शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

घरातील कारखाना

गणपती जवळ आल्याची चाहूल सर्वत्र उघडलेल्या कारखान्यांना बघून जाणवलं.आमचा ,म्हणजे बाबांचा कारखाना आठवतो या दिवसात. आज विशेष लक्ष्यात आली एक गोष्ट ती शेअर करावीशी वाटली.
गणपतीचा कारखाना म्हटलं तर जागा असेल तितकी कमी च वाटते.आमचं पोयनाड च घर जवळपास एक एकर वर वसलेलं होत.तिथं आमच्या तात्यांनी म्हणचे बाबांच्या काकांनी कारखाना सुरू केला.500 गणपती त्या काळी करीत असत. दोन्ही अंगणी होती वापरायला,आणखी ही मुबलक जागा होती.काही वर्षांनी बाबा 9वर्षाचे होते तेंव्हा तात्यांच्या हाताला चोळ झाली आणि बोट कामातून गेल्या सारख झालं.तेच गणपती करत ,मग आता कसं करायचं?या विचारात सगळे होते.एक रात्री बाबांच्या स्वप्नात गणपती आला आणि म्हणला,तू का करत नाहीस?
हे बाबांनी तात्यांना सांगितलं.तात्या हसून म्हणले,बरं, पडलंय स्वप्न म्हणतोस तर बघ करून. आणि बाबांनी माती हातात घेतली ती वयाच्या 80 व्या वर्षा पर्यंत अव्याहत कारखाना सुरू होता जिथं गेलो तिथं.आज विशेष आठवण झाली ती एक गोष्ट म्हणजे जागा!
पोयनाडला मुबलक जागा होती.मग दादरला आलो तर वरचे दोन्ही मजले बाबा शिकवत त्या कॉलेज चे होते.बाबांनी नोकरी स्वीकारताना रहायला आणि कारखान्याला जागा हवी अशी अट घातली ती संस्थेने मान्य केली.कारण बाबा चित्रकला,हस्तकला,लेथ वर्क,फ्रेट वर्क,पपेट, संपूर्ण नाट्य शास्त्र आणि मातीकाम असे विषय एकटे शिकवत.त्या मुळे ते पूरक होत अभ्यासक्रमास.प्रश्न तिथं नाही आला.आला तो आम्ही नाला सोपऱ्यात आलो तेंव्हा.
बाबांचे हात मे महिना आला कि चुळबुळ करू लागत.बेचैन असत जर गणपती केले नाहीत तर.हे बघून आमच्या बिल्डिंग चे मालक म्हणले,जोशी तुम्ही इतकी वर्षे केलात कारखाना तर खंड पाडू नका.इथं तुमच्या घरातच सुरू करा.आजूबाजू ची काही माणसे नक्की घेतील मूर्ती मग काही नवी ही येतील.वाढली तर पुढे मोठी जागा घ्या भाड्याने.बाबांनी ते मान्य केलं आणि आमचा कारखाना इथं ही सुरू झाला.
आता ती रूम आठवते.दोन खोल्या दहा बाय दहा च्या.बाहेर एक छोटा व्हरांडा किंवा गॅलरी म्हणा.त्या ठिकाणी बाबांनी प्लायवूड बसवून तक्ता राम केला एरवी वापरायला .आणि गणपती च्या वेळी खाली साचे वर मूर्ती रहात.म्हणजे ती जागा बाहेरच व्यापली गेली होती.तिथं वर भिंतीवर ही फळ्या मारून गणपती असत त्या वर.आतली पहिली खोली.त्यात एक खाट, तिला लागून एक रॅक ज्यात माझी पुस्तक वग्रे आणि वर छोटा tv. पुढं दुसर रॅक ज्यावर आरसा आणि तेल,पावडर आणि इतर सामान. या खोलीच्या चारही भिंतीवर फळ्यांच्या 3 लाईन.नाही एक भिंत जी स्वयंपाक घरात पर्यंत लांब होती तिला बाहेर 3 आणि आत दोन अश्या फळ्यांचा भार ज्यावर मग गणपती बसत येऊन.मग आतल्या खोलीत ओटा,भांड्याचे कपात,डायनिंग टेबल आणि एक फळी गणपतीची अस होत. त्याच खोलीत संडास बाथरूम ही होत आणि खाली जी जागा मोकळी होती त्यात पाण्याच्या हंड्या कळश्या भरलेल्या असत.
