शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

पितरास एक पत्र.

माननीय पितर गण,
विनंती न लिहिण्यास कारण कि,

पत्रिकेत पितृदोष आहे.शांती करून घ्या.
अस वारंवार ऐकतो.आपले म्हणे मृत पूर्वज आपल्याला त्रास देत असतात.अकाली निधन,अविवाहित असता निधन,कुणी कर्ज न फेडता गेला, कुणी चोरी केली,कुणी कुणास मारहाण केली,फसवणूक केली असेल,कुणी कसली इच्छा पूर्ण न होता गेला,कुणाचा आपल्यावर राग असतो पण बोलून दाखवली नसत आपल्या पूर्वजांनी तर तो दोष म्हणे आपल्यास लागतो.
एक तर आमचे तुम्ही पारंपरिक घरातले लोक. मग आपल्याच खानदानात जन्माला आलेल्या जातकास कसला त्रास देता?तुम्हाला काही आपुलकीची वग्रे भावना दाटून येत कशी नाही.तुमच्या जीवनात काही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत किंवा तुम्हास करता आल्या नाहीत यात आम्हा नवजात लोक्स चा काय दोष? मी तर म्हणतो हे अस अपेक्षा भंग तुम्ही अनुभवलेत मग उलटपक्षी आम्हाला आमच्या अपेक्षा पूर्ण करायला मदत करा न.हे कसं बॉ चिवित्र वागणं तुमच.आमचं भल नाही न झालं म खानदानात कुणाच भल होऊ देणार नाही हि आपल्याच लोकांशी कसली दुष्मनी करता राव? त्या पेक्ष्या आपल्या खानदानाचे कुणी दुष्मन असतील त्यांना जाऊन छळा न!किंवा तुम्हाला ज्याने त्रास दिला त्यालाच पकडून धडा शिकवा.बरं आम्ही आमच्या परीने तुम्ही गेल्यावर श्राद्ध कर्म केलं न परवडत नसलं तरी?म आमची चूक कसली आली?आम्हाला का उगा छळतायत.त्या पेक्ष्या कुणी निर्धन असेल त्याला संपत्ती मिळवून द्या.निपुत्रिक असेल त्याला पुत्र किंवा कन्या रत्न प्रदान करा.कुणी अविवाहित असेल त्याच्या करता ग्यारेंटेड योग्य स्थळ जमवून द्या.मग बघा तुमची पुढली पिढी कशी सुखात नांदते आणि तुम्हास पूजितें का नाही ते.बाबांनो इहलोकी सर्व भोग बघूनही तुम्हास या लोकीची ओढ का अजून? बक अप भिडू.पुढच्या प्रवासास लागा. त्या करता आम्ही काही करावं याची वाट का बघता?मग तुम्हास या जन्मी जिवंत असताना काही करणं जमलं नाही तेच त्या जन्मात किंवा अवस्थेत टिकून आहे.म तुमचा नाकर्तेपणा कि आमचा?आमच्या जीवनात काही भली भर घालू शकत नसाल तर चैला अडचणी तरी निर्माण करू नका.या तुमच्या वागण्यान मला आता एक प्रश्न उगा कारण नसताना पडून राह्यलाय.तो असा,
तुमची भडास काढायला आम्ही तुम्हाला आयते सापडलो.पण तुम्ही आमची गोची करून ठेवलीय याची कल्पना आहे का तुम्हाला?
कशी? आता ते हि ईस्कटून सांगतो. मी पण मनात म्हटलं कि, आम्हास जरा पितृ दोष लागलाय तसा मी पण कुणाला लावून देईन.पण चैला आहे कोण ? कोणाला देऊ हा तुमचा वसा?उतत नाही मातत नाही पण तुम्ही दिला वसा घ्यायला कुणी उरलाच नाही!!!!
तेंव्हा एक रिक्वेस्ट तुम्हास.मी काय म्हटलं ते विचारात घ्या आणि शहाण्या सारखे वागा बघू.
मग पितृपक्षात तुम्हाला सजवलेली थाळी प्रेमान ठेवता बघा.
समस्त पितृ देवो भ्यो नमः🙏🏻🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा