राहतील आणि त्यांचा आपल्या वरील विश्वास देखील तसाच राहील.
वा,साधका ! तुला खरच साधना जमली आहे म्हणायची.मी या मूळ संतोष पावून तुला आश्वस्त करतो , तुझ्या मना सारखे होईल.
हळूहळू मनःपटलावरील ती आकृती धूसर होत गेली तरी तिचा आशीर्वाद देत असलेला हात त्याला जाणवत राहिला.तो सुद्धा समाधी अवस्थेतून समाधानाने बाहेर आला.एक दिर्घ निश्वास सोडून तो आसन सोडून फलाहार आणण्यास जंगलात जायला निघाला.

सोमवार, ६ जुलै, २०२०

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा ???

काल गुरू पौर्णिमा झाली.
अलीकडं त्या बाबतीत एक गोष्ट खटकते मला.माझे विद्यार्थी जे येऊ शकत नाहीत ते आणि ओळीतले लोक देखील ''गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा'' असा संदेश किंवा मेसेज पाठवतात.भावना चांगलीच असते सगळ्यांची.
पण,
हे नातं गुरू शिष्याचं अस असत.आणि हा दिवस शिष्या ने गुरुची भेट घेऊन त्याचे आशीर्वाद घ्यायचे या करता आहे.आजवर हेच रूढ होत.शुभेच्छा वाढ दिवशी किंवा अन्य सणवार किंवा काही आनंदाची गोष्ट घडली तर देतात.मग जर कुणी गुरू कडे जाऊ शकत नसेल तर त्याने फोन करून किंवा मेसेज मधून अस लिहावे कि, सर प्रत्यक्ष येऊ शकत नाही.पण आशीर्वाद असू दे.आजचा दिवस महत्वाचा आहे म्हणून मेसेज किंवा फोन वरून आशीर्वाद मागतोय. यथावकाश प्रत्यक्ष भेट घेईनच. जे शिष्य शिकत आहेत ते देखील गुरू स न भेटता मेसेज वर काम भागवतात.
वेळ नसतो कुणाला हे खरं आहे.पण हा दिवस आपल्या संस्कृतीत गुरू भेट घेऊन त्याचे ऋण मानून ,जमेल तशी गुरू दक्षिणा देऊन गुरू चे आशीर्वाद घ्यायला राखून ठेवला आहे.शिक्षण पूर्ण होतच नाही कधी.तरीही जे शिकून गेलेत त्यांनी या दिवशी गुरुची आठवण ठेऊन त्यांना भेटणे महत्वाचे असते.
मदर डे, फादर डे, फ्रेंड शिप डे हे साजरे करावे लागतात !शुभेच्छा देऊन? ती नाती देखील गुरू च्या तोडीची महत्वाची आहेत.
त्या बद्दल राहू दे पण गुरू गृही जाऊन त्याची भेट घेऊन,वंदन करून आशीर्वाद घेणे हे महत्वाचे आहे. बरेच वर्ष हे खटकत आलाय म्हणून लिहिलं.
आणि हे माझ्या बाबतीत लागू होत नाही हे देखील प्रांजळपणे नमूद करतो.मी तबला शिकवतो पण स्वतः ला गुरू अजिबात समजत नाही.ते पद खूप खूप उंच आहे.मी तिथवर पोचू शकणार नाहीये.त्या मूळ माझ्या शिष्यानी (शिकतात माझ्याकडे म्हणून शिष्य म्हटलं.नाहीतर मी त्यांना माझे सह अध्यायी समजतो.जे माझ्या नंतर शिकायचा प्रयत्न करू लागलेत. आणि दोन अक्षर त्यांच्या आधी शिकून मी आहे म्हणून त्यांना मार्गदर्शन करतो)
माझ्या पाया पडावं हि देखील अपेक्षा नाही.
पण या दिवशी गुरुगृही जाऊन त्यांचे आशीर्वाद घेणं याला महत्व आहे हे लक्षात ठेवा.नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी जा. वर्षातून एकदा गुरू भेट घ्यावीच.
त्या मूळ माझ्याकडे शिकतायत त्याना आणि जे मित्र यादीत आहेत त्यांना प्रेमाने विनंती करीन कि,
गुरू पौर्णिमा शुभेच्छा म्हणू नका.आपापल्या गुरुची भेट घ्या त्या दिवशी.ती देखील मनाला वाटलं तर.कारण आपल्या कडे गुरुस मोठा दर्जा,स्थान दिलेलं असलं तरी हे देखील म्हटलं जातं,गुरू सुद्धा पारखून करावा.
आणि तसा जर तो तुम्ही केला असेल तर त्याचे आशीर्वाद मागा. त्याला शुभेच्छा नका देऊ.
जे मला योग्य वाटत नाही.
मनात बरीच वर्षे येत होतं ते मांडल.आवडलं नाही तर सोडून द्या.
या वर्षी प्रथमच माझी गुरू भेट कोरोना मूळ राहिली.त्याची रुख रुख आहे.पण काल सरांना फोन करून आशीर्वाद मागितले आणि त्यांनी ते फोनवरून भरभरून दिलेही.माझी गुरू पौर्णिमा साजरी झाली.
सदैव सर्व गुरुजनांच्या ऋणात असलेला
आपला,सलील जोशी🙏🏻🌹

