बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

ट्रिंग ट्रिंग


जुना साथीदार.आज अचानक खूप आठवण झाली याची.तेंव्हा हि अचल वस्तू होती.थाट हि होता .याच्या करता स्पेशल टेबल किंवा फोन केस करून घेतली जायची लाकडी.त्यात डिरेक्टरी ठेवायला खण असे.वर एक पेन स्टॅन्ड अन छोटी डायरी.हा घरात असणं हे भाग्य सर्वांच नव्हतं.गरज हि नव्हती आणि बिल कुणी भरायचं बाबा त्या पेक्ष्या नाणी टाकली कि झालं
वाण्या कड.शाळेच्या बाजूला एक्सचेंज होत.तिथं पाच सहा बूथची रांग होती.त्यातला कुठला नाण  न टाकता चालतो,कुठला कधी कधी नाणं परत करतो हे माहित झालं होतं.कुणी नाण्याला दोरा बांधून कॉल झाला कि अचूक नाणं परत वर काढण्यात सफाई मिळवलेली असे.कोपर्या वरचा वाणी सुटी नाणी द्यायला कटकट करत नसे ओळखीचा होता म्हणून.आधी फक्त काळ्या रंगाचा होता.मग लाल आणि हिरवा रंग आला तो डायल प्लॅस्टिकची आणि आवाज खूप कमी करणारी घेऊन.या प्रकारचा फोन आमच्या नितीन गाडगीळ कड एकदा गेलो होतो तेंव्हा पाह्यल्याच आठवतंय.आणि लाल रंग आत्याच्या फोन चा होता.हे मुंबईचे फोन झाले.पण आमच्या पेण अलिबागला घरी फोन आले ते तोंड शिवलेले वाटत.कारण त्याला डायल हा प्रकारच नव्हता.तिथ तुमचा नंबर लिहायचा.फोन करायचा असेल तेंव्हा रिसिव्हर उचलायचा.मग ऑपरेटर बाईला सवड मिळेस्तोवर रिंग ऐकत राहायची.ती बया आली कि बोलायची बोला कुठला नंबर हवाय,मग आपण सांगू तो नंबर जोडून द्यायची.पण हे लोकल असलं तर.मुंबईत कॉल करायचा तर ,वेळ लागेल .लाईन मिळाली कि जोडून देईन तो वर सारखं फोन करून विचारत रहायच नाही समजलं का ? मग आपण हो म्हटलं कि, हं बुक केलाय मग रिंग देतो.असा सकाळी बुक केलेला कॉल रात्री पर्यंत हि व्हाया पनवेल वग्रे जाऊन कनेकट् झाला कि ऑपरेटर परत उपकार केल्याच्या थाटात,हं बोला आता म्हणायचा मग मोठ्याने बोमलून बोलून घ्यायचं.तेंव्हा हि मी पेण च्या आमच्या तात्यांना विचारलं होत,का हो हे ऑपरेटर गावातलेच असतील न मग ते तुम्हाला ओळखत असतील.ते हो मग त्यात काय ? आयला म्हणजे तुम्ही कोणाला कॉल केला हे त्यांना समजत.
हो,मग त्यात काय झालं.
अहो म्हणजे प्रायव्हसी काय राह्यली?
तुमच मुंबई करांचं हे भलतंच असत बॉ.पण तू म्हणतोस ते हि खरय पण आमच्या इथं तुमच्या सारख्या स्वतः फिरवायच्या डायल नाहीच देत न.
तर तो एक प्रकार तसा होता.माझ्या घरी लँड लाईन आली तेंव्हा तुमचा डबा नको म्हणून कॉर्ड लेस आणला होता मी.त्याची रेंज दार बंद करून गच्चीवर गेलो तरी मिळत होती तेंव्हा काय जादू वाटली होती.परत मी गच्चीतून घरात असलेल्या डब्यावर कॉल करून फुकट बोलूं शकतो हा बोनस फिचर त्यात होता.
मग मोबाईल आले आणि हि देशी प्रौढा काल बाह्य होऊन शेलाट्या बांध्याची नाजूक नार जिच्यात जास्तीच्या सुविधा होत्या अशी अवतरली आणि हे जुने डबे मोडीत निघाले.फोन बूथ वाले उत्पन्न गमावून बसले आणि त्यांची अरेरावी हि गेली.प्रत्येकाच्या हाती खऱ्या अर्थी दूरसंचार स्वातंत्र्य आलं जे कुठंही कधीही वापरता येत.
तरी ते आत्या कडचे,वाण्याकडचे, एक्सचेंज चे,नितीन कडचे जुने संच मनात घर करून राह्यलेतच.