रविवार, २८ डिसेंबर, २०२५

जुनी बिल्डिंग

 


आज एक मित्र भेटायला आला होता.छान गप्पा झाल्या.मी आधी रहायचो ती जागा त्यानं घेतली होती. मग तो हि सोडून मुंबईत गेला.आपली जुनी बिल्डिंग आहे का रे अजून?म्हटल चल दाखवतो.इमारत अजून तग धरून शेवटची घरघर सहन करत उभी आहे.अंगभर भेगांच्या जखमातून शरीराच्या नसा
भासत असलेल्या लोखंडी शिगा उघड्या पडलेल्या लेऊन.सर्वांची दारे निखळून पडलेली. एका दारावर मराविम.
ची नोटीस अजूनही काळी अक्षर फिकट असली तरी दाखवत होती.
होती.
एकेकाळी जिवंत असलेली वास्तू माणसाविना भकास झाली आहे.
सर्व घरातली माणसं आठवली.एकत्र जगलेले आयुष्य आठवल.सर्वात महत्वाच म्हणजे आम्ही तीन मित्रांनी त्या जागेत एकत्र केलेला तासनतास रियाज,एकमेकांची केलेली मस्करी,मारलेल्या गप्पा सगळ जसच्या तसं आठवल.
मित्रा,तू वॉल टू वॉल लावून घेतल्यास त्या टाईल्स बघ अजूनही तश्याच आहेत रे.
हो.त्यावेळी लाख भर रू खर्च करून लावल्या होत्या.
म्हटल त्या अजूनही ईमान राखून आहेत शाबूत.बाकी इमारत मात्र वार्धक्याने,दुर्लक्ष झाल्यामुळे फक्त शेवटचे श्वास घेत आहे.
त्या जराजर्जर वास्तूला सोडून निघालो.आज फक्त तिचा निरोप घेतला होता.पण ती जेव्हा पूर्ण नामशेष होईल तेव्हा मात्र आमची सगळ्यांच्या आठवणींच्या जुन्या खुणा बेघर होतील.पण नाही.त्यांना आमच्या मनात आम्ही असू तोवर तरी रहायला कायमची जागा नक्की राहील.शेवटी महत्त्व वास्तूला नसून तिच्यात राहणाऱ्या माणसांचं असत.दगड विटा सिमेंट नुसत्या भिंती तयार करतात.पण त्या रहाणारी माणसं आणि त्यांच्यातल आपसातील नातं त्या वास्तूला घर करतात.त्या घराला मग घर मिळत ते माणसांच्या मनात.