गणपती सुरू झाले कि बाहेर मातीच्या पोत्यांची रास लागे तक्ता राम वर.हळूहळू सर्व फळ्या गणपतींनी भरून जात.लोक आले म्हणायचे,हे रंगलेले गणपती असे फळ्यावर रांगेत बघून अस वाटत गणपतींची पंगत बसलीय जेवायला.
या इतक्या अडचणीत आम्ही रोजचे व्यवहार करून गणपती ची माती मळण्या पासून ते लोक येऊन गणपती नेत तिथं पर्यंत करायचो.तयार होत आले कि बघायला येत लोक आपला गणपती कसा होतोय ते.घर असल्याने मग त्यांना चहा पाणी वग्रे करी आई.सर्वात जास्त कौतुक आईच वाटत.जमिनीवर ते भिंतीवर सर्वत्र मूर्ती असून एकदाही एकही मूर्ती खराब होणं वा तुटणे घडलं नाही तिच्या हातून.फोडणी वग्रे ही सावधान राहून करावी लागे कारण त्या वाफेने रंगलेले गणपती खराब व्हायची शक्यता होती.या पसार्यातून ती बाहेर आमचा बिल्डिंगचा च पण सार्वजनिक नळ होता तिथून पाणी भरत असे दुपारी 1 ते चार रांगेत नंबर येईल तसा. हो,बाहेर मोठं पिंप ही होत पाण्याच.
आम्ही चालताना ही घरात हात जास्त न हलवता चालायचे .रात्री झोपताना सगळे सावधान पोझिशन मध्ये च हात अंगा जवळ ठेऊन झोपायचो.हातरुण घालणं काढणं ही काळजीने करावं लागे. रंगाच्या वेळी रंगाची भांडी,फिरकीवर गणपती,ब्रश,फडकी आणि कॉम्प्रेसर अशी जंत्री असायची त्याच जागेत.गणपती घेऊन लोक गेले कि, करकचून बांधलेला देह कुणीतरी दोऱ्या कापून मोकळा केल्या सारख वाटे.मग रात्री मुद्दाम तंगड्या पसरून ,अहा काय मजा आहे न?किती जागा होतेय आता,अस म्हणायचो.
एकदा याच जागेत बाबांचे 20 विद्यार्थी विद्यार्थिनी काही कार्यक्रमानिमित्त गावात आल्या ते सर्वजण सरांकडे रात्री मुक्काम करून पहिली गाडी पकडून जाऊ म्हणून हक्काने आले.मग याच दोन खोल्यात आईन सर्वांना वाढलं.त्यातील मुलींनी मदत केली आईला. आणि रात्री 20 जण त्या खोल्यात आणि बाहेरच्या तक्ता राम वर झोपलो ही होतो.पोर आणि पोरी आईच्या पाया पडताना म्हणल्याही,बाई तुम्हाला खूप त्रास दिला न आम्ही ?पण जोशी सरांकडे राहून गप्पा मारून जाऊ ही इच्छा होती.आई म्हणली,आपलेपणा न आलात न? मग त्रास कसला.आमची जागा छोटी आहे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलेत म्हणून जमलं कि ग,माझं काय त्यात.आता परत या पुन्हा केंव्हाही.
मग याच जागेत पाणी भरलं कंबरभर 26 जुलै ला.तेंव्हा कारखाना नव्हता घरात.भाड्याने जागा घेतली होती तिथं होता.आम्ही रंगवत बसलो होतो नी पाणी चढू लागलं.गावातले लोक घरची बाकडी पाण्यातून ढकलत घेऊन आले आपणहून गणपती बुडतील जोश्यांचे म्हणून.तिकडं घरी मात्र संडास बाथरूम मधून जे पाणी चढलं ते काही मिनिटात कमरेला टेकल.शेजारच्या पोर पोरीच्या साथीने आईने फ्रीज उंच जागी बाहेर नेऊन ठेवला पण पावसाने तो निकामी केलाच.मग पुढील आठवडा आम्ही तळ मजल्यावरचे लोक पहिल्या मजल्यावर राहिलो.सर्वांनी एकत्र जेवण केलं.बिल्डिंग एक कुटुंब झाली.
आज आठवलं तर हे सर्व प्रत्यक्ष  अनुभवून हि विश्वास बसत नाही कि त्या 220 चौ फु जागेत इतकं करत होतो आम्ही आणि ते ही आनंदाने.
गणपती बाप्पा मोरया🙏🏻