रविवार, ५ जुलै, २०२०

जांभूळ.

जांभुळा चा रस.!!!
झक्कास लागतो.आज सायंफेरीस गेलो तेंव्हा जांभळ मिळाली.धुवून गरम पाण्यात एक उकळी काढली.मग थंड झाल्यावर बी पट्कनी निघते.उरलेला गर थोडी साखर टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतला.मजा आली.
पोयनाडचे दिवस आठवले.खाली चादर धरून कुणीतरी वर चढून फांदी हलवायाचा.अलगद जांभळं चादरीत टपकत.त्या जांभळीवरून दरवर्षी दोन चार जण तरी निसटून पडत.झाड कुणाच्या मालकीच नव्हतं.शेजारी डोंगरी होती ती जांभळी ची डोंगरी म्हणूनच होती.पण आमच्या वयी ला लागून असलेली जांभूळच आम्हाला आवडायची.त्या जांभळी खाली एक दिवस तिन्ही सांजेस एक कातकरीण बाळंत झालेली लांबूनच आमच्या आवाडातून बघितली.तिची सासू सोबत होती.तिन तीच सगळं केलं उघड्यावरच.मी बघत होतो झाडा आड काय करतायत दोघी.मग आजी म्हणली,अरे तिला बाळ होतंय बहुतेक.इतक्यात तिने बाळाला जन्म दिलाच. मग आजी न चार कपडे आमच्याकडचे आणि भाकऱ्या,थोडं दूध मला तिला नेऊन द्यायला सांगितल होत.तिला म्हणावं उद्या येऊन जा काही लागलं तर सांग.ती म्हातारी मला मला हात जोडून म्हणली,हो रे बाबा.आजी बाईला नमस्कार सांग.परत येऊन आजीला विचारलं कोण ग ती?कधी बघितली नाही आपल्या कडे.तिकडं वाड्यावर असते का आपल्या?आजी म्हणली,नाही रे.असेल शिरगावची वगैरे.
अस रस्त्यावरच आटोपलेलं बाळंत पण दुरून बघितलं.मला वाटलं ती तिचा जुना मळका पंचा धरून उभी आहे जांभळं झेलायलाआणि झाडावर तर कुणी बाप्या चढून नाही.म्हणून बघत बसलो होतो.
जुनी आठवण आली.संध्याकाळ मस्त झाली.

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

गोल्डन वर्ड ऑफ झाकिर हुसेन.

