दिवाळी.
सणांची चाहूल आता tv आणि इतरत्र जाहिराती वरून लागते.
अलार्म काका ची जाहिरात बघितली नी दिवाळी जवळ आल्याची जाणीव झाली.
अश्या वेळी मग मन भूतकाळात जात.
गावाकडच मोठ घर.सभोवती भरपूर चौ.फु.जागा इतकी कि...
आधी शाळेत दिवाळीच्या अभ्यासाची वही सजवायची असे.
मुंबईत चाळीत आणि रस्त्यावर लगबग सुरु होई.बाजार पेठ बहरात आजही येते.पण त्यावेळच अप्रूप वेगळच होत.महागाई तेंव्हाही होती पण आजच्या इतकी जाणवत नव्हती मध्यम वर्गास.फटाके शे दीडशे मध्ये खूप येत.त्या लड्या एकदम न वाजवता सुट्या करून एकेक पुरवून फोडायची पद्धत होती.व्यापारी मात्र रस्त्यावर फटाक्याचा ढीग फोडत.
किल्ले व्हायचे बच्चा कम्पनीचे.गावी मस्त सारवलेली अंगणी भुरळ घालत.रात्री तिथ मांडवा खाली झोपायची ऐश उपभोगलीय याच समाधान आजही वाटत.
गावी व्यापारी लोक आजोबांना शिधा आणि टोपली भर फटाके घर पोच करत.फराळ तयार करायला शेजारणी मदतीस येत एकमेकींच्या.जाताना आणि दिवाळीत फराळाची देवाण घेवाण होत असे.अंघोळीस कुणी बसला कि अंगणात फटाके वाजत.घरीच केलेला पारंपरिक बांबू चा कंदील झक्कास दिसे.
मुंबईत आयते मिळत.चांदणी तीही फोल्डिंग ची फेमस होती.
एक आठवण आजही कोरून राहिलीय मेंदूत.
माझा मामा तेंव्हा गावाहून मुंबईस आमच्याकडं आला.तेंव्हा 15 वर्ष्य वय असावं त्याच.नोकरी नव्हतीच.आई वडील गेलेले लहानपणी म्हणून बाबांनी त्याला गावच्या घरी आणलं.तो तिथ आजी आजोबा सोबत राहत असे.आजोबानी प्रवास खर्च आणि थोडे जास्तीचे म्हणजे विस पंचवीस रु त्याला दिले होते.तो यायच्या आधी आई खुश होतीच पण तिन मला सांगितलं,मामा येतोय पण त्याला त्रास द्यायचा नाही हट्ट करून कसलाही म्हटलं,मी कधी कुणा कड तसा हट्ट केलाय का?
तस नाही रे.पण त्याला खर्चायला पैसे नसतात.तो कमवत नाही न अजून.तात्यांनी उतार खर्च दिला असेल तितकाच.
तू नको काळजी करू.मी नाही काही मागणार त्याच्या कड.
आणि एक दिवस आधी मामा आला.आजही लख्ख आठवतंय मला.किरकोळ शरीर्यष्टी चा मामा दोन जड पिशव्या घेऊन आला.खूप आनंद झाला तो आला म्हणून.मग आईन सांगितल्या प्रमाणे मी गप्प बसलो.त्याच चहा पाणी झाल नी तो मला म्हणला,तू का गप्प?ये इकडं.
आणि त्याम एक पिशवी मोकळी केली.त्यात आजीन दिलेला फराळ,मेतकूट अस काय काय होत.आणि दुसरी पिशवी मात्र मला जवळ घेऊन उघडत म्हणला,हे तुझ्या करता.
चक्क फटाके होते त्यात.इतक मस्त वाटलं.मग त्यातलं एक पाकिट काढत तो म्हणला,हे बघ हे विशेष आहे.नवीन आलंय अस दुकानदार म्हणाला.बघितलं तर ते स्वस्तिक च्या आकारातलं भुई चक्र होत.पेटवलं तर प्रत्येक दांडी वेगळी पेटली आणि उलट सुलट फिरली बराच वेळ.
आई म्हणाली,अरे इतका खर्च का केलास?कुठून आणलेस पैसे.
अगो तात्यांनी दिले मला त्यातले वापरले.मी कुठून आणणार पैसे?
अरे मग तुलाच ठेवायचे त्याला फटाके का आणलेस?
असू दे.भाचा आहे माझा तो.मग मला जवळ घेऊन एक पापी घेतलीन.त्या दिवशी इतका आनंद झाला ते चक्र बघून कि सांगता येत नाही.आणि तस चक्र दादरला देखील आलं नव्हतं म्हणून जास्तच खुशी.
पण आता इतकी वर्ष गेल्यावर आणि आयुष्याच्या थपडा खाल्ल्यावर त्या प्रसंगाचा वेगळा अर्थ समजून मामाला मनापासून दंडवत असत माझं.
