शुक्रवार, १८ जुलै, २०१४

-******- कलंदर कलाकार -*******-

                                                     -******-  कलंदर कलाकार  -*******-
   

              कलाकारांचे किस्से तुम्ही हि ऐकले असाल . काही मी ऐकलेले सांगतो .
           गुरु शिष्य नात किती घट्ट असत . पूर्ण विश्वासाच . एक विद्यार्थी गुरूगृही तबला शिकायला रहात होता . सगळ सुरळीत सुरु असताना गुरु काही कामानिमित्त काही महिने बाहेर गेले . मी शिकवलंय त्याचा रियाज करा अस सांगून . काही दिवसातच या शिष्याला उदास वाटू लागल . गुरूंच्या बायकोने विचारलं , कारे बाळ अस का ? गप्प ,उदास असतोस . हा म्हणाला काही नाही गुरुजी नाही आता शिकू कसा पुढच ? ती माउली  म्हणाली, हात्तीच्या एव्हढंच न मग मी शिकवते . हा चाट पडला . तुम्ही शिकवणार ? हो त्यात काय . माझे वडील तबलजी आहेत . त्यांनी माझ्या लग्नात तीनशे कायदे आणि तेव्हढ्याच गती , रेले अस तुझ्या गुरुजीना हुंडा म्हणून दिलाय . आणि त्या विद्यार्थ्याला गुरु पत्नीने पुढील शिक्षण दिले .
             होय जुन्या काळी कलाकार लोकं हुंडा म्हणून विद्या घेत . आणि जो देणारा माणूस जे हुंडा म्हणून दिलाय ते स्वतः कधीच वाजवत नसे . त्या गोष्टींवर कायम साठी पाणी सोडत असे . म्हणजे त्याच्या कडे किती ज्ञान असेल . आणि ज्या गोष्टी द्यायच्या त्या हमखास रंगणाऱ्या . निवडक अश्या .
             अश्या पाचशे गती लाहोरहून हिंदुस्थानात आल्या होत्या . त्या आजही झाकीर भाई आणि अन्य कलाकार वाजवतात . काही कलाकार अश्या चांगल्या मैफिलीत रंगणाऱ्या गोष्टी अडचणीच्या काळात सावकाराकडे गहाण ठेवत असत . आणि सावकारही ते मानून पैसे देत असत . अश्या गहाण गोष्टी कितीही फर्माईश लोकांनी केली तरी कलाकार गात वा वाजवत नसत . इतकी इमानदारी होती .
           आणि कले  विषयी अभिमान हि तसाच असे . तबल्याचे महान उस्ताद अहमद जान थिरकवा . शिकलेले नव्हते . त्यांचा एकदा रेडिओवर
कार्यक्रम रेकोर्ड झाला आणि चेक आला . त्यांनी अंगठा उमटवला . एक अतिशहाणा अधिकारी त्यांना कुस्कटपणे म्हणाला ,काय उस्तादजी तुम्हाला सही करता येत नाही ? यावर थिरकवा म्हणाले , आपके दुनियामे  लोग पढे लिख्हे है ? बहोत  है तो म्हणाला. मग उस्तादजी हसून म्हणाले , लेकिन थिरकवा कितने है . एक हि है . त्या अधिकार्याची बोलती बंद झाली .