तू स्टेज वर का वाजवत नाहीस?
तू ऑर्केस्ट्रात का वाजवत नाहीस?
तू tv वर प्रयत्न करा न!
असे मला म्हणणारे बरेच सुहृद आहेत.नक्की ते माझ्या वरच्या प्रेमान म्हणतात.त्यांना माझ्या परीने सांगत असतो माझ्या साठी तबला काय आहे?
थोडक्यात सांगायचं तर मला तबला शिकताना आनंद मिळतो म्हणून मी तबला वाजवतो.
आता त्यातून अर्थार्जन जे काही होत त्यात अजून तरी ठिक सुरुय.खूप नाही पण पोटापुरतच का होईना जे मिळत ते तबल्या मूळ.
लॉक डाऊन मध्ये सगळ्यांची परिस्थिती बिकट आहे झालेली.
काही लोक प्रेमापोटी न काळजीनं म्हणतात,अरे दिवस वाईट आलेत दुसर काही कर मिळेल ते.
ओके. करेक्ट म्हणतात ते.त्या माग हेतू चांगला आहे पण,
आमच्या सारखे लोक आयुष्यभर हेच करत आलेत त्यांना दुसर काही आता जमेल का?वेळ आली तर शेवटी करीनही जे करावं लागेल ते.पण हे कुणी लक्ष्यात घेत नाही आमचं लक्ष दुसऱ्या कशात लागत नाही.
आणि जे करतोय ते अस नाही कि करू नये ते करतोय.
तर हि माझ्या सारख्या लोकांची व्यथा सांगणे कठीण आहे.
सांगायचं कारण ,झाकीर भाईंचा एक  शेअर करतोय.त्यात ते जे म्हणलेत ते ऐकलेत तर मी काय म्हणतोय हे कळेलच पण,
या कोरोना आणि त्या मूळ तयार झालेल्या परिस्थितीत सगळे टेन्शन मध्ये आहेत.त्यांना नीट अर्थ बघितला ते म्हणलेत त्याचा तर रोजच आयुष्य जगताना फायदा होईल.कलाकार असाल तर कलेकडे आणि सादरीकरणाकडे बघायचा एक प्रगल्भ विचार मिळेल.
बघा आवडतंय का.🙏🏻
सोबत लिंक देतोय https://youtu.be/QyrUXQ5VVzI

मंगळवार, ९ जून, २०२०

मालक

-----: *घराचा मालक*:-----
माझं निरीक्षण या बाबतीत सांगतो बघा तुम्हाला पटत का.
मालकाच्या नावाची पाटी दारा बाहेर, घरावर आणि सरकारी कागदोपत्री नोंद राखून असते.
पण त्या वास्तू चा खरा मालक तो असतो का?
माझ्या मते बरेचदा नाही.का?तर मी माझं मत सांगतो.
एखाद्या घरी आपण गेलं तर त्या वास्तू च आणि घरात रहाणाऱ्या लोकांचं नीट निरीक्षण करा.
घरात जास्त वस्तू,सामान कुणाच आहे?एक कुणीतरी जे बोलतो ते इतर मुकाट ऐकतात.तो एक कुणी जनरली बोलताना त्याचा अधिकार बोलण्यातून दर्शवत असतो.त्याची हालचाल देखील बेपर्वा असते.तो हजर नसला तरी त्याची दहशत तिथल्या लोकांचं मन व्यापून असते.हे नको उचलू त्याला आवडणार नाही.तो नाहीये तोवर करून घे.त्याच्या येण्याची चाहूल सारखी घेतली जाते.हळू बोल तो/ती झोपलाय न.
आत्ता फोनवर बोलत बसू नको यायची वेळ झालीय.ते उचलून ठेव त्यानं बघितलन तर पंचाईत होईल.
एकूण तो,हजर असला किंवा नसला तरी इतर लोक त्याच्या दहशतीत असतात.जरा नीट बघितलं तर यातली कुठली तरी गोष्ट आपल्याला जाणवते.
