शुक्रवार, २३ मार्च, २०१८

राहुल भाई

*राहुल*
आज दुपारी झोपायला जाणार इतक्यात फोन वाजला.व्हिडीओ कॉल होता.म्हटलं बालम क काय?पण राहुल चा फोन होता.उचलला तर म्हणला,
अरे साहब कहा हो आप ? कितने दिन हुए पता भी है यहा आये हुए?

हा यार बहोत दिन हुए, पर आजकाल मेरा आना उस तरफ होता हि नही इसलीये नही आ सका. बाकी आपकी याद तो रोज आती है भाई.
अच्छा तो आज आ हि जाइये आपसे मिलने को दिल कर रहा है.फिर अगले महिने तो मै गाव जा रहा हूं पेहली तारीख को.
  हा और जून के एन्ड मे आओगे.और मिलने पर आख मे पानी लाते हुए कहोगे के ,घर पर तो सब ठीक ठाक है पर याद आती है परिवार कि.
मी अस म्हणल्यावर हसत म्हणला,हा क्या करे याद तो आती हि है घर कि. पर आज आपकी आ रही है आजाइये .
हा भाई पक्का आता हूं.
म्हणत फोन ठेवला.
हा राहुल माझा पाणी पुरी वाला.गेली कैक वर्ष रात्री त्याच्याकडं खाऊन येतोय घरी.त्याच्याशी इतकं नात जमलंय कि घरचा वाटतो.आत्ता येताना त्याच्या कडे गेलो.मला बघितल्यावर मिठी मारलीन.खूप दिवसांनी हवासा वाटणारा जवळचा नातेवाईक,त्याहून दुसर म्हणायच तर मित्र भेटल्यावर वाटत तस वाटलं.लगेच एकाला थंड पाण्याची बाटली माझ्या करता आणायला पाठवलन.
साहब आप पिछले बरस आये थे 7 महिने हो गये तबसे आज आये हो. वो भी बुलाने पर.लेकिन आये तो अच्छा लगा मुझे.एकूण त्याच सर्व ठीक चाललं होतं.आम्ही दोघांनी एकमेकांची सुख दुःख एकमेकांना सांगितलीयत. म्हटलं राहुल घरी सगळं ठीक.तर सर्व ठीक आहे म्हणला.मुलाला या खेपी इकडेच शिकायला आणतोय माझ्या बरोबर. घर बांधून झालं.तिथं एक बाईक हि घेऊन ठेवलीय.आता गेल्या सात महिन्यात दीड लाख फायदा कमावला. त्यातले 50 हजार पोरांच्या आजारपण वग्रे करता घरात देणारेय.50 इथं ठेवलेत.आणि 50 पोरींच्या लग्ना करता पुंजी जमवतोय त्यात टाकणार.3 मुली 1 मुलगा आहेत त्याला. आणि सासुरवाडीला एक बोअर मारायचीय त्याला पस्तीस हजार खरच येईल. वसईत आला तेंव्हा पासून मी त्याच्याकडे जातोय.अतिशय अदबीने,प्रेमानं आणि आपुलकीनं खाऊ घालतो.जे दुर्मिळ होत चाललंय हल्ली.पण रस्त्यावर भेटलेली अशी काही माणसं मात्र खूप जवळची झालीत माझ्या.आणि ही दोघे तिघे आहेत.याची पाणी पुरीची गाडी नाहीये.बांबू चा ठेला घेऊन असतो.सर्वांशी हसून खेळून बोलतो.गिर्हाईक नेहमीच बांधलेलं आहे.खूप बायका यांच्याच कडे विश्वासानं येत असतात.काही कुटुंब ही.आज भरपूर गप्पा मारल्या.तोवर मला बसायला स्टूल दिल होतन.मी नेहमी एक पाणीपुरी आणि एक रगडा पुरी खायचो त्याच्या कडे ते लक्षात असतच त्याच्या. ते खाऊन मी निघतो म्हणलो तर अजून थांबा म्हणला म्हणून परत बसलो.मग काही गिर्हाईक गेल्यावर परत एक भेळीची पुडी समोर धरलन.नको नको म्हणलो तरी नाही खा च म्हणला.निघताना शंभर रु काढून दिले तर डोळे ओले करत म्हणला,पैसे के लिये थोडे ही बुलाया आपको. पैसे दे के तो खाते हि आ रहे हो आप, आज ये प्यारसे खिलाया है उसके पैसे दे के दिल मत तोडो.
काय बोलणार यावर ? मग माग पार्क केलेल्या बाईक च्या माग लोकांनी त्यांच्या गाड्या लावलेल्या.माझ्या कडून चावी घेऊन त्यानं गाडी त्या गर्दीतून काढून दिलीन आणि परत मिठी मारून म्हणला,साहब हो सके तो मेरे गाव जाने से पेहले एक बार फिर आना.बच्चा भी याद करता है आपको घर पर.वो अंकल आते है या नही .म्हटलं नक्की भेटून जाईन.
अशी जीव लावणारी माणसं रस्त्यावर मिळलीत.