गुरुवार, २४ मे, २०१८

*पाऊलाची ओळख*

*पाऊलाची ओळख*
आमच्याकडे कायम असणारे आबा आणि गणपत-सरस्वती ची जोडी म्हातारपणा मूळ घरी बसली.घरच सर्व करणं एकट्या आईच काम नव्हतं.चार पैकी तीन अंगणी झाडली तरी दीड तास सकाळचा जायचा. कुणीतरी कामवाली बघायला सांगितलं गेलं ओळखीच्यात.एक दिवस बदक आजी दारात उभी राह्यली.विधवा होती. बुटकी,पाय वाकडे होते तिचे त्या मूळ चालताना वर खाली होत असे.म्हणून गावातली कार्टी तिला बदक आजी चिडवत हे माहीत होतं. आमच्या घरापासून वरच्या अंगाला तिची खोली होती त्या मूळ जाता येताना पाह्यलं होत.मुलांनी चिडवलं कि हातात धोंडा घेऊन माग जायची,पण कधी मारलन नाही कुणाला फक्त तोंडाने बोलायची.आई बाहेर आली.का हो आलात ?म्हणून विचारलन तर म्हणली,कामाला हवं होतं न तुमच्याकडे म्हणून आलो.आई म्हणली,आजी हवंय खरं पण तुम्ही नको.तुमच्याकडून काम करून घ्यायला कसं तरी वाटेल मला.आजी म्हणली,मी करती न काम दुसऱ्यांची हि, तुमच हि करेन.
अहो आजी भांडी धुणी आणि आता मे महिन्यात विहीर खाली गेलीय तेंव्हा प्यायला 4 खेपा शंकराच्या विहिरीवरून पाणी हि आणायचं आहे तुम्हाला कसं जमेल.
यावर जरा विचार करून म्हणली,थांबा जरा आलोच मी काय.म्हणून गेली आणि पाच मिनिटात आपल्या मुलीला घेऊन आली.मी नाय हि करील मंग तर तर झालं.लीला उभी होती.रंग काळा.दात जरा विरळ.पण काटक अंगलट.ती पटकन पण हळूच म्हणली,ताई तुम्ही नका काळजी करू मी करेन सर्व.
बदक आजी म्हणली,बघा ताई आजवर कुठं कामाला जायच म्हणल तर नाय म्हणायची आज तुमचं काम मिळतंय म्हणलो तर आली लगेच.मग आई न तिला जवळ बोलवलन आणि काम समजवलन.तुम्ही बिनघोर रहा ताई मी हाय.
मग लीला कामाला येऊ लागली.सगळं काम चोख.धुणे भांडी कुणी केलेलं आईला पसंत पडणं कठीण असे पण लीला च काम आईला पसंत पडलं.पहाटे लवकर उठून लीला पाण्याला जायची.दूरवरून आणावे लागे म्हणून आई मला म्हणली, सलील आपला रस्ता खडकाळ आहे तू निदान बिवलकराच्या घरापासून तिच्या कडून हंडे घेऊन ये बघू ती पोर किती करील.मग मी गेलो.ती पाणी दोन हंडे एकावर एक आणि त्या वर एक अजून कळशी.एक हंडा डाव्या बगलेत आणि उजव्या हाती पोऱ्या अस घेऊन घामाघूम होत येत होती.मी पुढं झालो म्हटलं दे मी नेतो.त्या अवस्थेत जॅम हसली अन म्हणली,सलीन दादा हे तुला जमणारे का ? मी काय बोलणार.नुसता तिच्या सोबत आलो.आईने सर्व ऐकलन न म्हणली,ठिकय मग तू विहिरीवर रहा पाणी ओढून भांडी भरून दे.म्हटलं ,चालेल जातो.परत लीला म्हणली,दादाला कुठं पाठवलाय ताई?तिथं सर्व बायका असतात तो बिचारा कुठं जाईल मधच. एकूण तिनं काही ऐकल नाही.अशी कामसू होती.परत कधी काही मागत नसे.सणासुदीला आई नेहमीच गडी माणसं घरी जेवायला बोलावीत असे तस लीला ला म्हटलन तर लीला लाजत असे.नको ताई तुम्ही बांधून द्या मी घरी जाऊन खातो बेबी सोबत.
अग तुझ्या घरी ही डबा देत्येय न मी तू इथं च जेव.पण ती थांबत नसे.तिच्या घरी तिची धाकटी बहीण ही होती. या दोनच पोरी म्हातारीला.धाकटी बेबी.जन्मजात आंधळी आणि पायाने लुळी. ती खोली बाहेर बसून असे.या दोघी नसल्या तरी एकटी शांत बसायची.लीला ला निरोप द्यायला गेलो तर हसून म्हणत असे,हा सांगतो रे दादा तिला. तू कसा हायस. अशी माझी चवकशी करी.आईने पाठवलेला अमुक जिन्नस खूप छान झाला होता मी भरपूर खाल्ला हं एकटीनं म्हणायची.पोयनाड सोडे पर्यंत लीला येत होती घरी.
मग बरेच वर्षांनी पोयनाडला गेलो.मित्रा सोबत भटकायला बाहेर पडलो.लीला राहायची ती खोली बंद होती.तीच लग्न झालं आणि बेबी न आजी दुसरी कडे रहातात अस तो म्हणला.परत येताना एक ठिकाणी विक्या म्हणला,तुला बदक आजी न बेबी ची आठवण झाली होती न त्या हल्ली या घरात रहातात बघ.जातो का हाक मारायला?म्हटलं नक्की चल जाऊयाच. विक्याने हाक दिली,ए बाय बघ कोण पाहुणा आलाय तुझ्याकडे.लांबून दिसलं बेबी जरा मोठी झालेली दिसली तरी तशीच बसली होती दाराकडे नजर लावून दिसत नसलं तरी.मी पायऱ्या चढून दारासमोर उभा राह्यलो.मी  म्हटलं,काय गो ओळखलं का मला?
क्षणभर पावलं वाजल्यापासून ती डोळ्यांची पापणी बारीक करून विचार करत होती ती अचानक म्हणली,त ! न ओळखायला काय झालं ?सलीन दादा न तू ?कसा आहेस रे आणि ताई ,बाबा ,शैलू सर्व कसे आहेत.
मी चाट पडलो.मनात आलं हिला दिसू लागलं की काय?
बेबे कसं गो अचूक ओळखलस तू इतक्या वर्ष्यानी?दिसत का तुला आता?
तोंडाने चक अस मोठा आवाज करत हसली न म्हणली,नाय रे.
म ओळखू कसा आलो मी तुला?
तुझी पावलं वाजली न ,म मी ओळखलं.मी अवाक!मग माझ्या सोबत कोण आहे सांग बघू?
तो विक्या दादा आहे कि.
या पोरीने माझ्या पावलांच्या आवाजावरून ओळखलं हे पटतच नव्हतं पण ते खरं होत.मग तिच्या शी जरा गप्पा मारून निघालो सुन्न होऊन.
देव तरी असा कसा?एकटी विधवा बदक आजी.पदरी दोन पोरीतली एक आंधळी न पांगळी. दुसरी धडधाकट पण लग्न होऊन गेलेली.आता या राह्यलेल्या मायलेकी कसं आयुष्य काढतील?
इतका वनवास देऊ नये देवानं कुणालाही.काही वर्षे खडतर काढली ठिकय पण नंतर तरी किमान सुख द्यावं सर्वांना.विशेषतः कष्टकरी लोकांना तरी अस बेभरवशाचे जीणे नको रे देऊ.त्या माय लेकरांना सुखी ठेव रे अस शंकराच्या देवळा समोरून जाताना त्याला म्हटलं.अशी माणसं विसरता येत नाहीत आणि आपल्याला त्यांच्या करता काही करता आलं नाही याची खंत वाटते नेहमी.