          एकमेकान विषयी प्रेम हि तसेच असे . जात पात धर्म हे काही आड येत नसे . हेच थिरकवा बाल गंधर्व यांचे तबलजी होते . पण फक्त त्यांचीच गाणी वाजवत . पुढे गंधर्व कंपनी फुटली आणि काही लोकांनी तीच नाटक करायची ठरवल . ते थिरकवांकडे वाजवाल का आमच्या कडे अस विचारायला गेले . थिरकवां म्हणाले , बजा तो लूंगा  पर गंधर्व कहांसे लाओगे ? नाहीच वाजवल इतर कुणा बरोबर . मग गंधर्वांच्या उतरत्या काळात गंधर्व एका मंदिरात गात होते . थिरकवां तिथे आले . दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि उठून घट्ट मिठी मारली . दोघांच्या डोळ्यातून अश्रू घळघळा वहात होते . मग अर्थातच साथीला थिरकवा साहेब बसले . अस प्रेम आणि आदर एकमेकांच्या विषयी . याच थिरकवा साहेबांच्या वर  एक फिल्म तू नळीवर पाहिली होती . त्यात त्याचं घर राहणीमान पाहायला मिळत . पण मला विशेष वाटल कि त्याचं वय पंचाहत्तर किंवा जास्त असावं पण एका दृश्यात झोपेत हि टक्कल पडलेल्या डोक्यावर बोट तबलाच वाजवतायत .
           आणि एका गायकाची गोष्ट वाचली होती . या गवय्याच्या प्रेमात एक बाई पडली . लग्न झाल . सुरवातीचे दिवस छान गेले . मुलगीही झाली
पण या बाईला छान छौकीची सवय . त्यामुळे पैसा संपला . मग बाई एका धनिकाचा हात धरून निघून गेली . जाताना मुलीला घेऊन गेली .मुलीला भेटायचा प्रयत्न करू नका अस बजावून .  या गवय्याला खंत काय जास्त होती कि बच्ची को पूरी तालीम नाही दे पाया . काही वर्षांनी रेडीओ वर त्या मुलीच गाण लागल . हे ते गाणं कुणाच्या तरी घरातून ऐकू येणाऱ्या रेडीओ द्वारे ऐकत होते . गाण संपल आणि यांच्या डोळ्यात पाणी वाहू लागल . बरोबरच्या माणसाने विचारल क्या हुआ उस्तादजी बच्ची अच्छा गायी . तर म्हणे नही, वो ऐसा नही है . पर कसूर मेरा है . मै हि उसे पुरा निवाला नही दे सका . मग हे सरळ निघून शहरात आले . तसेच रेडीओ स्टेशन वर गेले . आधी कुणी ओळखलंच नाही साध्या वेषामुळे . बर्याच वेळाने यांचा चाहता असलेला माणूस आला . यांना पाहून धावत आला . पाया पडला . उस्तादजी आप आज आये ? हमने कितने खत लिख्खे  के आपका एक तो प्रोग्राम रेकोर्ड करे . पर आपने जवाब हि नाही दिया . उस्तादजी म्हणाले बेटे आज करले तू रेकोर्ड . जाने फिर मोका मिले न मिले . मग अधिकार्यांना विनंत्या करून रेकोर्डिंग झाल .
           उस्तादजीचं गाण प्रसारित झाल . खूप आवडल रसिकांना . मग काही दिवसांनी बातमी आली कि यांची मुलगी परत गाणारेय रेडीओ वर. त्या दिवशी हे परत त्या घराबाहेर उभे राहून आपल्या मुलीच गाण ऐकू लागले . तीही तेच गात होती जे यांनी गायला होत . बाप आपल्यासाठीच गायला हे तिला कळल होत . बापाच गाण ऐकून तिन आपल्या चुका सुधारून गायली . तिलाही हे माहित होत कि आपला बाप आपल गाण ऐकणार . गाण झाल आणि उस्तादजी म्हणाले अब तालीम पूरी हुवी . मैने पूरा निवाला खिलाया बच्ची को . आणि भिंतीला टेकत बसले ते शेवटच .
             असे किती तरी कलंदर कलाकार . त्या सर्वांच्या साधनेला प्रणाम .