बुधवार, १४ मार्च, २०१८

लिमये काका

माझे मेहुणे होते ,अवलिया माणूस. ssc पास .पण कार्गो शिपवर कप्तान होते.दुनियाभर फिरून आलेला स्मार्टनेस आणि इंग्रजीवर प्रभुत्व.सहा फूट उंच न भारदस्त शरीर.
मी कॉमिक्स, चांदोबा,किशोर वग्रे वाचत असे.एकदा त्यांच्याकडे रहायला गेलो होतो.त्यांना दोन मुली.ज्या माझ्या भाच्या लागतात पण आमच्यात दोस्ती खूप होती.मोठीला माझ्या सारख वाचायला आवडायचं.ती हँडर्सन च्या परीकथा वाचायची.मेहुण्यांनी हे हेरलं होत.अचानक संध्याकाळी आम्हा दोघांना बोलावली त्यांनी.आम्ही येऊन त्यांच्या पुढं उभं राहिल्यावर खिशातून नोटांचा छोटं बंडल काढून माझ्या हाती दिल.म्हणले,सलील तू न उज्वल पुस्तक वाचता अस बघतोय मी.आज आता जाऊन गिरगावतल्या पुस्तकाच्या दुकानातून तुम्हाला हवी ती न हवी तेव्हढी पुस्तक आणा आणि वाचा सुट्टीत. आम्हाला आनंद झाला.निघताना परत त्यांनी हाक मारून सांगितलं,जर पैसे हरवले तर चौपाटीवर जाऊन रडत बसू नका.मला फोन करा किंवा घरी या मी परत पैसे देईन.पण हे न होईल असं बघा.
आम्ही उड्या मारत दुकानात गेलो.आवडतील ती पुस्तक घेतली.उज्वलन मात्र मला सांगितलं,आपण थोडे पैसे ठेवूनच खरेदी करू.सर्व पैसे सम्पवून आले अस नको.( आता कळत तिला व्यवहार त्या वेळीच समजला होता😊)
मग घरी आलो न पुस्तकाचा ढीग बघत बसलो.बहीण आली न म्हणली,अहो पुस्तक आणायला पैसे दिलेत ते ठीक पण त्या दोघांनाच काय पाठवलेत? मी गेले असते न सोबत.काही वेडंवाकडं झालं असत म्हणजे ?
मेहुणे म्हणले,त्यांना आता बऱ्यापैकी समज आली आहे.सलील एकटा दादरहून गिरगावात येतो न? त्यांना सवय आता पासूनच करायला हवी स्वावलंबी व्हायची.आणि मी त्यांना तस काही झालं तर घरी फोन करा मी इथं बसून आहे म्हणलो होतो.
तुमच बाई एकेक भलतंच असत. बहीण म्हणली.
मग मेहुणे उठले आणि आमची खरेदी नीट बघितली.आणि दोघांकडे बघत म्हणाले,
तुमच्या खरेदीत परीकथा आणि तत्सम स्वप्नरंजन करणाऱ्या गोष्टींची पुस्तकं दिसतायत.विज्ञान विषयावर ची पुस्तक नाहीत.सलील तू शेरलॉक होम्स च आणलं स पण या पुस्तकात श्रीमान योगी सारखी किंवा ज्ञानेश्वरी,दासबोध का नाही आणावे वाटलं पुस्तक ? बहीण म्हणली,अहो त्यांच वय काय आणि तुम्ही दासबोध काय वाच म्हणताय?
तुला ही समजलं नाही.इतर त्यांच्या वयानुसार पुस्तक आणली ती ठीकच आहे.पण त्या पुढच वाचन हि त्यांनी करायला हवं ते ही याच वयात.त्यांनी जर आज ज्ञानेश्वरी ,दासबोध वाचला आणि त्यातील अगदी थोडं जरी त्यांना समजलं तरी त्यांचा आयुष्य आता कुठं सुरू होईल ,तेंव्हा पुढील आयुष्यात ते वाचलेलं प्रत्यक्ष्यात वापरता येईल त्यांना.जेंव्हा म्हातारे होतील तेंव्हा दासबोध कळून उपयोग नसणारेय कारण जे कर्तृत्व दाखवायचं किंवा लढायचं वय असत ते निघून गेलेलं असत.तेंव्हा दासबोध समजून काय फायदा होणार?म्हणून वाचन आता पासून च चौफेर हवं.
हे बहिणीला पटलं नाही म्हणा पण ती गप्प बसली.
मला ही त्या वेळी काही नीटस समजलं नाही.उज्वला ला म्हटलं,काका अस म्हणले ते आपण जास्त खरेदी केली म्हणून का ?
अरे नाही तस वाटत.आणि तसही मी म्हटलं होतं न तुला कि थोडे तरी पैसे परत देऊ त्यांना.ते दिले न आपण.
मग मला काही कळेना अस का म्हणले ते!
पण आता इतक्या वर्ष्यानी समजतंय त्यांना काय म्हणायच होत.
आणि मग रात्री ते हे हि म्हणले जेवताना, हि पोर टिपिकल मध्यम वर्गीय विचार करू लागलीयत आतापासून.
का म्हणता अस ?या बहिणीच्या प्रश्नावर ते हसून म्हणले होते,चैला याना भरपूर पैसे दिले होते मनमुराद खरेदी करायला त्यातले हि वाचवून मला आणून दिली.
😃