रविवार, ६ मे, २०१८

बाईक हणताना रस्त्या ची वेगवेगळी रूप दिसतात.काही लाल मातीची,कधी खडकाळ,पावसात तर त्यात पाण्याची धार बिलगलेली.महामार्ग नागराजा सारखा पहुडलेला असतो.कधी अगदी नाकासमोर जाणारा तर कधी नागमोडी वळण घेत.कधी आजूबाजूस प्रचंड मानव वसाहत तर कधी निसर्ग कुशीत घेऊन.शहर जवळ येईल तसा गोंगाट वाढत जाणारा आणि कधी निरव शांतता.दिवसा तर समोर तापलेली हवा मृगजळ ही दाखवते नमुना म्हणून.रात्री हाच रस्ता सुस्तवलेल्या अजगरा सारखा शांत पडून असतो.शरीरभर गार लहर जवळीक करू पहाते. हे कुणाला गूढ वाटेल कुणाला रोमँटिक मला एकांतवास जो शांती देणारा असतो तसा वाटतो.बाईकही या वरून चालताना एक मस्त पण हलका सूर लावून चालत असते आश्वासक पण.आश्वासक अश्या करता कि,हा आवाज इंजिन उत्तम काम करतय काळजी नसावी असा विश्वास देणारा म्हणून.मग आपण आपल्या विश्वात रमतो.गाडीवर कंट्रोल एक मेंदू अगदी व्यवस्थित करत असतो.दुसरा मात्र स्वतःच्या मुशाफिरीत मग्न होतो.अशी दुहेरी मुशाफिरी सुरू असते.कधी गंतव्य स्थानाची ओढ असते पण मला असा रस्ता संपू च नये असं वाटत.बरेचदा कुणी त्या रस्त्यावरील सह प्रवासी दोन पाच मिनिटं इतकं मोकळं बोलतात,वागतात कि अजून दुनियेत माणुसकी शिल्लक आहे याचं आश्चर्य मिश्रित समाधान मिळत.
हेल्मेट वर समोर च्या गाड्यांचा प्रकाश आभासी प्रकाशाचा खेळ करून दाखवत असतो.त्याला न फसता मार्ग नीट काढायचा असतो.मग त्याला साथ द्यायला हँडल वरचा आरसा मागच्या वाहनांचा प्रकाश खेळ सुरू करतो.हळू हळू याची सवय होते आणि हे ही थ्रिल आपण मास्टर करतो.
अस सुरू असताना एखादी पाय वाट अचानक खाली उतरून तिच्या सोबत यायला भूल घालते.वेळ असेल तर पडावं बळी त्या भुली ला.कारण बाईक म्हणचे स्वातंत्र्य आहे.अशी अनोळखी वाट चाका खाली घ्यावी आणि मन सांगेल तिथं जावं.
हे अनुभवत असताना परत गुलजार साहेब आठवतात.त्यांनी हा रस्ता प्रपंच  इतका मस्त विशद करून सांगितलाय. त्याला तोड च नाही.ते ऐकल असलं तर त्याच प्रत्यंतर मिळत असत आपल्याला. शेवट कविता पुस्तकातून बाहेर पडून अशी अनुभवली कि जास्त कळते.
इस मोड से जाते है
कुछ सुस्त कदम रस्ते
कुछ तेज कदम राहे
पत्थर कि हवेली को
शिशे के घरोदे मे
तिनको के नशेमन तक
इस मोड से जाते है
खरच तसे असतात रस्ते.घाईत असणारे हायवे.सुशेगात जाणाऱ्या पाय वाटा
मग राजे हो रविवारी चिंता सोडून बाहेर पडा. गूळ पोहे भरून घ्या एक पाण्याची बाटली सोबत असू दे.रोजची टेन्शन राहू देत बाजूला आणि मारा किक बाईक ला.आणि मस्त वाचत जा बोर्ड,
अमुक तमुक ग्राम पंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे मग येताना त्याच बोर्ड ची मागची बाजू सांगेल
या परत,आमची हद्द संपली आपला प्रवास सुखाचा होवो
🙏🏻🌹