मग इथं तो,मालक हा घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री असू शकतेच पण काही घरात बिघडलेली कन्या किंवा पुत्र रत्न असू शकतात.
आणि काही ठिकाणी त्या मालकाच्या स्थानी घरात नवीन जन्माला आलेल मूल असू शकत.म्हणून मग ,तो आताच झोपलाय उठेल हं तो हळू बोल.
त्याची खेळणी जागेवर ठेव नाही मिळालं तर घर डोक्यावर घेईल रडून.नुकतच विसरत जातोय तर त्याच्या हाती परत मोबाईल नको देऊ.
पहिल्या प्रकारात मालकाची दहशत आणि एकाधिकार शाही दिसते.
दुसऱ्या प्रकारात त्याच मालकत्व आनंदाने स्वीकारलेलं असत.
मग असत कि नाही मी म्हणलो तस.दारावर पाटी कुणाची आहे हे बघून मालक तोच असेल अस आपण धरून चालतो.पण ती पाटी इतकंच सांगते सरकार दरबारी या वास्तूची नोंद कुणाच्या नावे आहे.मग पाटी पुरुषाच्या नावे असली तरी आत सत्ता मुलाची किंवा बायकोची च चालते.पाटी बायकोच्या नावाची असली तरी घरात दरारा नवऱ्याचाच असतो.आणि नवा संसार असलेले दोघांच्या नावाने पाटी लावतात अगदी रोमन अँटिक पद्धतीत हिंदी फ्लिम स्टाईल,घर अमर मानसी का,,,,वग्रे.पण नव्याने आगमन झालेलं चिमुकल बाळ त्या दोघांवर हुकूमत गाजवून असत.अर्थात हि हुकमत प्रेमाने स्वीकारलेली असते.पालक म्हणून.
बरेच ठिकाणी खऱ्या मालकांबद्दल आदरयुक्त भीती असते.जी उत्तम.
आणि ते काहीही असलं तरी मालकाने कधीही त्या दारावरील आपल्या नावाच्या पाटीचा अहंकार करूच नये.तो सोडला तर ती वास्तू सर्वांची होते.अन्यथा त्या मालकाचा तो कैद खाना होतो.आणि तिथं रहाणारे वेळ येताच त्या कैदेतून आपली सुटका करून घेण्याचे प्रयत्न करतात.काही त्यात यशस्वी हि होतात.मग उरतात त्या फक्त चार भिंती आणि छप्पर आणि त्यात तो सो कॉलड मालक.
त्यानं हे नक्की मनावर ठसवून घ्यावं कि उगा छाती फुगवण्यात अर्थ नाही. किती मी मी म्हटलं तरी जे काही नावावर आहे अस वाटतं ते हुकूम होता क्षणी जिथं आहे जस आहे तसेच सोडून त्याच बोट धरून निघून जायचय.
मग तोवर त्या वास्तूत मालक होऊन तिचा कैद खाना करण्या पेक्ष्या घर का करू नये???
आणि अशी खऱ्या अर्थाने घराला घरपण देणारी मालक आणि इतर सदस्य मंडळी मी खूप बघितली आहेत.त्या करता dsk लागत नाहीत.
पण काही घर ती सुद्धा बऱ्याच प्रमाणात मी वर म्हटल्या प्रमाणे जो कुणी असेल मालक त्याचा कैद खाना असलेली हि बघितलीयत.
आता कुठं गेलात तर किंवा आत्ता वाचलीत पोस्ट कि नेहमी बघण्यात असलेली घर आठवा आणि ठरवा किती घर घरपण राखून आहेत.
काही घरात दहशत इतकी असते कि तो मालक आणि त्याचे कैदी वास्तू ची वस्तुस्थिती बेमालूम लपवून मालक गिरी आणि गुलाम गिरी बाळगून असतात.अशी घर पूर्णपणे काल बाह्य होवोत अशीच शुभेच्छा.
एक वेगळा विचार मनात आला तो मांडला.🙏🏻