बुधवार, २ जुलै, २०१४

नटवर्य

काही नमुने असे भेटले कि यांची किव करावी कि हसावं हे समजत नाही . एक नटवर्य होते . सौभद्र सारखी संगीत नाटक एकपात्री करत . उंची पेक्ष्या रुंदी जास्त . अर्थात तुंदिल तनू . डोक्याचा आकारही नक्की कसा ते सांगता येत नाहीय . केसही कुरळे विरळे . दात एकमेकात शर्यत लावल्या सारखे ओठाबाहेर पडू पाहतायत असे . एका जुन्या कलावंताची गायकी हुबेहूब आत्मसात केलेली . पण रेकोर्ड ऐकून केल त्यामुळे बरोबर तीन साडे तीन मिनिट रेकोर्ड प्रमाणे छान गात . पण आता अर्जुन करायचा तर व्यक्तिमत्व आकर्षक नको ? पण नाही अंगात अर्जुन गाण्यासहित संचारलेला. यांच्या बरोबर तबल्याची साथ काही कार्यक्रमात केलेली होती . तालाकडे पहातच नसत . बेताल होत असत अस नाही पण गाण्यातून जी तालाची चौकट जाणवते ती मिसिंग .
               एकदा यांच्या ७५व्या प्रयोगाला साथीला गेलो होतो . एका महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांचे मित्र आणि संगीताचे चाहते असल्याने त्यांनी त्यांच्या महाविद्यालयाचा हॉल प्रयोगाला दिला . श्रोते हक्काचे हवेत म्हणून त्यांच्या वसती गृहातल्या मुला  मुलींना आणून बसवलं . हे पाहून मला आधीच हसू आल . ती कार्टी आल्यापासून भंकस करत होती  आपापसात . पूर्ण प्रयोग न करता निवडक गाणी आधीच्या वाक्यान सकट म्हणायची अस होत . ठीक ठाक चालू होत सगळ . आणि स्टेज वर अर्जुन आला …… हुम्म्म्म करत खसखस सुरु झाली . पोर दबक्या आवाजात म्हणत होती बघ  रे अर्जुन असा होता . जाम हसत होती खाली मान करून . कारण सर खुर्ची घेऊन बसले होते बाजूला . मग पद सुरु केल अर्जूनान .'' मी कुमार …''आणि आत्ता पर्यंत दाबून ठेवलेली वाफ फास्स्स्कन उसळली . सगळी तरुण मंडळी या कुमाराला पाहून फुटली होती . मग कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला .
            यांचेच एक मित्र धैर्यधर करीत . एकदा मुंबईतील नामवंत मंडळींचं नाटक होत गावात . यांचा धैर्यधर फ़ेमस .  आता वय पंच्याहत्तर . पण एक प्रवेश तरी मी करतो अस म्हणाले . त्या नाटकवाल्यांनी चालेल म्हटल . पण या पंच्याहत्तरीच्या धैर्यधराला पाहून मुंबईची हिरवीण रंगमंच्यावर जी हसू लागली ती थांबेच ना . शेवट विंगेत जाऊन हसून घेतलन याचं गाण होईस्तोवर आणि पुढचा प्रवेश हि मुश्किलीने हसू दाबत केलान. 
         








घरटयात फ़डफ़डे गडद निळे आभाळ
फ़ांदीवर झुलते हिरवी पाऊल धूळ
कानावर आली अनंतातुनी हाक
विसरूनि पंख पाखरु उडाले एक


पश्चिमेस कलला निळ्या पुलाचा खांब
ओघळले त्यावर नक्षत्रांचे थेंब
त्या पुलाखालुनी गेले उदंड पाणी
अन वाहुनि गेली अज्ञानातील गाणी


माळावर इथेच उजाड विहिरीआड
वार्धक्य पांघरुन बसले वेडे झाड
एकदाच गेली सुगंधी वाट इथून
निष्पर्ण मनाला डोळे फ़ुटले आठ


हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ
या विदूषकाला नाही रडाया वेळ
लावून मुखवटे नवा खेळ चल लावू
ठेवून सावल्या पडद्यामागे जाऊ


भेटणार नाही, शपथ नको तू घालू
डोळ्यांत कोंडला श्वास, नको तू बोलू
जा घरी सांग लाजून जराशी नीट
जाताना चुकली पाणवठ्याची वाट


संपेल कधी ही शोधायची हाव
फ़ोडिले दगड दशलक्ष दिसेना देव
पसरतो शेवटी हात तुझ्या दारात
अश्रूत भिजावी विझताना ही ज्योत


आरशात पाहती कोण कुणाचे रुप
देहात दिसे का तुजला तुझे स्वरुप
बघ गेला पारा फ़ुटला आरसा जाड
दिसले रे दिसले, ’अरुप’ आरशाआड


दाटल्या गोठल्या विस्मरणाच्या नाड्या
धवती रुळावर त्याच त्याच त्या गाडया
ती शिटी, तो दिवा, सिग्नल पडतो तोच
जखम तीच, त्यावर माशा बसल्या त्याच


देणार काय मी सूर्य उद्या जर आला
मागेल मला दे पाणी आंघोळीला
कोरड्या किनारी फ़िरे कल्पना वेडी
मृगजळात रुतली तिची बिचारी होडी


हा ग्रंथ फ़ाटला उरले मधले पान
ते अपूर्ण होते की, उरले विस्मरण
ती दोनच पाने: पहिले अन शेवटचे
राहिले शेवटी तसेच वाचायचे


मी व्यास वाल्मिकी ज्ञानाई मी लिहीली
पाण्यात परंतु ओवी वाहुनि गेली
जरी काच तडकली वात जळे आतील
मी जाईन जेथे चंद्र-सूर्य येतील


मी शब्द परंतू मूर्तिमंत तू मौन
मी पंख परंतू क्षितिजशून्य तू गगन
काजळरेघेवर लिहिले गेले काही
(अन) मौनाची फुटली अधरावरती लाही


वाजली शिटी अन हलली दख्खन राणी
वाजली शिटी अन हलले काजळ पाणी
वाजली कंकणे, पदर जरासा हलला
ओठावर हिरवा तीळ जरा विरघळला