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

पेणचे पोहे

आपण नेहेमी खातो ते पोहे कसे तयार होतात ते पहा . पेण एसटी स्थानकाच्या [ गावातल ] मागे हि गिरण आहे . गिरणीचे मालक कै . ल . के . जोशी . यांनी हि गिरण सुरु केली . पेण मधील बायका यांच्या कडून पोह्याच्या कण्या नेउन पापड करून मुंबईत विकत असत . पेणचे पापड इथून सुरु झाले . आता या गिरणीत सर्व प्रकारची पीठे,पापड,मिरगुंड,तांदूळ . कुरडया . तांदूळ असे अनेक जिन्नस मिळतात . वडीलांचा व्यापार मुलांनी अविरत कष्टाने वाढवून भरभराटीस आणला आहे .




*आणि बदनाम कुत्रा झाला*


माझा आवडता प्राणी.इमानदार शब्दाची मूर्तिमंत आणि जिवन्त व्याख्या. आवड आहे म्हणून त्या विषयी माहिती घेत असतो.नेटवर अचानक एक स्टिंग ऑपरेशन समोर आलं एका चॅनल च.पाकिस्तानी आहे अँकर पण समाजातील अनेक भ्रष्टाचार उघड करत असतो.ARY नाव चॅनल च.त्यांनी शोधलेला हा नवा फ्रॉड बघून चाट पडलो.
पाकिस्तानी सिंध ,पंजाब प्रांतात एक धंदा खूप जोरात आहे.माग काढणारे कुत्रे पैसे घेऊन मागविण्यात येतात. अश्या एजन्सीज खूप आहेत.कार्ड वर सैन्य दल किंवा पोलीस दलाचा लोगो असतो आणि एखादा मेजर हि उच्च पदावर आहे असं लिहिलेलं असत.
तिकडं गावात समजा म्हैस,बकरी किंवा अन्य वस्तूंची चोरी झाली तर या कुत्रे वाल्याना बोलावलं जात.ते 25 ते 50 हजार घेतात. मग आले कि पोलिसां सारखी चवकशी करतात.मग कुत्रा सोडला जातो.कुत्रा गावभर हुंगत एखादया घरात घुसतो आणि खाटेवर जाऊन बसतो.याचा अर्थ चोर त्या घरातून आला होता.मग त्या घरच्यांना गावाबाहेर हाकलून देतात.घर जाळून टाकलं जात.मग दोन्ही कुटुंबात पिढ्यान पिढ्यांच वैर सुरू होत शेकडो खून पडलेत.कारण काय ?तर कुत्रा जाऊन बसला म्हणजे खर आहे.
हे अस कैक वर्ष सुरू होत.अचानक एक माणूस चॅनल वाल्यांकड आला.तो म्हणला हे सगळं खोटं असत.निव्वळ फसवणूक होते आहे.मी ट्रेनर होतो. पण एक निष्पाप कुटुंब बळी पडल आणि मला पश्चाताप होतोय.तुम्ही हे दाखवा म्हणजे थांबेल सगळं थोतांड.
मग त्यांना त्या ट्रेनर न हे कसं केलं जातं ते सांगितलं.त्या चॅनलच्या माणसांनी एका गावातील लोकांना विश्वासात घेतले आणि सापळा रचला.कुत्रेवाले आले.पैसे घेतले.कुणावर संशय आहे विचारलं.नेमका त्या घरात कुत्रा जाऊन बसला.मग तो ट्रेनर पुढं आला आणि त्यानं तो कुत्रा परत हवा तसा चालवून दाखवला.तेंव्हा सगळं पितळ उघडे पडले.त्या लोकांनी गुन्हा कबूल केला.
आता होत काय होत नेमकं?तर,
कुत्रा सोडला कि ट्रेनर ओरडे, चल चल कि कुत्रा पळतो समोर.मग डावी कडे वळायला हवा असेल तर ट्रेनर म्हणतो शाबास शाबास,उजवी कडे ही असाच शब्द ठरलेला असतो.हवा त्या घरात घुसला कि कमांड असते,चल काम कर ,मग कुत्रा जागी च किंवा खाटेवर बसतो.म्हणजे ते घर चोराच ठरत आणि उध्वस्त होत.
अशी कैक घर उध्वस्त झालीत नि शेकडो खून पडून पिढीजात वैर निर्माण झालीत.
यात आणखी वाईट म्हणजे
कुत्रा बिचारा उगाच बदनाम झाला.🐶