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

नवी ओळख गावाची

घर विकून दशक उलटून गेली.तेंव्हा मुंबई हवीशी वाटली.परिस्थिती अशी नव्हती कि ती प्रॉपर्टी तशीच ठेऊन दुसरीकडे जागा घेऊन रहाता येईल.नाईलाजाने विकावे लागले.पण नंतर ते घर मनातली जागा मात्र सोडत नाही.एक एकर च्या आसपास जागेत घर होत.त्या विस्तीर्ण आवारा मूळ ओढ लागतेय का ? हा प्रश्न मनात आला.पण तेच एक कारण नाही असं जाणवलं.तिथं असताना जी माणसं आजूबाजूस होती त्यांनी जे प्रेम दिल घेतलं ते अजूनही खेच दाखवत असत.आजही गेलो तर माझ्या जागेत मी पाऊल हि ठेवत नाही.तिथं आता लोकांचे बंगले झालेत.पण काही मित्रांच्या घरी जातो.काहींची घर नवीन रूप घेऊन उभी राहिलीयत काहींची मात्र होती तशीच आहेत.काल तर इथं येऊन गेलो होतो इतकी तशीच.पण दोन्ही बाजूची माणस मात्र बरीचशी तशीच आहेत.आजही गेलो कि तिच जुनी सलगी मिळते.नात काही नाही शेजारी होते,पण नातलगांकड जात नाही तिथं मात्र जातो.फक्त गावातली पिढी बदलली त्या मुळे बाकी कुणी ओळखत नाही.
या खेपी मात्र खूप बदललेली परिस्थिती जाणवली.जमलं तर परत तिथं जागा घेऊ ,हे मत राह्यलं नाही.
पूर्वी गावात इतकी सुबत्ता नव्हती.शेती किंवा मुंबई पुण्यात नोकरी करणारे लोक होते.कातकरी संध्याकाळी मजुरी करून जाताना अड्ड्यावर घसा ओला करून घरी जाताना पिऊन धिंगाणा करत असत कधी तरी.गावात हि पिणारे होते पण ते कळत नसे बाहेर.सोमवार च्या बाजारात काही दिवस चक्री फिरत असे तितकंच.ते ही पोलीस बंद पाडत असत.आपसात काही भांडण ही होत .मग पोलीस स्टेशन गाजत असे.पण ते ही क्वचित च.बाकी गावं तस शांत होत.
काल मात्र वेगळं चित्र बघितलं.लोकांनी जमिनी विकून पैसे केलेत.त्या मूळ पैसा असेल तिथं येणाऱ्या अन्य विलासी किंवा तो पैसा काढून घेणाऱ्या गोष्टी आल्यात.जुगाराचे अड्डे,दारूची दुकान झालीत.एक ओळखीचा भेटला. त्याच गणितं माझ्याहून कच्च होत.पुढं शिक्षण डोकं चालत नाही सबब होणं नव्हतं हे तेंव्हाच नक्की झालं होतं.आजही घरच्या सपोर्ट वर आयुष्य सुरू आहे.तर त्याला मी विचारलं,या पोरांकड पैसे कुठून येतात आकडा लावायला?दारू प्यायला? तो शांतपण म्हणला, आकड्यातूनच. म्हटलं किती मिळतील?दारू न चखना चा खर्च निघतो?घरात देणं राहू दे.तो म्हणला, मग.
