शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१३

_ श्रीकृष्ण थिएटर _

                                                                            _ श्रीकृष्ण  थिएटर _





          आज बाबा जुन्या गोष्टी सांगत असताना आठवण निघाली. अलिबाग जवळ पोयनाड हे आमचे गाव. माझे आजोबा विष्णुपंत जोशी. धडाडीचा माणूस. धोतर , पांढरा सदरा,गांधी टोपी असा वेश. किरकोळ शरीर यष्टी. त्याकाळात काँग्रेस पक्ष
हा मोठा पक्ष . तसा शेकाप हि होता पण कॉंग्रेस प्रमुख पक्ष. आजोबा अण्णा या नावाने प्रसिद्ध.  काँग्रेस चे पुरस्कर्ते. त्यामुळे ओळखी खूप. घराच्या वरील बाजूस पोलिस लाईन होती. येईल तो फौजदार अण्णाकडे बैठीकीला असे. म्हणून तिथेही यांची वट असे. कुणी पान्थस्त यात्रेला निघालोय आज मुक्काम करून निघेन म्हणत चार दिवस राहून जात असे. शेती होती ,आंब्याची बाग होती,आणि भटची दलाली होती. अण्णांना धंद्याची आवड जास्त . त्या काळात धरमतर ते पोयनाड टांगे आणि मग मोटारी उतारूंची ने आण करायला असे धंदे हि केली. एक दिवस चौल भागातील कुणी जोशी काका म्हणून गृहस्थ भेटी करता आले.
आमचे घर टेकडीच्या उतारावर होते. जवळपास एक एकर वर वसलेले. निसर्गतः काही भाग उंच सखल होता. चारी बाजूला अंगण , विहीर ,आंबा,पापी,आवळा ,प्रचंड मोठी बकुल,अशी झाडे होती. मागच्या बाजूचा पारस पाहून जोशीकाका अण्णांना म्हणाले,'' विष्णुपंत तुम्ही थिएटर का नाही सुरु करत ?'' अण्णा म्हणले ,काही माहित नाही त्यातली . तर जोशीकाका म्हणाले ,मी देतो सगळी माहिती. माझ्या मुंबईत नाटक कंपन्यात ओळखी आहेत. झाप,पोफळी माझ्याकडून घेताच जमून जाईल सर्व . मग थांबतील ते अण्णा कसले. मग सुरु झाले  - श्रीकृष्ण  थिएटर -
                 स्टेज वेगळे बांधावे लागलेच नाही. मागच्या खाचरात दोन खंडी भात होई तिथे अर्धा भाग उंच आणि बाकी खाली होता . झाप पोफळींच्या भिंती , विंग तयार झाल्या. पुढे खुर्च्या मग बाक आणि शेवटी सरावलेला ओटा. खुर्च्याची पहिली रांग घरचांसाठी राखीव असे . त्यामुळे घरात आजीला सुद्धा सर्व नाटके पाठ झाली होती . स्टेजवर आठ बत्त्या टांगलेल्या असत. विंगेत सातआठ असत. प्रयोगाआधी त्या पेटवणे आणि नाटक संपे पर्यंत नीट चालतायत न ह्या साठी दोन माणसे असत. आधी आणि नंतर झाडपूस करायला गाडी असत. घरच्या बैलगाडीने गावात जाहिरात वाटली जाई . बाबांचा हात चांगला म्हणून तेच पोस्टर रंगवून देत. मधन्तरात विकायला चिवडा वगैरे केला जाई . गाडी विकित असत. तिकीट बारीवर एक माणूस लागे. मास्टर नरेश,मास्ट दामले,नानासाहेब फाटक,दत्ताराम असे दिग्गज नट आमच्याकडे मुक्कामाला असत. या मुळेच बबन तबल्याचा छंद लागला. त्या वेळचे काही किस्सेही बाबा सांगतात. मज येते ऐकायला.
              हळूहळू नाटके चालेनाशी झाली. रोज तोटा होऊ लागला. मग एक तमाशा फड आला. आमचा तमाशा लावा अण्णा बघा लोक येतायत कि नाही पण तुमचे पैसे खेळ झालाकी देऊ. आण्णा बर म्हणाले. तर आजच खेळ लावू बसून काय करू ?
अण्णा म्हणाले,''अरे जाहिरात नाही केली ,लोकांना समजेल कसे?'' तर ते लोक म्हणाले ,काळजी करू नका आम्हाला नाही लागत जाहिरात. आमच कड आणि ढोलकी कडकडायाला लागली कि आपसूक येतील बघा. आणि तसच झाले. खेळ हौस फुल .
काही दिवस बरे गेले. खूप कचरा होई पण गाडी खुश असत. झाडून काढताना लोकांनी उडवलेल्या चवल्या पावल्या बक्खळ मिळत. ती त्यांना देत अण्णा. मग हा बहर हि संपला. कारण चित्रपट आले.
              मग नाहीतरी थेटर आहेच उभ, प्रोजेक्टर आणा अस कुणी म्हटल . मग अण्णांनी मुंबईहून तो मागवला. पण तो पहिल्यादिवशी छान चालला आणि मग जो बंद पडू लागला तो एव्हडा कि तो नाद सोडावा लागला. आणि आमच थेटर बंद झाल . लहानपणी त्याचे अवशेष पाहून विचारलं तेंव्हा इथे आपले थेटर होत अस आजी सांगे . त्यावेळच्या थेटरात मी छोटी शंकू सारखा खोलगट भाग असलेली जमीन पाहून हे काय विचारल तर आजी म्हणली ते मोराच घर आहे. म्हटल यात मोर कसा राहतो?तर आजीने एक काडी घेऊन त्या बिल वजा खळग्यात फिरवायला सुरु केली. अचानक त्यातून नखा पेक्षा बारीक कीटक वर आला. आजी म्हणली हा बघ जमिनीतला मोर. मग ज्या रंग मंचावर कसलेल्या नटांचे पिसारा फुलवलेल्या मोरा सारखे अभिनय फुलले असतील तिथे मी हे मोर उकरून काढत असे. आता हे सर्व नाही. ते घरही केंव्हाच विकल. आताच्या मालकांनी त्याचे तुकडे करून विकायला काढलेत. तिथे राहायला येणार्यांना हे कळणार नाही कि इथे किती मोठे कलाकार आपली कला सादर करून गेलेत. दुसरे आजोबा जे दशग्रंथी होते त्यांनी किती आणि कुठल्या ग्रंथांची पारायणे केलीत. त्या घरावर छोटे पुस्तक लिहावं अश्या घटना घडल्यात. त्त्या स्टेजवर कॉंग्रेसचे त्या वेळचे सर्व पुढारी येउन गेलेत. आता फक्त आठवणी त्याही फक्त आमच्या पुरत्या. 




सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

अनेक शब्द प्रभूंची लेखणी नेमकी आपल्या मनातल्या भावनेला , व्यथेला नेमकी शब्दात साकारते . हे शब्द रोजच्या बोली भाषेतील असतात . पण तबल्याची जी भाषा आहे ती ही इतकीच समृद्ध आहे . आणि तरबेज कलाकार चामड्यावर ती जिवंत करतात . काही रचना दीर्घ काव्यासारख्या असतात . काही नाजूक कवितेसारख्या ,काही संभाषणा सारख्या . हे  भाषा वैभव हि विस्मयकारक आहे . यात  नाद,लय आणि स्वभाव किंवा भावना आहेत . गणित हि आहे .
जस ;-
धागेना धा s   तिरकीडतकतेs त   धात्रक धेटेत   कतग दिगन   
तकतीनतक   तकतीनतीन   धात्रक धेटेत   कतग दिगन   
ताकेना ता  s   तिरकीडतकतेs त  तात्रक तेटेत   कतग तीकन   
तकतीनतक   तकतीनतीन   धात्रक धेटेत   कतग दिगन  
 हि तिश्र जातीची म्हणजे एका मात्रेत तीन,सहा असे बोल असलेली रचना . हीच रचना चारच्या पटीत बोल घेऊन येणारी चतुरत्र जातीत कसलेला तबलजी जाती बदलून अशी वाजवेल -
धागेना धा s त धा s    तिरकीडतक तेततेत   धात्रक धेटेत कत   कतकतगदिगन
तकतकतीनतीन    तकतीनतकतीन  धात्रकधेटेतकत   कतकतगदिगन
ताकेनातताs ताs    तिरकीडतक तेततेत     तात्रकतेटेतकत   कतकतकतीकन 
तकतकतीनतीन    तकतीनतकतीन  धात्रकधेटेतकत   कतकतगदिगन
  अस शब्दांच गणित रामरक्षेत हि आढळेल -
    ध्यायेदाजानुबाहू   धृतशरधनुशं   बद्धपद्मासन्स्थम…. - एका वाक्यात सात शब्द
हे सगळ झपाटून टाकणारे आहे . या सुंदर रचना शिकल्या कि माणूस कधी एकटा पडत नाही . नुसत्या मोजत म्हणत बसल कि वेळ किती आणि कसा गेला कळत नाही. आणि याचा कैफही असा कि इतर कशाचीच गरज वाटत नाही . ह्या अगणित रचना करणाऱ्या कलाकारांच्या बुद्धिमत्तेला शि . सा . न .