युट्युबर

*यू ट्युबर*
जर तुमच्या पाल्यांनी म्हटलं कि, मॉम,डॅड मी यू ट्युबर होणार.
  तर दचकू नका.हे नवीन रोजगाराचे साधन निर्माण झालेल आहे.जर त्याच्याकडं कम्युनिकेशन स्किल आहे,ज्या विषयाचा vlog तो तयार करणार म्हणतोय त्या विषयात त्याला नुसता इंटरेस्ट नसून बऱ्यापैकी ज्ञान आणि अनुभव असेल तर प्रयत्न करून बघ म्हणायला हरकत नाही.
आधी blog होते जिथं तुम्ही लिहू शकत होता. ते आहेत अजूनही ,पण आता हे दृक्श्राव्य माध्यम आलं आहे.काय असत हे ?ज्यांना माहीत नसेल त्यांच्याकरता माहिती देतो.तू नळीवर तुम्ही आपलं चॅनल फुकट उघडू शकता.तिथं तुम्ही तुमचे व्हिडीओ अपलोड करू शकता. यात ते अपलोड होताना कुठल्या सर्च लोकांनी मागितला तर चॅनल च नाव यावं हा पर्याय असतो तो फीलअप करावा.म्हणजे समजा मी तबला अपलोड करतोय तर मला,तबला,तबला लेसन, इंडियन क्लासिकल म्युजिक वग्रे शब्द तिथं भरेन. म्हणजे या शब्दाचा शोध कुणी घेतला कि माझा व्हिडीओ दिसेल सर्च मध्ये.दुसरा मुद्दा असा कायदेशीर आहे कि, तुमचा व्हिडीओ हा तुम्हीच तयार केलेला असावा.म्हणजे रेकॉर्डिंग झालेली गाणी,सिनेमे किंवा त्याची क्लिपिंग त्यात नसावी जेणे करून संमधीत लोक त्यावर आक्षेप घेणार नाहीत.युट्युब हे इतकं कसोशीने पाळत कि समजा तुम्ही ट्रिप ला गेलात तो व्हिडीओ टाकलाय पण त्यात कुठंतरी फिल्म च गाणं वाजतंय कुणीतरी लावलेल्या स्पीकरवर तर तुम्हाला नोटीस मेसेज येतो कॉपी राईट भंग होतोय या मूळ.एकतर ते काढून टाका,अख्खा व्हिडीओ डिलीट करा.किंवा कंपन्या लक्ष ठेऊन असाव्यात.कारण मी नाट्य संगीताचा व्हिडीओ टाकला तेंव्हा मेसेज आला होता पण त्यात हे ही आलं कि कम्पनीला काही ऑब्जेक्शन नाही ठेऊ शकता.
चॅनल च नाव तुम्ही ठेऊ शकता.असे व्हिडीओ काही दिवस निरीक्षण केले जातात.युट्युब मग जर कुणी ऑब्जेक्शन घेत नाही तुमच्यावर याची खात्री झाली कि तुम्हाला जास्त लेंथ चे व्हिडीओ टाकण्यास परवानगी देत.मग तुमचे व्हिडीओ लोक जास्त संख्येने पाहू लागले तर तुम्हाला एक पर्याय उपलब्ध होतो.त्यात जाहिराती टाकल्या तर चालेल का ? हो म्हणालेत तर त्या येऊ लागतात व्हिडीओ च्या मध्ये.मग त्या व्हिडीओ ला अमुक एक हिट्स मिळाल्या तर त्याचे पैसे तुमच्याकडे जमा होतात कालांतराने.पण यात ही प्रकार आहेत.त्या जाहिराती संपूर्ण बघितल्या का स्कीप केल्या गेल्या त्या नुसार पेमेंट होत.अर्थात हे इतकं सोपं नसत.परत त्यात गुगुल चा ही हिस्सा असतो.उरलेलं काही टक्के तुम्हाला मिळतात.आणि एक महत्वाचा घटक म्हणजे तुमचे सबस्क्रायबर किती आहेत ?म्हणजे नुसते बघून जाणारे वेगळे.ते तुमच्या हिट्स वाढवतात.आणि काही जण चॅनल आवडला तर तुम्ही पुढं कधी काही पोस्ट केलंत तर लगेच कळावे म्हणून ते सबस्क्रायबर बटन दाबतात आणि तुमचे ग्राहक होतात म्हणा पैसे न देता😊
मग जास्त सबस्क्रायबर तर जास्त उत्पन्न तुमचं.
आता हे सगळं वाढीस लागायला तुमच स्किल,नॉलेज आणि सादरीकरण महत्वाचं ठरत.या करता यातील यशस्वी लोक स्वतः चा प्रोफेशनल सेटप ठेऊन असतात.व्हिडीओ करता नवा विषय घेणं,तो प्रोफेशनली रेकॉर्ड आणि एडिट करून प्रेझेंट करणं या करता हे गरजेचे आहे.म्हणजेच हा फुल टाईम बिझनेस आहे बऱ्याच लोकांचा.मग लोक कमेंट मध्ये आपली मतं मांडतात जी बरी वाईट दोन्ही असतात.इतर युट्युबर तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करायची शक्यता असते.हे सर्व सहन करून मार्ग काढत राहावं लागतं.
समजा तुम्ही ग्याजेट विषयी चॅनल चालवताय तर काही कम्पन्या तुम्हाला त्यांची प्रोडक्ट पाठवून रिव्ह्यू द्यायला सांगतात.यात प्रलोभन ही दिली जातात.काही मोबाईल कम्पन्या चॅनल वाल्याना गिफ्ट देतात किंवा चक्क परदेशवारी घडवून आणून मोबाईल विषयी रिव्ह्यू अनुकूल करून घेतात.पण लोक चाणाक्ष असतात हल्ली बरेचदा.असे पेड रिव्ह्यू त्यांच्या लक्षात येऊन तुमचे फॉलोअर्स कमी होऊ शकतात.
काहीजण आपलं दैनंदिन जीवनच टाकत असतात.मी उठल्यावर काय केलं,घरात कशी मस्ती चालते,माझा कुत्रा कसा आहे,माझी मॉम नवी गाडी घेउम आलीय अस दाखवत असतात आणि प्रचंड चाहता वर्ग असतो त्यांचा.अशा लोकांना मग युट्युब बक्षीस म्हणून लोगो असलेल्या बटणाची प्रतिकृती भेट करत.त्यात ही सोन्याचं,प्लॅटिनम च अस असत.
हे युट्युबर ग्राहक वाढवायला गिव्ह अवे करतात.म्हणजे चाहत्यांना बक्षीस देतात.
आपल्या चॅनल च गेट टू गेदर ठेवतात.तिथं त्यांचे चाहते त्यांना भेटायला येतात.गिफ्ट ही आणतात.आणि काय असाव चॅनल वर याची चर्चा होते.
सो एकदम सिरीयस बिझनेस न भौ.
काही कलाकार वेब सिरीज करतात.आपलं टॅलेंट आपण दाखवतात.
काही महिला पाकसिद्धी, रांगोळी,हस्तकला चे चॅनल चालवतात.त्यांच उत्पन्न भरघोस आहे.
काही निगेटिव्ह पब्लिसिटी करतात.धिंच्याक पूजा हे उत्तम उदाहरण. गाणं तिचं बेकार असलं तरी प्रसिद्धी,पैसे आणि काही चॅनल वर उपस्थिती मिळाली न तिला.
नवीन पर्याय आहे.करून बघायला हरकत नाही.