पण ते खेळतात कसं?किती इन्व्हेस्ट केले कि किती रिटर्न मिळतात?
तो मंद हसत म्हणला,ये सांगतो.मग एक पट्टी खिशातून काढलीन छापील.त्यावर वरची ओळ 1 ते 0 असे दहा आकडे होते. खाली तीन तीन आकड्याचे समूह.त्यांच्या एकाखाली एक रांगा होत्या.
आता हा सिक्वेन्स धरल्यास ही फिगर अपेक्षित आहे.मग त्याचा हिशेब असा होतो.असा आला तर ब्रॅकेट होत.अस आलं ,त्याला संगम म्हणायच.अस त्यानं 15 मिनिट माझं बौद्धिक घेतलं पण शेवटी ते ही गणित माझ्या डोक्यावरून गेलं.म्हटलं हे काही समजत नाहीये.तो हसून म्हणला,लावायला लागलं कि समजेल हळूहळू.मग किती लावू शकतो?
5रु पासून कितीही.
समज 10 किंवा 20 रु लावले तर किती मिळतात?
500रु ही.अरे त्या रूपक न परवा लावले बरेच तर त्याला 3लाख मिळाले.
मी उडालो.म्हटलं मग ते मिळतात कधी आणि रोख देतात का?
म!सकाळी लावले कि संध्याकाळी घेऊन जायचे मिळाले तर.त्याला आम्ही म्हटलं,आता मिळालेत तर कर्ज फेडून घे न मोकळा हो.पण ते कुठलं ऐकायला.परत सगळे घालवले.
हा कारभार सुरू झालाय गावात.तरणी पोर दारू च्या गुत्त्या वर,पानाच्या टपरीवर आकडे लावत किंवा टोळक्याने टिंगल टवाळी करत उभी असतात.शेती विकून किंवा बापाच्या जीवावर घेतलीय ती बाईक,केसांचा नवा भांग, तोंडात सिगरेट.अस नव्हतं पूर्वी.
हे गावातल्या लोकांचं असताना परदेशी लोक म्हणजे भय्ये,बंगाली वग्रे येऊन गावाभोवती असणाऱ्या कंपन्यात नोकरी करून गावात घर घेऊन राहिलेत.किंवा त्या कंपन्यांनी आवारात त्यांच्या करता घर बांधलीत.पाणीपुरी,चायनीज,फळ अस गाड्यावर विकतात आणि पैसे कमवतात.गावातली पोर मात्र  निरुद्योगी होऊन राह्यलेत.किंवा गुंडगिरी बरीच वाढलीय.गॅंग ही तयार झाल्यात.हल्ली काहीजण आत गेल्याने जरा शांत आहे म्हणे.हे कमी म्हणून का काय आता गांजा,ड्रग च्या गोळ्या ही आल्यात गावात.
एकूण निराशाजनक स्थिती बघून वाईट वाटलं.परत तिथं जाऊन राहू हे मत आता बदललं आहे.
आता फक्त जुनी पिढी आहे तो वर कधी तरी त्यांना भेटायला जायचे मग मात्र मनातल्या जुन्या आठवणी ची उजळणी स्वतः शी करण्यात च सुख आहे हे खरं.
काळ बदलला .
तरी साली पावलं तिकडं जाऊ पाहतील च पण पहिली ओढ नक्की नाही रहायची.