गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

तलखी.

 लाईट गेलेत.खूप उकडतंय.घराची आठवण आली.तिथ सेम असंच असायचं.लाईटचा भरोसाच नाही.नेमक दुपारी आणि रात्री गायब.पण आता ब्लॉक मध्ये आणि त्या वेळच्या घरात यात बरीच तफावत आहे.

तेंव्हा,बाहेर पडवी च्या गजाना बाबांनी पडदे करून लावले होते.त्यावर मस्त पाणी शिंपडून घ्यायचं दुपारी जेवण झाली कि. अंगणातून झळ मारत असते गरम हवेची ती मग जाणवत नसे.उन्हाळा जरा कमी दाहक होई.आमचे तात्या तर उकाडा कमी करायला अंगावर पंचा ओला करून पांघरत. मग त्यांनी पूजेकर्ता वापरलेल्या चंदनाचा आणि फुलांचा सुगंध त्यांच्या भोवती दरवळू लागे. मी नी बाबा पण तसच करत असू.झोप झाली कि झोपाळ्यावर झोके घेत बसायच.माज घरात सारवलेल्या जमिनीवर अंग टाकून झोपलं कि गार वाटे.बाळंतीणी च्या खोलीतून आढी तले आंबे सुवासाने आमंत्रण देत.चहा झाला कि सर्व जण मागच्या पडवीत किंवा स्वयंपाक घराच्या उंबऱ्यात पिकलेल्या आंब्यांची रोवळीच घेऊन बसत.चुपून आंबे खायचे नी साली बकुळीच्या अंगणात टाकून ठेवायच्या. मग गोळा करून गायी बैलांना द्यायच्या. अख्खे रायवळ आंबे पण गुरांना देत असू.आवाडात मागच्या आंब्यावर कोकीळ कुहू कुहू करत बसे.

अंगणात पाणी शिंपडलं कि मस्त वाटे.संध्याकाळी कुपणी पलीकडील मोठ्या झाडाची पडलेली जांभळ वेचायला जायचं.मित्रांसोबत भरपूर खेळून दमल कि त्याच झाडा पुढून गेलेल्या रस्त्याच्या बैल गाडी नी st जाऊन पडलेल्या चाकोऱ्यात असलेल्या मऊ पण गरम लाल मातीत पाय बुडवून बसायच.मग पाय दुखत असतील तर बर वाटे.आणि गुर पाण्यावर न्यायची.तळ्यात आधी उभ राहून ती पाणी पिताना बघायला मस्त वाटे.बैलगाडी तळ्यात बैला सह उतरवून गुडघा भर पाण्या उभी करायची.मग बैलांना काथ्याच्या घासणी न घासून अंघोळ घालायची.बैल देखील सुखावून हि सेवा करू देत.तोवर उन्ह उतरली असत.संध्याकाळ वेगळी असे.

आत्ता सगळं आठवलं.पण आता ते सगळं नाही.उरली फक्त तलखी.


बुधवार, ३ एप्रिल, २०२४

लय

 तबल्याची किंवा गाण्याची मैफिल संथ लयीत सुरु होऊन मध्य नी मग दृत लयीत संपते.

पण आता वाटत,आयुष्याची मैफिल मात्र उलट प्रवास करते.बालपण, तारुण्य,दृत लयीत केंव्हा गेल समजतच नाही.मग मध्यवय आलं कि आयुष्य मध्य लयीत प्रवेश करत.मग येणार वार्धक्य शेवटी इतकी विलंबीत,संथ लय पकडत कि मैफिल शेवटा कड आली तरी संपता संपत नाही.


काही नाही,सहज आलं मनात.मध्य लयीत आहोत तिथंच मैफिल संपावी वाटत.हा उलट लयी चा प्रवास इथवरच ठिक. पण संगीतात रसिकांची इच्छा मैफिल लांबवते.आयुष्यात मात्र देवा च्या इच्छे वर भैरवी कधी ते ठरत.