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

*कौन्सिलर, सेमिनार*

*कौन्सिलर, सेमिनार*
एका मित्राच्या मुलाचा मेसेज आला लिंक सकट. काका याला ऐक. मस्त आणि सोपं करून समजावतो सगळं.म्हटलं ओकेज, बघतो. मग त्या माणसाचा व्हिडीओ बघितला.खरोखरीच उत्तम वक्ता होता.आणि तो स्वतः आयुष्यात सफल होता.म्हणजे आपल्या पायावर मेहनतीने उभा राहिलेला माणूस.
    मग विचार आला आमच्या त्या पुतण्या न हे ऐकल उत्तम च झालं.पण त्याला हे का आवडलं?
तर विचार केल्यावर अस वाटलं कि ते त्याच्या बाजूच वाटलं असावं त्याला.तो वक्ता सांगत होता,तुम्ही तुमच्या मनाचा आवाज ऐका. कुठल्याही फिल्ड मध्ये यशस्वी होऊ शकता. तुम्ही वेगळी वाट निवडलीत तर तुम्हाला ते करू नको म्हणणारे मिळतील.ते का नको म्हणतात,हे त्यांना विचारा. मग तुम्हाला अस आढळेल कि ते नको म्हणतात कारण तुम्ही जे करू पाहत आहात ते त्यांना जमणं शक्य नाही.आणि ते करू शकत नाहीत तर तू काय करणार?त्या लोकांना त्या क्षेत्रातील काहीच माहिती नसते.तुम्ही विचलित न होता पुढं जात रहा.
अस एकूण सगळं होत.पण त्या माणसाने सांगितलेल्या इतर गोष्टी कडे त्या मुलाचं ध्यान गेलं नसणार .जेंव्हा तो माणूस सांगत होता कि, मलाही मी वेगळं क्षेत्र निवडलं तेंव्हा विरोध झाला पण मी यशस्वी झालो.हे इतकंच लक्ष्यात येत या पोरांच्या पण त्याने नंतर त्या करता जे डोकं लढवल,जे श्रम घेतले आणि भांडवल आपलं आपण उभारल त्या कड हि पोर लक्षच देत नाहीत.
त्या पोराला हे पटण्याचं कारण,बघ काका आमच्या कडे हे असंच असत.मी काही करायचं म्हटलं तर घरचे लगेच विरोध करतात.म्हणजे त्याच्या म्हणण्याला दुजोरा देणार फक्त त्यानं घेतलंय.
  आता त्याच्या घरच्यांना त्याची लायकी माहीत असते म्हणून विरोध होत असतो.त्या माणसाच्या आड लपू पाहत होता तो पोर.स्वतः ला ओळखणं त्याला अजूनही जमत नाही हे माझं निरीक्षण.
हे कौन्सिलर, व्यक्तीमत्व विकास शिबिर वग्रे अलीकडची उपज आहे.ते वाईट नव्हे.जर समाजाला त्याची गरज असेल तर ते हवंच.सुधारणा नकोत अस अजिबात नाही.पण काही दशकांपूर्वी हे असलं काही नव्हतं.जरी तेंव्हा इतक्या सुधारणा,नवी क्षेत्र नव्हती तरी त्या काळी जे अपडेट होत ते होतच ना!
तेंव्हा शेतकरी आत्महत्या जवळ जवळ नव्हत्याच.अपवाद म्हणून कुठं घडलं असलं तर.
प्रेम भंग आणि त्यातून घडणारे गुन्हे ही इतके नव्हतेच.मग आज हे का घडत?