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

कृष्णाप्पा

आमचे कृष्णाप्पा आठवले.70च वय.वरच्या बांधण वरून येत .म्हणजे चांगलं चार पाच किमी चालून.जुन्या फॅशन चा सदरा. धोतर.हातात काठी.डोईवर गांधी टोपी.तांबूस होत पोहोचे पर्यंत.गोरे होते न.काठी शिवाय हाती दोन शिसे भरलेले असत.आणि त्यांना सुतळीने गाठ मारून हातात धरायची सोय केलेली असे.शिसे बुचाने बंद केलेले असत.खनन आवाज करत ते दोन्ही शिसे झोपाळ्यावर बसताना जमिनीवर ठेवत.हुश्श असा आवाज करून टोपी काढून मांडीवर ठेवत.
एकदा मी त्यांना येताना बघून आधीच आत जाऊन पाणी आणून दिलं. अप्पा फुलपात्रात पाणी ओतून ते परत झोपाळ्यावर ठेवत मला म्हणले,हं.काय तुझं नाव ते,पाणी न मागता आणलंस ते चांगलय. पण सोबत गुळाची वाटी द्यायची शिकवलन नाही का तुझ्या आयशीन.
मी पळत स्वयंपाक घरात गेलो.आजीने गूळ वाटीत टाकून तयार ठेवला होता.गधड्या मला म्हणायच होतंस अप्पा आलेत म्हणून.ते जुन्या वळणाचे आहेत.गूळ पाणी देतात पाहुण्याला आधी.जा नेऊन दे वाटी.मग त्यांना वाटी नेऊन दिली.
हं,आता कसं. अरे मुंबईकरा हि रीत आहे आपली.लक्ष्यात ठेव.अस बाहेरून आलं कि पाणी उभ्या उभ्या प्यायचं नाही.आधी नीट बसावं.मग गुळाचा खडा तोंडात धरावा.मग पाणी घोट घोट प्यावं. आता हे शिसे आत नेऊन दे.आणि जपून ठेवायला सांग.मला परत लागतील ते.मागील खेपी तुझ्या आत्या बाईन एक फोडलन होतन.
ते ज्याला शिसा म्हणत ती काचेची बाटली मी नीट बघितली.हिरव्या रंगांची वर बूच बसवलेली आणि आत ओवा अर्क.
असे आमचे कृष्णाप्पा. दरवर्षी न चुकता तो ओवा अर्क घेऊन येत.तात्या पैसे देत.मग जरा गप्पा मारून परत जात.मितभाषी माणूस.ते रहात ते ठिकाण न घर खूप लांब होत गावापासून वेगळं अस.
मग त्यांच्या घरी आईला हळद कुंकूवास बोलवण आलं म्हणून सोबत गेलो होतो.मोठं आवारात घर होत.प्रशस्त अंगणी. गोठा. चाऱ्याचा साठा ठेवायला जागा बघून मस्त वाटलं.घरा मागे ओढा होता तो मे पर्यंत वहात असे.पण आजूबाजूला वस्ती नव्हती.दोन नोकर वस्तीस असत.झक्क बाजणारी आंब्याची झाड होती.आधी कातकरी आधी आंबे,फणस आणि बांबू चोरायला येत.पण कृष्णाप्पा खमके होते.हाती काठी न विजेरी घेऊन रात्री त्यांचा पाठलाग दूरवर करीत.सोबत त्यांचा गावठी कुत्रा हि असे.मग कातोडी समजले. बामण ऐकत नाय.मग चोऱ्या थांबल्या.कृष्णाप्पा चा मुलगा त्यांच्या सारखाच धीट.नोकरीत देखील होता कुठंतरी.एक दिवस सुट्टीत आलेला असता जनावर निघालं म्हटल्यावर खोचेरा घेऊन निघाला.जनावर चपळ निघालं.त्याला डसून पळू लागलं. मला डसून जाशील तसाच?म्हणत तो त्याही अवस्थेत त्याच्या मागे गवतात घुसला.जनावर मारलन न परत घरी आला.पण तोवर विष भिनल आणि गेला.
मग अप्पा आणि सुनबाई ,नातवंड राहिली फक्त.आधीच अबोल असलेला म्हातारा आणखी अबोल झाला.
एकदा मी असताना ते आले. मागची आठवण ठेऊन त्यांना गूळ पाणी नेऊन दिलं.तेंव्हा मात्र,आयुष्यमान भव. बाळ चा थोरला न रे तू?
हो.
रित बरी लावलीन आहे आईन .घे ते शिसे नेऊन दे घरात न सांडता.आणि म्हणावं पुढील वर्षी काही अर्क मिळणार नाही.अजून हवे असतील तर उदईक घरी येऊन घेऊन जा.
न राहवून मी म्हणलो,
अस का म्हणता अप्पा. तुमचा ओवा अर्क आम्ही पण नेतो मुंबईला.मला आवडतो.तिथं मिळतो पण तुमच्या सारखा नसतो.
थोडं हसून म्हणले,अरे तो अर्क आवडतो काय म्हणतायस.ते औषध आहे.आणि मी काही धंदा म्हणून करत नाही.तुमचे आमचे जुने समंध आहेत म्हणून मी घराकर्ता करतो तेंव्हा तुमच्या सारख्या आणखी एक दोन घरी द्यायला करतो.आता मात्र थकलोय.तो उपद्व्याप आता जमेलस वाटत नाही.आणि इथवर येताना अलीकडं धाप हि लागू लागलेय म्हणून म्हटलं हा बहुतेक माझ्या कडून शेवटचा अर्क.
आणि ते खरं हि झालं.अप्पा गेले काही दिवसात.पण त्यांचा ओवा अर्क त्याच्या ठसक्या सह आणि उग्र पण खमंग वासा सह अजून तसाच्या तस्सा आठवणीत आहे.

बुधवार, ८ जानेवारी, २०२०

बाल भारतीतला भैरू.

पहाट झाली. मी उठलो. ब्रश करून चहा घेतला. मोबल्या काढून वर काय ,बघू लागलो. (व्हाट्सप च मराठी भाषांतर:-वर काय
)
अरेच्या रात्री मस्त मैफल जमली होती तर? मग पोस्टवून प्रभात फेरीस निघालो.


