रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

*पर्वचा*

*पर्वचा*
तिन्ही सांजे च्या सुमारास बाहेरून खेळून दमून आलो कि हातपाय धुवून आधी पर्वचा म्हणायला बसायचाय. ज्याची पाठ नसेल त्याला पापड वाढणार नाही.अशी काकू ची तंबी कानावर यायची.मग निमूट हातपाय धुवून झोपाळ्यावर कडी च्या बाजूची जागा पकडायची धावत जाऊन.मग जे जे सुट्टीत आलेले असत ते सगळे ही बसायचे येऊन.एक रांग पुढं एक माग. ताई कधी आमच्या सोबत झोपाळ्यावर किंवा गर्दी जास्त असेल तर बाजूला सतरंजी वर बसायची.मग एकेक स्तोत्र सुरू व्हायची ज्यात भीमरूपी, रामरक्षा,अथर्वशीर्ष ते सदा सर्वदा अशी यादी असे.स्वयंपाक घरातून खमंग सुवास अस्वस्थ करत असतानाच आतून दम दिला जाई,सलील चा आवाज ऐकू येत नाही.मघा घसा फोडत होता आता बसला का काय? ज्योत्स्ना बारीक लक्ष ठेऊन अस.जो कुणी म्हणत नसेल त्याच नाव मला सांग,आणि कुणाला मदत केलीस तर तुझी ही खैर नाही.तू ही त्याच्या सोबत उपाशी झोप.
ही धमकी त्या वेळी खरी वाटत असे.
मुंबईत हे रोज नसे पण खाली व्यायाम शाळेत शनिवारी कुस्ती न मल्ल खांब खेळत असू.शनिवारी आखाडा उकरून त्यात दही,तूप. लोणी वग्रे घालून सर्व माती फावड्याने एकजीव करायला उतरत असू आम्ही.वस्ताद आणि बाकी पैलवान वर बसून काम करून घेत.मग बाळ मास्तर(आपल्या निशा चे वडील)येत हातात तबक घेऊन.त्यात निरांजन, नारळ आणि प्रसाद म्हणून खडी साखर वग्रे असे.मग तो नारळ फोडून त्याचे तुकडे करायचे.मग आरती ला उभं रहायच.सत्राणे उड्डाणे ते सदा सर्वदा होई.मग तो प्रसाद खायला खूप आवडायचं.
पुढं मोठं झाल्यावर म्हणजे वयाने,हे सर्व माग पडलं.ती ती ठिकाण ही सुटली.मग राम रक्षे चा डावीकडचा अर्थ वाचून अस वाटू लागलं कि, हे रामा माझ्या डोक्या पासून पाया पर्यंत सर्वांच तू रक्षण कर याला काय अर्थ आहे? मग मी काय करायचं? अहंकार नव्हे पण सर्व भार त्याच्यावर का टाकावा आपण ? असे प्रश्न पडू लागले.
आता मात्र वय वाढल्याने किंवा त्या सोबत परिस्थिती चे फटके अनुभवल्याने वेगळं वाटू लागलाय.
कधी तरी अस जाणवत कि, आपलं काम,प्रयत्न सुरूच ठेवायचे पण त्याला मिळणार फळ या वर मात्र हक्क ठेवायचा नाही.जे कृष्ण ही म्हणतो कि, ते माझ्यावर सोड.काहीतरी शक्ती वेगळी आहे जीच आपल्याला आकलन होत नाहीये.आणि त्याच्या वर सर्व भार टाकणे अस नसून माझ्या हातून काही घडलंच चांगलं तर मी फक्त माध्यम आहे कर्ता करविता तोच आहे.त्याची इच्छा म्हणून मला शक्य झालं.हे वाटायच कारण, साधी लचक भरली तर कूस बदलणंच नव्हे तर पाय ही उचलवत नाही.मी मी म्हणणारा माणूस अर्धांग वाताचा झटका आला तर बोट ही हलवू शकत नाही.
आता जाणवत जे म्हणतो त्याचा अर्थ समजला नव्हता तरी तेंव्हा ही आणि आता खूप समजत अस नव्हे पण वय वाढल्यावर ही काहीतरी शांत शांत वाटत.रामरक्षे ची बदलत जाणारी चाल,त्वं अग्नीत्वं वायूसत्वं या ओळी म्हणताना काही तरी वेगळी मजा येते.
ते माजघर,ती माणसं, ते वातावरण याचा पुनः प्रत्यय आतून खूप सुखावून शांत करतो.फक्त आता पर्वचा म्हणायला झोपाळा नसतो,सोबत कुणी नसत,हा sss कोण रे तो तोंडातल्या तोंडात बोलतोय कळू दे मला अशी स्वयंपाक घरातून येणारी हाक नाही.
आमचे तात्या रात्री अंगणात शतपावली करताना तासभर काही तरी म्हणत असत.पुटपुटल्या सारख.हे काय आणि का म्हणत असतात याच कुतूहल होत.एकदा धाडस करून त्यांना विचारलं,तात्या काय हो म्हणता इतकं ?
त्यांनी दीर्घ श्वास घेतला.सौम्य आणि त्यांच्या कडून दुर्लभ स्मित हास्य करत माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणले,अरे आजवर काय काय शिकलोय.ते ते आठवत असतो.घर्षण हवं न,नाहीतर विस्मरण होईल.
तरी त्यांच ते पुटपुटण डोक्यात राह्यलं च होत.पुढं ग्रेस ची ओळ कानी पडली आणि तात्या आठवले.
स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दुःख कुणाचे
मग माझा मी अर्थ लावला.कदाचित मोठं झालं कि जबाबदारी मूळ माणूस कुठं कुणापाशी मोकळा होत नाही.कारण तितकं समर्थ कुणी असावं लागतं. मग ग्रेस म्हणला ते खरं असावं.
एवंच परत एकदा पर्वचा म्हणली तर खूप शांत शांत मात्र नक्की वाटत.