तर हल्ली कमी वेळात जास्तीत जास्त फायदा आणि तो हि लायकी नसताना हवा असतो.खूप कमी वयात मोठी पॅकेज घेतात तरुण.मुबलक पैसा असणं मग सांभाळणे जमत नाही.ती  किंवा कुठलीही ताकद सांभाळून रहाणं हे जास्त कठीण आहे.उदाहरणार्थ,समजा तुम्ही एखाद पिस्तुल खरेदी केलंत.ते बरेच दिवस पडून आहे पण ते वापरता येत नाही.अश्या वेळी ते वापरून बघायची इच्छा प्रबळ होते.ती कंट्रोल मध्ये ठेवण हे ते शस्त्र विकत घेण्याहून कठीण आहे.किंवा जर कुणी मनाविरुद्ध वागल तर ते शस्त्र बिनदिक्कत वापरलं गेलंय प्रगत राष्ट्रात.शाळेत गोळीबार का केला?तर काही नाही होत पिस्तुल बघितलं वापरून,हे उत्तर मिळाले मुलाकडून अस वाचनात आलं होतं. तसच,लंडनच हिथ्रो विमानतळ कुणा शाळकरी पोरानं हॅक करून सरकार ला जेरीस आणलं.त्याला पकडल्यावर तो ही हेच म्हणल्याच आठवतंय.म्हणजे इथं शस्त्र बदललं पण ते सांभाळून ठेवण आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरणं हि ताकद कमी पडली.पुराणकालीन योद्धे हि त्यांची अस्त्रे उठसूट वापरत नव्हते.
जर आपण जबाबदारीने वागलो,स्वतः ची कुवत ओळखून वागलो,श्रम घेण्याची तयारी असली आणि पेशन्स असले तर कुणाच्या ही कौन्सिलिंग ची गरज नाही.गरज असते ती फक्त डोळसपणे जगण्याची.आयुष्य जे अनुभव देत असत ते दिलखुलास अंगावर घेऊन,त्यातून शिकून पुढं जाण्याची.हल्ली बरेचदा आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने मुलांना नाही ऐकायची,वाट बघायची सवय राहिली नाही.मग मालकी हक्काची जाणीव मात्र तीव्र झाली .मी मोठा झाला.यातून ती किंवा तो मला नाही म्हणतो/म्हणते,मला डीच करते म्हणजे काय?मग ज्या व्यक्ती वर प्रेम केलं म्हणतात तिच्यावर हल्ला होतो.
त्या माणसाने हे ही विशद करून सांगितलंय त्याच्या लेक्चर मध्ये.तुम्ही ब्रेकप झाल्यावर उदास का होता?
तुम्ही प्रेमात पडायच्या आधी सुखी होतात?तर होतात. पडून दुःखी झालात?झालात.मग आनंद साजरा करा न!अरे मी दुःखातून बाहेर आलो.हवं तर दुसर प्रेम करा.नाही जमलं म्हणून निराश व्हायची काय गरज आहे?तुम्ही असे वागता कारण इतर सर्व तसेच वागत असतात.इतरांकडे गर्ल फ्रेंड आहे,इतरांकडे गाडी आहे माझ्याकडं नाही.या रॅट रेस मधून बाहेत या.कारण ती न संपणारी यादी आहे.मला गाडीची आत्ता खरच गरज आहे का?का मित्रांना किंवा समाजाला स्वतःची लायकी किंवा स्टेटस दाखवून द्यायला गाडी घ्यायचीय?तस केलंत तर तुम्ही कधीही सुखी होणार नाही.मग तुम्ही घेतलेली होंडा सिटी जी मिळवणं मध्यमवर्गीय लोकांना सहज शक्य नाही ती ही तुम्हाला सुख देणार नाही कारण तो वर तुम्हाला अस वाटेल अरे,bmw हवी.
एकूण पूर्वी हे सगळं घरचे किंवा इतर मोठी माणसं सांगत असत.आपल्या धर्मात हीच शिकवण आहे.कीर्तन आणि सो कॉलड बाबा लोक हेच सांगत असतात.खरंतर स्वतः ला वेळीच ओळखता आलं तर या लोकांची गरज च नसते.एकूण समाज मानसिक खचत चाललाय म्हणून बाबा लोकांची चलती सुरू आहे.कौन्सिलर बिझी होतायत.
मग अश्या समाजाला योग्य कौन्सिलर हवाच. फक्त त्याच म्हणणं नीट विचारपूर्वक ऐकून तस वागा हि.
हे सर्व त्या आमच्या पुतण्याला हि प्रत्यक्ष भेटलो तर सांगीनच.मग कदाचित तो म्हणेल,काका तू सुद्धा घरच्यासारखं च बोललास😀