भैरू आठवला का बाल भारतीतला बालक विहाऱ्यांनो? तो भैरू आता रिटायर्ड होऊन कैक वर्ष झाली असतील. कदाचित, त्याच्या मुलांची लग्न झाली असतील. मग दोन सुनांमध्ये,भला उसके पास मुझसे अच्छी साडी क्यो?असा प्रश्न उभा राहिला असेल. मग भैरू च्या मुलांची गोची झाली असेल.त्यांनी भैरू कडे वाटणी मागितली.भैरूने नाईलाजाने जमिनीची वाटणी करून घर तीन हिश्यात वाटून एक घराची तीन वेगळी घर केली असतील.तुम्हाला वाटणी दिली पण मी माझा नांगर मात्र माझ्याकडे ठेवणार कारण तो माझा ट्रेड मार्क आहे.त्या मूळच आजचा प्रौढ वर्ग मला ओळखतो.
मुलं म्हणली असतील ठेवा बाबा. तुमच्या मनासारखं होऊ दे. नाहीतरी जमीन राहिलीय कुठं. आम्ही ती विकून बंगले बांधले, गाडी घेतलीय. या घरातील हिश्यात आलेल्या रूम भाड्यावर दिल्यात.
किंवा
 भैरू आता शेतावर ट्रॅक्टर घेऊन जातो. इस्रायली पद्धतीने हायड्रो फार्मिंग शिकून एक मुलगा आलाय त्यानं शेती आधुनिक पद्धतीनं करणं सुरू केलंय. भरघोस उत्पादन.  ऑरगॅनिक प्रकल्प असल्याने त्यांच्या पिकांना जबरा मागणी आहे. धाकटा मुलगा रत्नांग्री च्या पशु वैद्यकीय कालेजातून डिग्री घेऊन गोधन वाढवतोय. त्याच्या गायीच्या दुधास न तुपास चढा भाव मिळतो. तुपाला तर 2 हजार भाव असून देखील वेटिंग असत. जोड धंदा म्हणून गांडूळ खत, गोमूत्र, शेणी पासून मच्छर मारक औषध अशी प्रोडक्टस ही जोरात विक्री होत्ये. एक सून पशु वैद्यक असल्याने घरचा Dr गुरांना मिळतो आणि आजूबाजूस असलेल्या सर्व गावातील जनावरे तिच्याच अंडर ट्रिटमेंट घेऊन मस्त असतात. दुसरी सून स्वखुशीने घर सांभाळते. तिच्या हाताखालील टीम घर आणि शेत दोन्हीकडच्या भोजन आदी ची व्यवस्था बघतेच पण ती इतर खाद्य पदार्थ तयार करून विकते ज्याला चांगली डिमांड आहे. शेतातील आंबे,फणस,आवळा,जांभूळ, केळी वग्रे फळांची वेगवेगळी उत्पादने करून ती उत्तम नफ्यात विकली जातायत. तिची आणखी एक टीम बाहेरची लग्न मुंजीची ची ऑर्डर घेऊन कॅटरिंग व्यवसाय जोरात सुरुय. नातवंडे इंग्रजी शाळेत शिकतात.
आणि भैरू आणि त्याची बायको अत्यंत समाधानाने हा सगळा व्यवहार भरल्या हृदयी पहात शेतातल्या स्वतः च्या विठुरायाच्या मंदिरात हात जोडत असतात. तिथं नेमाने किर्तन प्रवचन सुरू असतं आणि गाव दर्शनास येत असत.
आणखीन तिथं गेलात ,तर विस्तीर्ण गेट वर पाटी दिसते. भैरू फार्म हाऊस!!! पुढं आलात की गोल आयलंड मध्ये सुबक गार्डन फुललेली असून मध्यभागी तोच जो तुम्हाला आठवतो तो भैरूचा प्रसिद्ध आणि तुमच बालमन व्यापून राहिलेला नांगर त्यांच्या फार्म चा ट्रेड मार्क म्हणून तिथं कायमचा दिमाखात विराजमान झालेला दिसेल. दोन पैकी तुम्हाला आवडेल तो भैरू तुम्ही आपला मानून घ्या. मी निघतो प्रभात फेरीस। दिवस आनंदी जावो। 

सलील जोशी।