लहानपणी आई वडील गेले.आधी वडील गेले.त्यांच्या घरी अन्न छत्र होत.रेवदंडा समुद्र किनाऱ्या लागत त्यांच घर होत.नारळाची वाडी होती.दुध दुभत घरच होत.पावसाळा सोडला तर बंदरात बोट लागली नी माणस उतरून जाऊ लागली कि आजोबा तिथ जाऊन मोठ्या आवाजात,कुणी अतिथ आहे का?अशी हाक देत.कुणी परगावं चा प्रवासी असेल तो हो म्हणत असे.मग त्याला घरी घेऊन येत.जेवायला वाढून दक्षिणा देऊन तृप्त करत.मग तो पुढील प्रवासास जाई.
तर अस सुरळीत चालू असता आजोबांची दृष्टी अचानक गेली.मग आजारपण त्यांना घेऊनच गेल.नातलगानी फसवलं. रहात घर सोडून म्हणजे,आल्या किमतीस विकून आजी मामाला घेऊन पेणं ला भाड्यान घर घेऊन राहिली.जिच अन्न छत्र होत,साई बाबा जिवंत असताना तिन लहानपणी शिर्डीत राहून त्यांची सेवा केली होती त्या बाईवर हि परिस्थिती आली.का? दैव कस वागेल सांगता येत नाही.मग आजी 4 घरी स्वयंपाक करून दिवस काढत होती मामा सोबत.मामाला काही ब्राह्मणांनी वार लावून दिले होते आपणहून.म्हणजे,रोज त्यांच्या दारी जाऊन ओम भवती भिक्षांदेही म्हणायचं.मग झोळीत घर धणीन जे वाढील ते घरी घेऊन यायच.आणि रोज फक्त एकच घर.तिथ जे मिळेल तेच .या श्रमान किंवा मला वाटत मानसिक खचून आजी लवकरच गेली.मामा एकटा पडला.मग बाबा आजीच्या दिवस कार्यास गेले ते त्याला घेऊनच आले.मग तो आमच्या गावी बरीच वर्ष राहिला.आजी आजोबांची सेवा केलीन.तिथ एकूण तीन वृद्ध माणसां ची त्यानं अहोरात्र सेवा केली.शेवटची दुखणी काढलीन.मग तो आमच्याकडं मुंबईत आला तो आजही माझ्या सोबत आहे.तो मला मामा न वाटता मोठा भाऊ वाटतो आणि आतातर वडिलांच्या जागी आहे.तिकड त्या माणसाचं केलंन तसच इकडं आमच्या घरी त्याच्या ताई च आणि मेव्हण्यांचं शेवटच आणि दीर्घ आजारपण देखील त्यानं काढलं.आम्ही यावेळी त्याच्या जोडीला होतो.तरी त्याची कमाल आहे.
आज त्याच वय 75 असावं.आजही पहाटे उठून कामाला लागतो.याच काम कमी व्हाव म्हणून मी केल तर हा दुसर काम करत बसेल.कधीही चिडत नाही.शांत असतो.कुणीही हाक मारली तरी हा जाऊन मदत करणारच.याला कसलं व्यसन नाही.कुठली छान छोकी नाही.फक्त रोज पेपर लागतो.
आजवर एकदाही त्याच्या तोंडून निराशेचा बोल ऐकला नाहीये.कधीही म्हणला नाही कि,काय साल नशीब आहे माझं!इतक सगळं माझ्याच वाट्याला का?अजिबात चकार तक्रार नाही.अजात शत्रू आहे.जातो तिथ सख्य होत याच.
त्या वर्षी दिवाळीत मला फटाके त्यान् आणलेन त्यातून आणि त्याच्या दीर्घ सहवासातून मी शिकलोय कि,
आपली ऐपत नसली तरी आपल्या वाटच आपल्या माणसाशी वाटून घ्यावं नव्हे तर त्याला ते देऊन टाकाव.कितीही विपरीत परिस्थिती असली तरी तोंडातून निराशा आणि संतापाचे बोल काढायचे नाहीत.सतत पडेल ते काम करत आनंदी रहावं .
पण मला ते त्याच्या सारखं खरच जमत नाही अजून.
कुणी माझ्याशी नीट वागला नाही मी नीट वागूनही तर मला चिड येते.मामा मात्र शांत राहील.उलट कुणी याला बेदम चोपला अकारण तरी हा त्याला म्हणेल,खूप दुखले असतील हात तुझे दाबून देऊ?
मामा हेच मला पटत नाही तुझं.अरे गांधी नी शाम व्हायचे दिवस गेले आता.जशास तस वाग.पण ते तुला जमणार नाही हे देखील कळतंय.तेंव्हा नको.तू आहेस तसाच रहा.मी जिवंत आहे तोवर त्या दिवाळीत तू मला दिलेला आनंद मला आयुष्य भर पुरेल रे.त्या करता दिवाळीची आवश्यकता नाही.रोज दिवाळीच असते अश्या आठवणींची.