शहाण्या शब्दांनो हात जोडतो आता
कोषात जाउनी झोपा मारीत बाता
रस रुप गंध अन स्पर्श पाहुणे आले
घर माझे नाही, त्यांचे आता झाले



संपली वही मोडले टोक टाकाचे
लिहीशील किती रे स्पंदनक्षण श्वासांचे
घे हात उशाला खुशाल दे ताणून
देईल कोण तुज स्वप्न तुझे आणून


गेलीस समोरुन आडवी वाट करुन
गर्दीतुन बघशी पुन्हा पुन्हा का वळुन
ठेवून उरी पिचलेली हिरवी काच
भिरभिरली स्वप्ने सप्तपदीवर पाच


का सतार तुटता उठतो वाजवणारा
अन ओल खुणाही थेऊनि गेल्या गारा
बघ चाफ़ा सुकला मावळला तो गंध
दे सोडुनि वेड्या शोधायचा छंद


थकलास तुडवुनी निवडुंगाचे रान
का वळून बघशी असे तुझे का कोण
दे दगड उशाला पांघर काळी माती
ह्या जमल्या मुंग्या शोकगीत गाती


जळल्यावर उरते एक शेवटी राख
ती फ़ेक विडी तोंडातील काडी टाक
जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी
दिव्यता अमरता मायावी फ़सवी खोटी


ही जुनीच माती नवी बाहुली व्याली
अन जुनेच कुंपण, नवी मेंढरे आली
या जुन्या नव्यावर कुणी बांधला पूल
या जुन्याच  वाटा नवे उमटले पाऊल


ही भूक शिकविते मागायाला भीक
अन भीती म्हणते गळा काढुनि भुंक
भूक आणि भीती देवाची दैवाची
शिकविते ज्ञातही कोणी अज्ञाताची


या इथेच पडलो होतो काल पिऊन
या इथेच पडले एक विलक्षण स्वप्न
पाहून रिकामे मद्याचे ते पात्र
उतरून पायरया धावत आली रात्र


जे आहे येथे तेच खरे रे एक
जे नाही येथे नसे कुणा ठाऊक
स्मृति म्हणजे जगणे, विस्मृति म्हणजे मरणे
मी प्यालो म्हणुनि सुचले हे बडबडणे


मी कोण? कोठला? कुठे मला जायाचे?
का एकच गाणे हेच तुला गायाचे
ते जुने प्रश्न आणि जुनाच त्यांचा वाण
प्राचीन तिरडीला नव्या सुतळीचा ताण


मी मुक्त म्हणे हा वृक्षावरचा पक्षी
आभाळ एकटे आहे त्याला साक्षी
पण कुणी दिले हे आभाळाला पंख
शाश्वतास बसला अशाश्वताचा डंख


का प्रवास म्हणतो टप्पा हा शेवटचा
वर्तुळात फ़िरतो कोष मध्यबिंदूचा
प्रारंभ नसे ना शेवट या रेषेला
प्रश्नातच असते उत्तर ज्याचे त्याला


एकटा परंतु गर्दीतील मी एक
गर्दीत चिरडले गेले माझे दु:ख
एकटा आज मी निर्जन एकांतात
द्या परत मला हो, हवे मला ते दु:ख


विसरावे ऐसे जवळ असावे काही
मुक्त हस्त द्यावे असे असावे काही
गाळावे अश्रू दु:ख असावे खोल
कुणी देईल का मज त्या दु:खाची भूल


पाहिले परंतु ओळख पटली नाही
ऐकले परंतु अर्थ न कळला काही
चाललो कुठे पायांना माहित नव्हते
झोपलो परंतु स्वप्न न माझे होते


ऋण नक्षत्रांचे असते आकाशाला
ऋण फ़ळाफ़ुलांचे असते या धरतीला
ऋण फ़ेडायचे राहुन माझे गेले
ऋण फ़ेडायाला पुन: पाहिजे मेले


कोरुन शिळेवर जन्ममृत्यूची वार्ता
जा ठेवा पणती त्या जागेवर आता
वाचील कुणीतरी होताना उत्खनन
म्हणतील कोण हा, कशास त्याचे स्मरण


ही युगायुगांची आहे अक्षर यात्रा
एकदाच भरते स्मशानातली यात्रा
खांद्यावर घेऊनि शव फ़िरतो जन्म
राखेंत अश्रुला फ़ोटला हिरवा कोंब


रॉय किणीकर